साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण करून त्यांना घडवण्याची तीव्र तळमळ असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

पू. (सौ.) अश्विनी पवार

१. साधकांचे अचूक आणि सूक्ष्म स्तरावर निरीक्षण करणे

‘पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या रूपात आश्रमात प्रत्यक्ष ईश्वरी ओघच कार्यरत आहे’, असे जाणवते. आश्रमातील काही प्रसंग त्यांना कधी कधी ठाऊक नसूनही त्यांचे निरीक्षण अचूक असते. ‘आश्रमातील साधकांना तीव्र स्वभावदोष आणि अहं असलेले प्रसंग लक्षात आलेले असतात. ज्यांना ‘स्वतःमध्ये पालट व्हावा’, असे वाटते, त्याच साधकाचे प्रसंग पू. अश्विनीताई सत्संगाच्या वेळी घेतात. तेव्हा ‘ईश्वरी अधिष्ठानाविना हे घडू शकणार नाही’, हे लक्षात येते.

२. कार्यपद्धती साधकांच्या अंगवळणी पडण्यासाठी ‘देव प्रत्यक्ष संतांच्या रूपात येऊन सर्वकाही करतो’, असे वाटणे

आश्रमातील कार्यपद्धती साधकांच्या अंगवळणी पडण्यासाठी पडताळणी सूचीचा वापर व्हावा; म्हणून पू. ताईंनी अपार कष्ट घेतले. आता आश्रमात कार्यपद्धतीचे पालन सहजतेने होते. साधकांची सेवा परिपूर्ण व्हावी, त्यांनी देवाला अपेक्षित असे घडावे; म्हणून इतक्या प्रीतीने ‘देव प्रत्यक्ष संतांच्या रूपात येऊन हे सर्व करत आहे’, असे वाटून मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व अनुभवता येते आणि भावजागृती होते.

३. उत्तम नियोजन करून घेणे आणि प्रसंगी शिक्षापद्धत अवलंबून साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण करणे

पू. अश्विनीताईंनी स्वतः वेळ देऊन काही साधकांचे दैनंदिन सेवांचे नियोजन करून दिले. ‘सेवेतील लहानशी वाटणारी चूकही कशी गंभीर आहे ?’, हे त्यांनी साधकांच्या मनावर बिंबवले आणि परिपूर्ण सेवा करण्यास आमचा हात पकडून त्यांनीच आम्हाला शिकवले. काही प्रसंगांत साधकांना सत्संगात न बसण्याची शिक्षा दिली. त्यातून आमच्यामध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण केले आणि आम्हाला पुढच्या टप्प्याची सेवा शिकवून आम्हाला आनंदाची अनुभूती घ्यायला शिकवले.

४. साधकांना स्वभावदोषांची जाणीव करून देणे आणि प्रोत्साहन देणे 

पू. अश्विनीताई सत्संगात अप्रत्यक्षपणे साधकांमधील सवलत घेणे आणि दायित्वशून्यता या स्वभावदोषांची सातत्याने जाणीव करून देतात. प्रत्येक क्षणी आम्हाला पुढे जाण्यास साहाय्य करतात. आम्ही दायित्व घेऊन सेवा करू लागल्यावर पुष्कळ प्रोत्साहन आणि खाऊही देतात.

५. ‘अहंच्या तीव्रतेमुळे साधनेत घसरण होते’, याची साधकांना जाणीव करून देणे

एका साधिकेत स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता पुष्कळच होती. त्यांना जाणीव करून देतांना ‘तिथे पू. अश्विनीताई नसून परात्पर गुरु डॉ. आठवले हेच आहेत’, असे मला वाटले. काही क्षणांत हा पालट दिसून आला. काही सूत्रांवरून ‘त्या साधिकेच्या अहंची तीव्रता असून त्यामुळे तिची साधनेत घसरण होत आहे’, याची जाणीव पू. अश्विनीताईंनी करून दिल्यावर त्या साधिकेमध्ये पालट झाला.

६. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणे 

पू. अश्विनीताई प्रत्येक साधकाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी अन् आश्रमातील प्रत्येक साधकाची साधना व्यवस्थित चालू रहावी; म्हणून त्या पुष्कळ कष्ट घेतात.

‘परात्पर गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी अर्पण झाल्यावर सर्व त्रास, प्रारब्ध, स्वभावदोष आणि अहं या सगळ्यांतून पू. अश्विनीताईंच्या रूपात त्यांनीच अलगदपणे बाहेर काढले’, याची प्रचीती आली. अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना साक्षात् श्री अन्नपूर्णादेवीच्या रूपात मार्गदर्शन केले. धान्य निवडण्याची सेवा करतांना साक्षात् श्री धान्यलक्ष्मीच्या रूपात आम्हाला सांभाळत आहेत. आम्हाला सेवेशी एकरूप होण्यास शिकवत आहेत. अशा पू. अश्विनीताईंचा सहवास मला जवळून अनुभवता आला. याबद्दल परात्पर गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

‘देवा हे सर्व करणारा तूच आहेस. केवढे हे तुझे ममत्व आणि अलोट प्रेम रे देवा ! तुझा विसर न पडावा ! केवळ तुझ्या चरणांचे अखंड स्मरण राहू दे, हेच तुझ्या चरणी मागणे आहे भगवंता !’

– कु. मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.६.२०२२) 

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.