मानवनिर्मित वणव्‍यामुळे होणारी सर्व प्रकारची हानी आणि उपाययोजना

म्‍हादई अभयारण्‍यात लागलेल्‍या आगीमुळे पसरलेले धुराचे लोट

यंदाच्‍या वर्षी स्‍वर्गसुंदर ‘कोकण’ वणव्‍यामुळे काळवंडायला लागले आहे. वर्ष २०२२ मध्‍ये महाराष्‍ट्रात २४ सहस्र ५९२ ठिकाणी वणवे लागले होते. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्‍प यांमुळे होणारी वृक्षतोड थांबायचे नावच घेत नाही, तर जंगलांना लागणार्‍या आगींमुळे वनक्षेत्रही मोठ्या प्रमाणात न्‍यून होत आहे. अशा स्‍थितीत आपल्‍या सर्वांना सह्याद्री आणि तेथील वनराई यांच्‍या माध्‍यमातून देव आपल्‍याला बरेच काही देत आहे. या वनराईला उन्‍हाळ्‍याच्‍या हंगामात काळवंडलेली पहाणे दुर्दैवी असते. आपल्‍याकडे देशभरातील जंगलांना लागणार्‍या आगींवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी आणि त्‍यावर उपाययोजना करण्‍यासाठी डेहराडूनहून नियंत्रित होणारे सॅटेलाईट (उपग्रह), तसेच ‘फायर ब्‍लोअर’ यंत्रे आणि ड्रोनने पाण्‍याची फवारणी करण्‍याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तरीही राज्‍यात पावसाळा चालू होईपर्यंत पदोपदी वणवे पेटत रहातात. अस्‍वस्‍थ करणारी गोष्‍ट म्‍हणजे यंदा २१ फेब्रुवारी या दिवशी रत्नागिरी नजीकच्‍या हातखंबा तारवेवाडी आणि १३ मार्चला लाडघर येथे लागलेला वणवा आटोक्‍यात आणण्‍याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना आगीत होरपळून प्राण गमवावा लागला. स्‍वर्गीयसौंदर्य अनुभवणार्‍या नजरांना काळवंडलेले ‘कोकण’ पहातांना ‘ही मानवनिर्मित वणवा प्रवृत्ती न्‍यून होणार तरी कधी ?’, हा प्रश्‍न वर्षानुवर्षे छळतो आहे.

श्री. धीरज वाटेकर

१. वणवा लावणारी प्रवृत्ती आणि त्‍यामुळे होत असलेली हानी

महाराष्‍ट्रातील जंगले ही कोरडी पानझडी जंगले (dry deciduous forests) आहेत. जानेवारीपासून आपल्‍याकडे पानगळतीला प्रारंभ होतो. ही पानगळती आणि वाढलेले गवत वनातील वणव्‍यांना पोषक ठरते. वणव्‍यांचा कालावधी नोव्‍हेंबर ते मे मास असा असला, तरी शिमग्‍याच्‍या (होळीच्‍या) वेळी हे प्रकार अधिक वाढतात. आपण आपल्‍या घराला, इमारतीला, आस्‍थापनाला आग लागली, तर किंचाळतो, विव्‍हळतो, हतबल होतो. मग माळरानावर, डोंगरात वणवा पेटतो, तेव्‍हा तेथील सजिवांनी आक्रोश कसा करायचा ? त्‍यांचा आक्रोश आपल्‍या कानापर्यंत का पोचत नसावा ? वणवा लावणारी प्रवृत्ती परदेशातून येत नाही, तर ती आपल्‍यातच आहे. जंगलमाफियांसह गुरांसाठी अधिक चार्‍याची उगवण व्‍हावी, काटेकुटे जळून जावेत, शेतीत राख येऊन उपन्‍न वाढावे, ससे पकडण्‍यासाठी, शिकारीस साहाय्‍य, सागवान तस्‍करी, भूमी जाळण्‍याची पद्धत, कोळसा बनवणार्‍या टोळ्‍या, शेतातील कचरा आणि पालापाचोळा साफ व्‍हावा, अशा एक ना अनेक गैरसमजूती या प्रवृतीमागे असाव्‍यात. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच; पण कार्बन डायऑक्‍साईड वातावरणात वाढल्‍याने पृथ्‍वीचे तापमान वाढत आहे. ‘सततच्‍या वणव्‍यांना कंटाळून शेतकर्‍यांनी भूमी विकाव्‍यात, शेती-बागायती बंद करावी, तो देशोधडीला लागावा, त्‍याने पाळीव जनावरे विकावीत, भूमी नापीक व्‍हाव्‍यात, जेणेकरून त्‍या अल्‍पदरात बळकावता येतील’, असेही षड्‍यंत्र यामागे असू शकते. आपल्‍या समाजसुधारणांच्‍या सर्वच क्षेत्रांत अनास्‍था आहे, असे म्‍हटले जाते. ही अनास्‍था काही प्रमाणात असते, तर काही प्रमाणात नसते. ती न्‍यून करण्‍यासाठी आपण सातत्‍याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत रहाण्‍याची आवश्‍यकता आहे. वणव्‍याचे चक्र असेच चालू राहिले, तर भविष्‍यात त्‍याचेही दुष्‍परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत.

२. यंदाच्‍या वर्षी विविध ठिकाणी लागलेला वणवा

यंदाच्‍या मोसमात रायगडच्‍या उरण तालुक्‍यातील ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगराला ८ दिवसांत दोनदा आग लागली. या डोंगराच्‍या पायथ्‍याशी ओ.एन्.जी.सी. (ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन) चा देशातील सर्वांत मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्‍प आहे. १० जानेवारीला आंजर्ले परिसर, १७ जानेवारीला खेडच्‍या मोरवंडे-बोरज भाग, राजापूर तालुक्‍यातील सागवे-गोठीवरे परिसरात लागलेल्‍या वणव्‍यात अनेक शेतकर्‍यांच्‍या बागा जळाल्‍या. यांसह अंबरनाथ, बदलापूर (टाहुली डोंगर) आणि वांगणी, पालघरच्‍या सापणे-वरले भागात, पोलादपूर जवळच्‍या चरई महादेवाचा डोंगर, अलिबाग समुद्रकिनारी सुरूच्‍या बनाला, पुण्‍यातील सिंहगड अन् कात्रज भाग, मातोरी (नाशिक) गावाच्‍या गायखोर्‍यात आदी भागात वणवे लागले. कोल्‍हापुरातील आजरा तालुक्‍यातील वनौषधी पार्क, कोरीवडे, पेरणोली, हरपवडे भागातील २०० एकर जंगलाला वणवा लागला होता. (गोव्‍यात यंदाच्‍या वर्षी २६८ घटना वनक्षेत्रातील आगीसंबंधी, तर ६४२ या शेतांमधील गवताला आग लागण्‍याविषयी घडल्‍या. गोवा राज्‍यातील म्‍हादई अभयारण्‍यासह अन्‍य वनक्षेत्रात लागेल्‍या आगी १० दिवसांनंतर थांबवण्‍यात प्रशासनाला यश आले. – संपादक) 

३. वणवा न लागण्‍यासाठी काही उपाययोजना

काही वणवे नैसर्गिक असतात. वर्ष १९७१ पासून सातत्‍याने उष्‍ण लहरींचे प्रमाण वाढत असून शीत लहरींचे प्रमाण न्‍यून होत आहे. निसर्गातील हा असमतोल जंगलातील अपवादात्‍मक नैसर्गिक वणव्‍यांना निमित्त ठरत आहे. बाकी मानवनिर्मित वणवे विझवायचे सरकारी आणि स्‍वयंसेवी संस्‍था यांचे प्रयत्न चालू असतात. वणवा हा इतका मोठा असतो की, संपूर्ण गाव जरी विझवायला गेले, तरी तो विझत नाही. अभ्‍यासकांच्‍या मते वर्ष २००३ पासून आपल्‍या देशात जंगलातील वणव्‍यांचे प्रमाण वाढले आहे. वणव्‍याच्‍या प्रकोपातून पक्षी, सरपटणारे प्राणी, जैवविविधता यांची होणारी जीवितहानी हा मोठा चिंतेचा विषय आहे. डोंगरात वाढलेले गवत काढणे शेतकर्‍यांना परवडत नाही, ही वस्‍तूस्‍थिती आहे. तरीही त्‍या भागातील गवत काढणी आणि येणारा वाहतूक व्‍यय विचारात घेऊन या गवतापासून कागद, पुठ्ठा आदी बनवणे शक्‍य आहे का ? यावर संशोधन व्‍हायला हवे.

गवताची अधिकची उत्‍पादकता सिद्ध झाल्‍यास ‘वणवा लावण्‍याची’ प्रवृत्ती न्‍यून होऊ शकेल. जंगल भागात वन विभागाने गस्‍त वाढवण्‍याची आवश्‍यकता आहे. गस्‍तीच्‍या वेळी विनाकारण जंगलात फिरणार्‍या लोकांची झडती घ्‍यायला हवी आहे. जंगलात लाकूडफाटा आणण्‍यासाठी जाणार्‍यांची चौकशी व्‍हायला हवी. जंगलातील अडचणीच्‍या जागा मोकळ्‍या करण्‍यासाठी वणवे लावले जातात. वणवे थांबवण्‍यासाठी जंगलात जाण्‍या-येण्‍याच्‍या मार्गांवर असलेल्‍या शेवटच्‍या घरात रहाणार्‍या गावकर्‍यांनी रखवालदार व्‍हावे लागेल. ग्रामपंचायती आणि संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन समिती यांनी अशा मार्गांवर शेवटच्‍या घरात जंगलात जातांना आणि बाहेर येतांना नोंद करण्‍यासाठी नोंदवही ठेवावी. या वहीतून जंगलात प्रतिदिन कोण जाते ? वणवा लागलेल्‍या दिवशी जंगलातून कोण कोण परत आले ? याचा अंदाज अशा प्रयत्नातून बांधता येईल.

४. वणवा लावणार्‍या प्रवृत्तींना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

जंगलांना निसर्गाने पुन:र्निर्माणाची क्षमता दिल्‍याने ऋतुचक्र पालटल्‍यावर पुन्‍हा नव्‍याने जैवविविधता निर्माण होत रहाते. हे खरे असले, तरी सततच्‍या वणव्‍यांचा जैवविविधतेवर नकारात्‍मक परिणाम होतो का ? वणव्‍यानंतर जेव्‍हा पाऊस पडतो, तेव्‍हा त्‍या जंगलाचे जीवन पूर्वीसारखे होते का ? हेही पडताळण्‍याची आवश्‍यकता आहे. पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने छोट्या छोट्या गोष्‍टींमध्‍ये पालट घडवून आपल्‍याला निसर्गासोबत चांगले जगणे शिकावे लागेल. मध्‍यंतरी आम्‍ही चिपळूणकरवासियांनी ‘एकच देऊ नारा संपवू वणवा सारा’, असे म्‍हणत ‘वणवामुक्‍त कोकण’साठी प्रयत्न केले होते. वणवा लागणारच नाही, यासाठी आपण सर्वांनी जागरूक रहाणे आवश्‍यक आहे. अर्थात् वणवा लावणार्‍या प्रवृत्तींना कायद्याद्वारे कठोर शिक्षा व्‍हायला हवी, तसेच ती सर्वांना कळायला हवी. याचसमवेत तंत्रज्ञानाचा वापर करून यावर ठोस उपाययोजना मिळेपर्यंत वणवे थांबवण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

– श्री. धीरज वाटेकर, चिपळूण, रत्नागिरी. (७.३.२०२३)