क्षात्रतेजयुक्त सावरकर !

मारहाण करण्याचा प्रयत्न करणार्‍या इंग्रज शिपायाला सावरकरांनी खडसावणे !

सावरकरांनी मारिया बोटीतून उडी मारल्यावर मार्सेलिस बंदरावरून पकडून सावरकरांना पुन्हा आगनावेवर नेल्यावर त्यांना बेड्या घालण्यात आल्या. ‘त्यांच्यावर इंग्रज आरक्षक गुप्तपणे आक्रमण  करतील’, असे त्यांना वाटले. त्यामुळे ते अधिक सावध राहिले.

त्या दिवशी रात्री ते डोळे मिटून स्वस्थ झोपले होते. एका शिपायाने अकारण आणि अचानक त्यांच्याविषयी अपशब्द उच्चारले आणि मारहाणीची भाषा बोलू लागला. तसे सावरकर उठून बसले आणि त्याला म्हणाले, ‘‘तू मारहाणीची भीती मला दाखवू नकोस. मी देशस्वातंत्र्याच्या क्रांतीलढ्यात जेव्हा पडलो, तेव्हाच मी माझ्या घरादारावर निखारा ठेवला. तू तुझा विचार कर. अतीप्रसंग करशील, तर बायको मुले तुला मुकतील. माझ्या अंगाला हात जरी लावलास, तरी मी तुला किंवा तुमच्यापैकी एकाला तरी ठार मारल्याखेरीज रहाणार नाही !’’

(एवढे साहसी कृत्य करूनही परत ब्रिटिशांच्या कह्यात गेल्यावर एखाद्याला निराशा येऊ शकते; परंतु भारतीय तत्त्वज्ञानाचा वैचारिक पाया पक्का असल्याने त्यावर मात करून त्यांनी त्यांच्यातील क्षात्रवृत्ती जागृत ठेवली ! – संपादक) (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)


क्षात्रवृत्तीपूर्ण लिखाणाने क्रांतीकारकरूपी हिर्‍यांची खाण निर्माण होणे !

स्वा. सावरकरांचे ओजस्वी वक्तृत्व आणि स्फूर्तीदायी लिखाण यांमुळे तरुणांनाही स्फुरण चढत असे. सावरकरूपी क्षात्रवीराची वाणी आणि त्यांचे क्षात्रतेजपूर्ण लिखाण यांतून त्यांनी देशात अनेक क्रांतीकारकांच्या रूपात हिर्‍याची खाणच सिद्ध केली ! इंग्रजांना झडती घेतांना जवळपास सगळ्या क्रांतीकारकांच्या घरी सावरकरांचे काही ना काही लिखाण मिळाले !


ब्रिटिशांना डावलून तरुणांपुढे क्रांतीचे आदर्श निर्माण करणारे सावरकर !

सावरकरांनी १९०६ ते १९१० या चार वर्षांच्या लंडनमधील वास्तव्यात ‘१८५७ च्या स्वातंत्र्यसमराची गाथा’, ‘मॅझिनीचे आत्मवृत्त’ आणि ‘शिखांचा इतिहास’ या ग्रंथांचे लिखाण केले. स्वातंत्र्य क्रांतीनेच मिळू शकते. त्यासाठी अंहिसा उपयोगाची नाही, असा अप्रत्यक्ष संदेश यातून ब्रिटनमधील भारतीय आणि भारतातील तत्कालीन देशभक्त तरुणांपर्यंत पोचवला गेला ! तत्कालीन भारतीय तरुणांमध्ये ब्रिटिशांप्रती आदर, औत्सुक्य निर्माण झाले होते. या ग्रंथांमुळे ‘ब्रिटीश आदर्श नाहीत’, हे लक्षात आणून देऊन खरे स्फूर्तीदायी असे आदर्श सावरकरांनी त्यांच्यासमोर उभे केले.


स्वा. सावरकरांनी मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी वयाच्या १४ व्या वर्षी घेतलेली शपथ !

‘हे जगदंबे, तुझ्या चरणांची मी शपथ घेतो. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा केतू (ध्वज) उभारून ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन ।’ यशस्वी झालो, तर शिवरायांप्रमाणे मातृभूमीच्या मस्तकी राज्याभिषेक करीन. अयशस्वी ठरलो, तर चापेकरांप्रमाणे फासावर चढेन.’

– (संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी विशेषांक २०१२)


चापेकर बंधूंच्या बलीदानानंतर सशस्त्र क्रांतीची शपथ घेऊन शत्रूंशी आजीवन लढण्याची प्रतिज्ञा !                

एकाच मातेचे ३ पुत्र अवघे २७, २४ आणि १८ वर्षांच्या अल्पायुमध्ये राष्ट्रमातेच्या बलीवेदीवर चढले. चापेकर बंधूंच्या बलीदानाने स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांची निद्राच भंग झाली. शिखांचे १० वे गुरु गोविंदसिंह यांचे पिता, माता, आजी आणि ४ पुत्र यांच्या बलीदानाची स्मृती ताजी झाली. सावरकरांनी चापेकर बंधूंच्या चितेच्या भस्माचा टिळा लावून प्रतिज्ञा केली की, ‘मी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबीन. देशाच्या शत्रूंशी आजीवन लढत राहीन.’ शेवटी सावरकर यांची प्रतिज्ञा रंगली.’ (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’ वर्ष ८ अंक १, एप्रिल २०१७)


मुसलमानांची बांग बंद करावयास लावणारे अत्यंत चतुर सावरकर !

कारागृहात ज्या वेळी मुसलमान बांग देत होते आणि समजून सांगूनही ती बंद करत नव्हते, त्या वेळी सावरकर पटाईत आणि लुटारू बंदीवानांना रामाचा नामजप, तुळशीदासांचे दोहे आणि भजने मोठ्याने म्हणायला लावत अन् त्यांची झोपमोड करत. सरतेशेवटी इंग्रज अधिकार्‍यांना जे जमले नाही, ते ‘जशास तसे’ उत्तर देऊन त्यांनी बंद करून दाखवले. आज सावरकरांच्या विचारांचा एक जरी माणूस राजकारणात असता, तरी गावागावातील ५ वेळा दिली जाणारी बांग बंद झाली असती.

– डॉ. प्रल्हाद कुलकर्णी (‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक, २०१०)


स्वा. सावरकरांच्या क्षात्रवृत्तीची चुणूक !          

  • ‘१० व्या वर्षी ‘जगद्हितेच्छु’ पत्रात ‘स्वदेशीचा फटका’, ‘सवाई माधवरावांचा रंग’ इत्यादी विनायकच्या क्षात्रवृत्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या.
  • १८९३ मध्ये मुंबईत हिंदु-मुसलमान दंगे झाल्यावर ते वृत्त वृत्तपत्रातून वाचून विनायकाने त्याच्या बालसवंगड्यांना एकत्र केले. ‘हिंदु समाज आणि धर्म यांच्या रक्षणार्थ काय केले पाहिजे’, याची चर्चा करून भगूर येथील वेशीबाहेरच्या मशिदीवर आक्रमण करून सूड घेतला ! – डॉ. प्रल्हाद कुलकर्णी (‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक, २०१०)

  • मशिदीवरील आक्रमणाच्या वेळी घाबरलेल्या काही मित्रांसाठी त्यांना उपदेश करून सैनिकी शाळा काढली.

  • ‘ब्रिटीश सत्तेला सुरूंग लावण्यासाठीच मी तिकडे जात आहे !’, असे उद्गार स्वा. सावरकरांनी लंडनला जाण्यापूर्वी झालेल्या निरोप समारंभांत काढले. तिथे जाऊन केलेले क्रांतीकार्य हे जणू ते येथे ठरवूनच गेले होते.

  • १८५७ च्या उठावाला ‘स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणण्याचे पहिले धाडस करणारे स्वा. सावरकर !  – डॉ. सच्चिदानंद शेवडे (श्रीगजानन आशिष, जानेवारी २०११)

  • जगभरातील लोकांना ब्रिटिशांविरुद्ध उभे करण्यासाठी स्वा. सावरकर आयर्लंड, इजिप्त आणि रशिया यांसारख्या अनेक देशांतील क्रांतीकारकांशी गुप्तपणे संपर्क करत होते. – (गजानन आशिष, नोव्हेंबर २०१०)

  • ‘राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदूंचे लष्करीकरण’, हा मंत्र सावरकरांनी सांगितला. (धर्मभास्कर, एप्रिल २०१३)

  • ‘गोळ्या झेलून मरण्यासाठी नाही; मारण्यासाठी जा. अशा प्रकारे आंदोलन करा की, शासनावर दबाव येईल !’ असे सावरकर म्हणत. – श्री. पवन त्रिपाठी, अखिल भारतीय हिंदु महासभा, मध्यप्रदेश.

  • ‘एक धक्का और दो, पाकिस्तान तोड दो’, ही घोषणा प्रथम हिंदु महासभेने दिली होती. – (डॉ. सच्चिदानंद शेवडे, दै. तरुण भारत (२५.१.२००९)

  • सावरकर म्हणजे भारतातील ‘ब्रिटीश साम्राज्याचा निर्माण झालेला सर्वांत मोठा शत्रू’, असे इंग्रज मानत.  

क्रांतीकारक सावरकर !

१. तरुण वयात त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली !

२. अनेक क्रांतीकारकांची चरित्रे लिहून भारतियांना प्रेरणा दिली !

३. स्वतः बंदूक चालवायला शिकले आणि इतरांनाही शिकवले !

४. बाँब बनवण्याची विद्या जाणून घेऊन लोकांना शिकवण्यास साहाय्य केले !

५. तरुण वयातच क्रांतिकारी संघटना स्थापना केली. लोकांना ज्ञान देऊन समजावून सांगितले, प्रोत्साहित केले आणि क्रांतीची ज्योत पेटवून दिली.

– डॉ. प्रल्हाद कुलकर्णी (‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक, २०१०)


सावरकरांच्या क्षात्रतेज जागृत करणार्‍या लिखाणाचे काही प्रसिद्ध नमुने !

 सध्या राष्ट्रास साहित्यिक नकोत, सैनिक हवेत !

‘आज सर्वत्र लक्षावधी तरुण आणि तरुणी कादंबर्‍या वाचण्यात गढून गेले आहेत. चीन संपले ते त्याच्याकडे वाङ्मयीन साहित्य नव्हते; म्हणून नाही, तर सैनिकी साहित्य नव्हते म्हणून ! आपले विस्तीर्ण राष्ट्र आज जगात निर्माल्यवत् पडले आहे, ते आपले साहित्य उणे म्हणून नव्हे, तर शस्त्रबळ उणे म्हणून. तरुणांना निर्वाणीचा संदेश आहे की, राष्ट्रास आज साहित्यिक नकोत सैनिक हवेत. तरुणांनो, प्रथम रायफल क्लबात घुसा. रडगाण्यांच्या आणि रडकथांच्या संमेलनात नंतर वेळ मिळाल्यास जा. – स्वा. सावरकर


राष्ट्रच दुबळे राहिल्यास निर्माण होणारे साहित्यही खुरटे आणि दुबळेच असणार !

ज्या दुबळ्या राष्ट्राला परक्यांची प्रबळ दारू आग लावते, त्यांच्या साहित्यालाही कशी आग लागते ते तक्षशिला आणि नालंदेला विचारा ! राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत साहित्याचे सापेक्ष महत्त्व तिय्यम आहे. तरुण पिढीचे पहिले कर्तव्य आपल्याला उपद्रव देण्याची छातीच ज्यायोगे कोणाला होऊ नये, असे स्वराष्ट्र संरक्षक शस्त्रबळ आम्हाला हवे आहे !

– प्रा. (डॉ.) मनोहर मो. मोघे (‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक २०१०)