‘जळी-स्थळी अखंड गुरुमय होऊन साधकांना गुरुकृपा लाभत राहो ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

‘गुरुपौर्णिमा हा दिवस आपण गुरुचरणी अत्यंत लीन होऊन साजरा करत असतो. ‘गुरुभक्ती’ ही एक अवस्था आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाचा आरंभबिंदू म्हणजे साधकत्व ! ‘विवेकाचा अंगीकार करणे, विवेकाची कास धरणे’, हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणाच्या विवेकज्योतीवर अविवेकाची काजळी धरू नये; म्हणून साधकांनी दक्ष राहिले पाहिजे. विशेषतः परमार्थ, भक्ती, योगमार्ग, अध्यात्म, अशा क्षेत्रांत सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. ‘सेवा म्हणजे काय ? समर्पण म्हणजे काय ?’ इत्यादी गोष्टी गुरूंमुळेच समजू शकतात, तसेच ‘अहंकार न्यून करणे’, ‘दंभ, प्रसिद्धीचा स्तोम, अपहार, भौतिक संग्रहाचा हव्यास’ इत्यादी प्रलोभने न्यून करणे’, हेही खरे सद्गुरुच करू शकतात; म्हणून ‘जळी-स्थळी अखंड गुरुमय होऊन साधकांना गुरुकृपा लाभत राहो, तसेच सर्व साधकांची भक्तीमय साधना वृद्धींगत होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक व्हावे’, यासाठी श्री दत्तगुरुचरणी प्रार्थना करतो. शुभं ।’

– योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (मासिक ‘धर्मभास्कर’, जुलै २०१०)