फ्रान्सिस झेविअर याने इन्क्विझिशन (धर्मन्यायालय) स्थापन करण्याची मागणी केल्याचा १६ मे हा दिवस ‘काळा दिवस’ घोषित करा !

‘हिंदू एकता मंच, गोवा’ची मागणी

पहिल्या रांगेत डावीकडून सर्वश्री सत्यविजय नाईक, जयेश थळी, नितीन फळदेसाई, सुजन नाईक आणि मागे डावीकडून अभय सामंत अन् दिनीन पेडणेकर

पणजी, १३ मे (वार्ता.) – १६ मे १५४६ हा दिवस गोव्याच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्यायाचा आरंभ करणारा आणि अत्यंत वेदनादायी दिवस मानला जातो. याच दिवशी फ्रान्सिस झेविअर याने पोर्तुगालचा राजा जॉन ३ याला पत्र लिहून गोव्यात इन्क्विझिशन (धर्मन्यायालय) स्थापन करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने १६ मे हा दिवस राज्यात ‘काळा दिवस’ म्हणून घोषित करावा आणि गोव्यातील राष्ट्रभक्त नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी ‘हिंदू एकता मंच’ने  १३ मे या दिवशी सायंकाळी येथील आझाद मैदानात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रकार परिषदेला हिंदू एकता मंचचे सर्वश्री नितीन फळदेसाई, सत्यविजय नाईक, जयेश थळी, सूजन नाईक, अभय सामंत, दिनीन पेडणेकर आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत ‘हिंदू एकता मंच’च्या पदाधिकार्‍यांनी पुढील माहिती दिली. इतिहासातील उपलब्ध दस्तऐवज आणि संशोधन यांनुसार गोव्यात इन्क्विझिशनच्या काळात सहस्रो हिंदूंवर धार्मिक अत्याचार करण्यात आले. अनेक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर बंदी घालण्यात आली आणि बळजोरीने धर्मांतर करण्यात आले. इतिहासकारांनीही त्यांच्या लिखाणामध्ये त्या काळातील अत्याचारांचा उल्लेख सविस्तरपणे केलेला आहे. विशेषतः इतिहासकार अनंत काकबा प्रियोळकर यांनी ‘द इन्क्विझिशन’ या ग्रंथात इन्क्विझिशनमधील अमानुष शिक्षा प्रकार आणि धार्मिक दडपशाही यांचे विस्तृत वर्णन केले आहे, तसेच फ्रेंच वैद्य आणि प्रवासी चार्लस डेलोन यांनी स्वतः गोवा इन्क्विझिशनचा अनुभव घेतला असून त्यांच्या लिखाणात त्या काळातील अत्याचारांचे वर्णन आढळते. इतिहास दडपून समाजात खरा सलोखा निर्माण होऊ शकत नाही. सत्य इतिहास स्वीकारणे आणि तो पुढील पिढीपर्यंत पोचवणे, हीच खरी लोकशाही अन् न्याय यांची पायरी आहे.

 ‘हिंदू एकता मंच, गोवा’ने केलेल्या मागण्या

१. १६ मे हा दिवस ‘गोव्याच्या इतिहासातील काळा दिवस’ म्हणून अधिकृतपणे घोषित करावा.

२. गोवा इन्क्विझिशनचा सत्य इतिहास शालेय आणि महाविद्यालयीन पाठ्यपुस्तके यांमध्ये समाविष्ट करावा.

३. गोव्यात उद्ध्वस्त झालेली हिंदूची मंदिरे आणि पीडित हिंदु समाज यांचा इतिहास सार्वजनिकरित्या मांडावा.

४. गोव्यात ‘गोवा इन्क्विझिशन’ संग्रहालयाची स्थापना करावी.

५. पोप यांनी इन्क्विझिशनविषयी गोमंतकीय हिंदूंची सार्वजनिकरित्या क्षमा मागावी.

६. १६ मे या दिवशी सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी अंगावर काळी पट्टी बांधून किंवा काळे वस्त्र परिधान करून घटनेचा निषेध करावा.

७. सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी त्यांच्या सामाजिक माध्यमांतील ‘डीपी’(‘डिस्प्ले पिक्चर’ म्हणजे असे छायाचित्र जे तुमच्या सामाजिक माध्यमाच्या खात्यावर किंवा संदेश पाठवणार्‍या ॲपवर इतरांना दिसते.) काळ्या रंगाचा ठेवून या ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.

८. सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी सामाजिक माध्यमांच्या आधारे गोवा इन्क्विझिशनचा सत्य इतिहास जनतेपर्यंत पोचवावा.