संतांनी वर्णिलेला शुभ दसरा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अपराजितादेवीचे पूजन म्हणजे ‘विजयासाठी देवीकडे शक्ती मागणे’ आणि रात्री थोरामोठ्यांना शमीची पत्रे (पाने) देणे म्हणजे ‘आपल्या विजयाचे पत्र देऊन (विजयश्री प्राप्त करून) थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेणे’ होय. हिंदूंनो, विजिगीषु वृत्ती वाढवणारी ही विजयादशमीची तेजस्वी परंपरा आहे !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


परात्पर गुरु पांडे महाराज

देवीने नवरात्रीद्वारे दैवी विचार आणि बलशक्ती घेऊन दुष्ट शक्तींना नामशेष करण्यासाठीच सीमोल्लंघन केले होते. तिचे हे कार्य अविनाशी आणि कायमस्वरूपी आहे, हे लक्षात घ्या !

– परात्पर गुरु पांडे महाराज


विजयादशमी महोत्सव का साजरा करतात ?

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘आश्विन शुक्ल दशमी, म्हणजेच विजयादशमी ! या दिवशी रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साला १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला. आपटा आणि शमी या वृक्षांवर कुबेर सुवर्णाचा वर्षाव करतो. कौत्स फक्त १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीच्या सुवर्णमुद्रा प्रजाजन नेतात. त्या काळापासून, म्हणजेच त्रेतायुगापासून हिंदु लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २००७)

विजयादशमी आणि विजयोत्सव यांची परंपरा

टीका : विजयादशमी आणि विजयोत्सव यात नाविण्य कसले ? ती तर एक परंपरा आहे.

खंडण : ही परंपरा जेव्हा प्रतीक होते, तेव्हा ती नवा अर्थ घेऊन येते. ते प्रतीक धर्म, सत्य, सुंदरता, शुभ, पावित्र्य, विजय व चिरंतन यांचे असते.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २००७)


साधकांनो, गुरुसेवेचे सोने वाटूया !

प.पू. दास महाराज

देवीने नवरात्रोत्सवाच्या ९ दिवसांमध्ये विविध अवतार घेऊन असुरांचे निर्दालन केले. प्रभु श्रीरामानेही रावणाचा वध करण्यापूर्वी नवरात्रीच्या काळात देवीची उपासना केली आणि तिच्याकडून वरदानरूपी शस्त्रे घेऊन रावणाचा संहार केला. त्याचप्रमाणे आपत्काळामध्येही देवी साधकांचे रक्षण करणार आहे. त्यामुळे साधकांनी विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करत श्री गुरूंच्या नामाचे, त्यांनी सांगितलेल्या साधनेचे आणि गुरुसेवेचे सोने वाटूया, तसेच साधकांनी स्वतःही नामजपादी साधना वाढवावी. ‘रामनाम’ हेच सोने असून तेच विजयादशमीच्या दिवशी वाटूया आणि तेच आपल्याला आपत्काळात तारणार आहे. रामनामाने समुद्रावर दगड तरले. त्यामुळे आपत्काळात रामनाम घेणारा तरणारच आहे !

– प.पू. दास महाराज, सिंधुदुर्ग