नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर केवळ अर्ध्या घंट्यात जाता येईल ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर केवळ अर्ध्या तासात

मुंबई – केंद्रीय मिठागार मंत्रालयाने स्वत:ची भूमी महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे दहिसर ते भाईंदर या महामार्गाच्या निर्माणातील मोठा अडथळा दूर झाला आहे. येत्या ३ वर्षांत हा मार्ग सिद्ध झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर सागरी किनारा मार्गाद्वारे अर्धा घंट्यात पूर्ण करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

ते म्हणाले, मागील ४-५ वर्षे सातत्याने केंद्रीय मिठागार मंत्रालय आणि राज्यशासन यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे दहिसर-भाईंदर ६० मीटर रस्त्यामधील ५३.१७ एकर जागा केंद्रीय मीठागार मंत्रालयाने राज्यशासनाच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मान्यता दिली आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सागरी किनारा मार्ग उत्तनपर्यंत येणार आहे. तेथून दहिसर-भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मीरारोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत येऊन तेथून वसई आणि विरार या शहराला जोडला जाणार आहे.