कबुतरांद्वारे पसरणार्‍या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी तज्ञांची समिती स्थापन करावी ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – भाजपचे आमदार राम कदम यांनी औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत कबुतरांमध्ये पसरणार्‍या फुफ्फुसांच्या व्याधींविषयीचा प्रश्न उपस्थित केला. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याविषयी अभ्यास करून उपाययोजना काढण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले.

राम कदम म्हणाले, माझी आई फुफ्फुसाच्या व्याधीमुळे २ वर्षे रुग्णाईत होती. अशी व्याधी कुणाला होऊ नये, यासाठी मी हा विषय मांडत आहे. कबुतरांमुळे पसरणार्‍या विषाणुंमुळे ‘आय.एल्.डी.’ हा रोग बळावतो. या रोगावर ठोस असे उत्तर नाही. देशात प्रतीवर्षी ९ लाख जणांना हा रोग होत आहे. त्यामुळे मुंबईत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कबुतरांचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थलांतर करता येईल का ? असा उपाय या वेळी आमदार राम कदम यांनी सुचवला. याविषयी तज्ञांच्या समितीने अभ्यास करावा, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.