शहरांमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी माओवाद्यांचे गनिमी आक्रमणाचे षड्यंत्र !

  • कामगार, दलित आणि अल्पसंख्यांक या वर्गांतून समर्थक मिळवण्याचा प्रयत्न

  • षड्यंत्राला पायबंद घालण्यासाठी २६ सप्टेंबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्र्यांची माओवादी प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

देशातून माओवाद समूळ नष्ट करण्यासाठी माओवाद्यांसह त्यांच्या विविध क्षेत्रांतील समर्थकांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक 

मुंबई – माओवाद्यांनी मुंबई, पुणे, नागपूर, देहली आणि कोलकाता या शहरांमध्ये जाळे पुनर्स्थापित केले असून देशाच्या अन्य शहरी भागातही जाळे बळकट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी विविध शहरांमध्ये संघटकांची नियुक्ती केली आहे. माओवादी ‘शहरी मिलिशिया’ (सैन्य) विकसित करून मोठ्या प्रमाणात गनिमी आक्रमणाची रणनीती आखत आहेत. ते सरकारी गुप्तचर यंत्रणांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘हिंदुत्वाच्या राजकारणातून उद्भवलेल्या तक्रारींचे भांडवल करण्याची वेळ आली आहे’, असे त्यांना वाटते. ‘जर प्रशासनाने माओवाद्यांच्या शहरी योजनेचे गांभीर्य लवकर ओळखले नाही, तर देशातील विविध शहरांना हिंसाचाराला सामोरे जावे लागू शकते’, अशी चेतावणी सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात सरकार सतर्क झाले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २६ सप्टेंबर या दिवशी सर्व माओवादी प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये या राज्यांना भेडसावणार्‍या समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

१. ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी नियतकालिकामध्ये माओवाद्यांच्या षड्यंत्रासंदर्भात नुकतेच एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याप्रमाणे कोरेगाव भीमा प्रकरणी माओवाद्यांच्या शहरी नेतृत्वाच्या विरोधात मोठी कारवाई झाली होती. त्यामुळे त्यांचे देशविरोधी कार्य शिथिल झाले होते. आता त्यांनी परत शहरी जाळ्याची पुनर्बांधणी करणे चालू केले आहे. या योजनेच्या कार्यवाहीसाठी त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) ७ केंद्रीय समिती सदस्यांची नेमणूक केली आहे.

२. माओवाद्यांनी त्यांच्या नियोजनावर चर्चा आणि कार्यवाही करण्यासाठी नियमितपणे ‘ऑनलाईन’ बैठका घेणे चालू आहे.