हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा पाया असलेल्या कल्याण (जिल्हा ठाणे) येथील दुर्गाडी गडावरही धर्मांधांचे अतिक्रमण !

  • नमाजपठणासाठी अर्धा गडच राखीव ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार !

  • अनधिकृत ‘ईदगाह’ला पोलीस संरक्षण देऊन गडाच्या अर्ध्या भागावर हिंदूंना कायमस्वरूपी प्रवेशबंदी ! (ईदगाह म्हणजे ईदच्या दिवशी नमाजपठण करण्याची जागा)

हिंदूंची अस्मिता असणार्‍या ऐतिहासिक गडांचे ‘हिरवेकरण’ होऊ देणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक 

गडावरील अवैध ईदगाहचे बांधकाम

ठाणे, २० जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवरायांनी केवळ हिंदवी स्वराज्यच नव्हे, तर भारतीय आरमाराची मुहूर्तमेढ ज्या दुर्गाडी गडावर रोवली, त्या गडाचा अर्धा भाग आता धर्मांधांचे धार्मिक केंद्र झाला आहे. या गडावर अवैधपणे बांधण्यात आलेल्या ‘ईदगाह’ला २४ घंटे पोलीस संरक्षण देण्यात आले असून या भागात हिंदूंना कायमस्वरूपी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ‘धार्मिक सलोखा’ राखण्याच्या नावाखाली गडावरील अवैध ‘ईदगाह’ला पोलीस संरक्षण देऊन त्या विरोधात आवाज उठवणार्‍या हिंदूंवर कारवाई करण्याचा हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय सत्ताधार्‍यांकडून चालू आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराच्या मागे काही अंतरावर ‘ईदगाह’ची जागा आहे. या ठिकाणी जाण्यासाठी धर्मांधांना स्वतंत्र रस्ता बांधून देण्यात आला आहे. ‘ईदगाह’साठी येथे एक भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीला गडाच्या इतिहासात कोणताही संदर्भ नाही.

गडावरील मंदिर आणि त्यामागे असलेला अवैध ईदगाह

वर्षातील २ वेळेच्या नमाजपठणासाठी अर्धा गड कायमस्वरूपी राखीव !

या ठिकाणी वर्षातून २ वेळा नमाजपठण करण्यात येते. वर्षातील २ वेळेच्या नमाजपठणासाठी सरकारने संपूर्ण वर्षभर गडाचा अर्धा भाग त्यासाठी राखीव ठेवला असून त्याला २४ घंटे पोलीस संरक्षण दिले आहे. अवैध बांधकामावर कारवाई करण्याऐवजी अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी सर्वपक्षीय सरकारकडून करण्यात येत असलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे !

अवैध ‘ईदगाह’च्या संरक्षणासाठी लाखो रुपयांचा व्यय !

गडावरील या अवैध ‘ईदगाह’च्या रक्षणासाठी गडावर २४ घंटे राज्य राखीव दलाचे पोलीस पहार्‍यासाठी ठेवण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी येथे २७ पोलीस ठेवण्यात आले होते. आता ही संख्या ८ वर आली आहे. अवैध ‘ईदगाह’च्या रक्षणासाठी सरकार लाखो रुपयांचा व्यय करत आहे.

छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या दुर्गाडी गडाचा इतिहास !

कल्याणच्या खाडीच्या बाजूला असलेल्या एका टेकडीवर हा गड बांधण्यात आला आहे. वर्ष १६५७ मध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशाहकडून कल्याण बंदर जिंकून घेतले. त्या वेळी कल्याण हे एक आंतरराष्ट्रीय बंदर होते. बंदर जिंकून घेतल्यावर शिवरायांनी येथे गड बांधला. गडाच्या पायाचे खोदकाम चालू असतांना आबाजी महादेव यांना द्रव्य सापडले. ही दुर्गादेवीची कृपा समजून या गडाला दुर्गाडी असे नाव देण्यात आले. गडावर दुर्गादेवीचे मंदिरही बांधण्यात आले. या गडाच्या आश्रयाने शिवरायांनी येथे हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराच्या कामाला प्रारंभ केला. हे आरमार केवळ हिंदवी स्वराज्याचे नव्हे, तर भारतीय आरमाराचा पाया समजले जाते. आरमार उभारण्यासाठी शिवरायांनी ३४० पोर्तुगीज कारागीर कामाला ठेवल्याची इतिहासात नोंद आहे. पुढे पेशव्यांचे सुभेदार रामजी बिवलकर यांनी गडाची डागडुजी केली. अशा प्रकारे या गडाचे अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व आहे.

स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली गडावरील नमाज पठणाच्या विरोधात हिंदूंचे आंदोलन !

त्या काळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांना गडावरील अवैध नमाजपठणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आनंद दिघे यांनी शिवसैनिकांसह नमाज पठणाच्या वेळी गडावरील मंदिरात घंटानाद आंदोलन केले; मात्र पुढे पोलिसांनी नमाजपठणाच्या कालावधीत आनंद दिघे यांसह शिवसैनिकांना गडावर प्रवेशबंदी चालू केली. आनंद दिघे यांच्या देहावसनानंतर शिवसेनेचे नेते आणि सध्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने गडाच्या डागडुजीचे काम चालू !

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सरकारने गडाच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून दिला असून पूर्वीच्या पद्धतीने गडाच्या डागडुजीचे काम चालू आहे.

हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे केंद्र असलेल्या दुर्गाडी किल्ल्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा न देण्याचा सर्वपक्षीय सरकारचा निंदनीय प्रकार !

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या गडाला ‘राज्य संरक्षित स्मारका’चा दर्जा देण्याची मागणी केली. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही याविषयी सरकारला पत्र लिहिले आहे; मात्र ‘या गडाचे केवळ २ बुरुज शिल्लक आहेत, तसेच गडाचे मूळ स्वरूप स्पष्ट होईल, असे अवशेष राहिलेले नाहीत’, असे कारण देऊन सरकारने या किल्ल्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला नाही.