व्यक्तीला चौकशीसाठी बोलावतांना तक्रारीची प्रत देणे अनिवार्य ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – एखाद्या व्यक्तीच्या प्राथमिक चौकशीसाठी बोलावतांना, तसेच गुन्हा नोंदवण्यापूर्वी किंवा नंतर त्या व्यक्तीला नोटिसीसह तक्रारीची प्रत देणे अनिवार्य आहे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिला.

एका आस्थापनाच्या विरोधातील खटल्यात व्यक्तीला नोटीस बजावतांना तक्रारीची प्रत देण्यात आली नव्हती, तसेच सातत्याने अन्य प्रकरणांतही असे लक्षात आल्याचे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने वरील आदेश दिला. (मुळातच उच्च न्यायालयाला असा आदेश पोलिसांना का द्यावा लागतो ? कायद्यात याविषयीचे प्रावधान असतांना पोलीस त्याचे पालन का करत नाहीत ?, याविषयीही उच्च न्यायालयाने विचारणा करायला हवी ! यावरूनच पोलीस कायद्याचे किती पालन करत असतील, हे स्पष्ट होते ! – संपादक) पोलिसांकडून तक्रारीचा तपशीलही सांगितला जात नाही, हे न्यायाच्या तत्त्वाचे उल्लंघन असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार घेऊन वरील आदेश दिला.