आयुष्‍यभर देशासाठी झटणारे आणि निर्विवाद देशप्रेम असलेले सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख !

२ ऑक्‍टोबर २०२३ या दिवशी माजी अर्थमंत्री ‘सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उपाख्‍य सी.डी. देशमुख’ यांची पुण्‍यतिथी झाली. त्‍या निमित्ताने..

१. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांची पार्श्‍वभूमी 

सर चिंतामणराव देशमुख

सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांचा जन्‍म १४ जानेवारी १८९६ या दिवशी रायगड जिल्‍ह्यातील महाडजवळ ‘नाते’ गावात झाला. ते वर्ष १९१२ मध्‍ये मुंबई विद्यापिठाच्‍या मॅट्रिक परिक्षेत पहिले आले, तेही संस्‍कृतची ‘जगन्‍नाथ शंकरशेट’ शिष्‍यवृत्ती मिळवून ! पुढे उच्‍च शिक्षणासाठी ते शिष्‍यवृत्ती घेऊन केंब्रिजला गेले. वर्ष १९१५ मध्‍ये त्‍यांनी वनस्‍पतीशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, आणि भूगर्भशास्‍त्र या तिन्‍ही विषयांमध्‍ये प्रथम क्रमांक पटकावत त्‍यांची पदवी पूर्ण केली. वर्ष १९१८ मध्‍ये वयाच्‍या अवघ्‍या २२ व्‍या वर्षी ते ‘आय.सी.एस्.’ (भारतीय नागरी सेवा) परीक्षेत चक्‍क पहिले आले. लोकमान्‍य टिळक यांना चिंतामणराव यांनी भेटून त्‍यांच्‍याकडे इच्‍छा व्‍यक्‍त केली, ‘सरकारी नोकरी न करता देशकार्य करायची इच्‍छा आहे’; पण लोकमान्‍यांनी त्‍यांना सांगितले, ‘या नोकरीचा अनुभव स्‍वराज्‍यात कामी येईल.’ लोकमान्‍यांची ही विनंती शिरसावंद्य मानून त्‍यांनी सरकारी नोकरी करायचे ठरवले. मध्‍य प्रांतात महसूल, वित्त या खात्‍यांची सचिव पदे भूषवली. या पदांवर काम करणारे चिंतामणराव हे सर्वांत तरुण ‘आय.सी.एस्.’ अधिकारी होते !

२. ‘रिझर्व्‍ह बँके’चे गर्व्‍हनर आणि देशाचे अर्थमंत्री पद भूषवणारे चिंतामणराव !

अनुमाने २१ वर्षे चिंतामणराव यांनी सरकारी नोकरी केली. वर्ष १९३१ मध्‍ये ते गांधीजींसह ‘गोलमेज परिषदे’ला सचिव म्‍हणून गेले होते. वर्ष १९४१ मध्‍ये चिंतामणराव देशमुख ‘रिझर्व्‍ह बँके’चे ‘डेप्‍युटी गव्‍हर्नर’ बनले. ११ ऑगस्‍ट १९४३ या दिवशी बँकेचे गव्‍हर्नर जेम्‍स टेलर यांच्‍या मृत्‍यूनंतर ते रिझर्व्‍ह बँकेचे सर्वांत तरुण आणि पहिले भारतीय गव्‍हर्नर बनले. दुसर्‍या महायुद्धाचे चटके जागतिक अर्थव्‍यवस्‍थेला बसत होते, त्‍या वेळेस चिंतामणराव यांनी योग्‍य उपाययोजना करून अर्थव्‍यवस्‍थेला योग्‍य प्रकारे हाताळले. या कामाविषयी २१ मार्च १९४४ या दिवशी चिंतामणराव देशमुख यांना ब्रिटीश सरकारने ‘सर’ पदवीचा बहुमान दिला. बँकेच्‍या नोकरीत असतांनाच भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या संक्रमण काळात त्‍यांना ‘व्‍हाईसरॉयज कौन्‍सिल’वर ‘वित्तप्रमुख’ म्‍हणून नेमले गेले. वर्ष १९४९ मध्‍ये चिंतामणराव यांनी बँकेच्‍या नोकरीचे त्‍यागपत्र दिले आणि पुन्‍हा इंग्‍लंडमध्‍ये जायची सिद्धता केली होती; कारण वर्ष १९२० मध्‍येच त्‍यांचे रोझिना विलकॉक्‍सशी लग्‍न झाले होते आणि त्‍यांना वर्ष १९२२ मध्‍ये प्रिमरोझ नावाची मुलगीही झाली होती. नेहरूंनी त्‍यांना पुन्‍हा विनंती केल्‍याने त्‍यांनी रिझर्व्‍ह बँकेची धुरा पुन्‍हा सांभाळली. वर्ष १९५२ मध्‍ये चिंतामणराव यांनी कुलाबा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि त्‍यात ते जिंकलेही; कारण ते ‘काँग्रेस’चे सदस्‍य कधीच नव्‍हते. पुढे नेहरूंनी चिंतामणराव यांना अर्थमंत्री बनवले. नंतर त्‍यांनी भाषावार प्रांतरचनेच्‍या मुद्यावरून अप्रसन्‍न होऊन त्‍यागपत्र दिले. त्‍यानंतरही ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (यू.जी.सी.)चे पहिले अध्‍यक्ष म्‍हणून त्‍यांची नेमणूक झाली. चिंतामणराव यांनी शिक्षणक्षेत्रातही भरपूर योगदान दिले. आयुष्‍याच्‍या उत्तरार्धात ते भाग्‍यनगरला (हैद्राबादला) स्‍थायिक झाले आणि २ ऑक्‍टोबर १९८२ या दिवशी त्‍यांचे  निधन झाले.

३. चिंतामणराव यांच्‍या मृत्‍यूच्‍या वेळी शासकीय अनास्‍था !

त्‍यांच्‍या मृत्‍यूची फारशी नोंद भारतीय सरकार दरबारी घेतली गेली नाही. इतकी पदे भूषवलेल्‍या चिंतामणराव यांना साधी सरकारी मानवंदनाही मिळाली नाही. चिंतामणराव यांचे देशप्रेम मात्र निर्विवाद होते. आयुष्‍यभर देशासाठी ते झटले होते. आपली मूळ पाळेमुळे ते कधीच विसरले नव्‍हते. याचे उदाहरण, म्‍हणजे त्‍यांनी इंग्‍लंडमध्‍ये एसेक्‍स परगण्‍यामध्‍ये ‘साऊथ ऐंड ऑन सी’ गावाजवळच्‍या ‘वेस्‍टक्‍लिफ ऑन सी’ गावात एक टुमदार बंगला बांधला होता आणि त्‍याचे त्‍यांनी नाव ठेवले होते ‘रोहा’! कारण रायगड तालुक्‍यातील रोहा हे चिंतामणराव यांचे मूळ गाव ! ते घर आजही बंद आणि पडझड झालेल्‍या अवस्‍थेत कसेतरी उभे आहे. देशभक्‍तांची आणि त्‍यांच्‍याशी निगडीत वास्‍तूंची अशी अनास्‍था करण्‍याची आपली सवयही तशी जुनीच आहे. (अशा कित्‍येक महनियांच्‍या पदरी आलेली उपेक्षा आणि अनास्‍था आताच्‍या केंद्र सरकारने दूर करावी, ही अपेक्षा ! – संपादक)

– श्री. संकेत कुलकर्णी, लंडन

(श्री. संकेत कुलकर्णी यांच्‍या फेसबुकवरून साभार)