स्पर्धा परीक्षेत निवड होऊन साडेतीन वर्षे नियुक्ती नाही !

उमेदावारांचे ‘भीक मागो’ आंदोलन

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एम्.पी.एस्.सी.) ‘स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९’ या परीक्षेतून ‘गट अ’ आणि ‘गट ब’ (राजपत्रित) पदांसाठी १ सहस्र १४३ उमेदवारांची निवड झाली आहे. निवड झाल्यापासून साडेतीन वर्षे होत आली तरीही उमेदवारांची नियुक्ती झाली नाही. या उमेदवारांमध्ये अस्वस्थता असून, तातडीने नियुक्ती मिळावी यासाठी २३ ऑगस्ट या दिवशी सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवड झालेल्या उमेदवारांनी प्रातिनिधिक स्वरूपात लोटांगण घालून तात्काळ नियुक्ती मिळण्यासाठी ‘भीक मागो’ आंदोलन केले.

दहीहंडीच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्याची, गोविंदांना खेळाडू आरक्षणातून सरकारी नोकरी देण्याची, प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याची घोेषणा राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. या निर्णयालाही या आंदोलनातून विरोध करण्यात येत आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेतील विद्यार्थी म्हणाले, ‘‘सर्व पातळ्यांवर निवेदने देऊन विनंती करून झाली; मात्र सरकारने कायमच आमच्याकडे दुदुर्लक्ष केले आहे.’’

संपादकीय भूमिका 

असे आंदोलन का करावे लागते ? साडतीन वर्षे नियुक्ती न झाल्यामुळे उमेदवारांची झालेली हानी सरकार भरून देणार का ?