सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या प्रासंगिक सेवा करणार्‍या साधकांच्या सत्संगांना मिळत असलेला उत्तम प्रतिसाद !

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी आरंभी पश्चिम सोलापूर येथे आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अन् गोवा येथे प्रासंगिक सेवा करणार्‍या साधकांसाठी सत्संग चालू केले. त्यामुळे प्रासंगिक सेवा करणारे साधकही दायित्व घेऊन सेवा करू लागले आहेत. या सत्संगांमुळे साधकांची सकारात्मकता आणि कृतीशीलता वाढली आहे. सद्गुरु स्वातीताई स्वतःच हे सत्संग घेतात. सद्गुरु स्वातीताईंची साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ पुष्कळ असते. ‘साधकांचा सेवेतील सहभाग वाढावा’, यासाठीही सद्गुरु स्वातीताई पुष्कळ प्रयत्न करतात.

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी केलेल्या विविध विषयांवरील मार्गदर्शनात साधकांना जाणवलेली सूत्रे

या सत्संगांत सद्गुरु स्वातीताईंनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना, साधकांच्या जीवनातील गुरुदेवांचे महत्त्व, नामजपाचे महत्त्व आणि लाभ, व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन कसे करायचे ?’ इत्यादी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. त्या वेळी साधकांची भावजागृती होऊन त्यांना पुढीलप्रमाणे प्रयत्न करण्यास दिशा मिळाली.

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महत्त्व आणि त्यांचे जीवनचरित्र : सद्गुरु स्वाती खाडये यांनी सत्संगात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महत्त्व आणि त्यांचे जीवनचरित्र’ हा विषय घेतला. तेव्हा सर्वच साधकांची भावजागृती झाली. ‘आपण इतकी वर्षे साधना केली नाही’, याची त्यांना खंत वाटली आणि ‘आता नव्याने प्रयत्न करूया’, असे त्यांना वाटू लागले.

१ आ. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म : सत्संगात सद्गुरु स्वातीताईंनी हा विषय घेतल्यावर ‘आपल्या जीवनात घडलेले सगळे प्रसंग आपले प्रारब्ध आणि संचित यांमुळे घडले’, याची साधकांना जाणीव झाली. त्यामुळे सगळ्यांची सकारात्मकता आणि प्रयत्न करण्याचा उत्साह वाढला.

१ इ. प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप कसा शोधायचा ? : आधी साधकांना प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधणे कठीण वाटायचे; पण त्यांच्या मनाची सकारात्मकता वाढल्यामुळे त्यांचे त्यानुसार नामजपादी उपाय करण्याचे प्रयत्न वाढले.

१ ई. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण कशी करायची ? : या विषयावर मार्गदर्शन मिळाल्यावर साधकांचे भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याचे प्रयत्न वाढले आणि त्यांचा सेवेतील सहभागही वाढला.

१ उ. ‘स्वभावदोष आणि अहं’ म्हणजे काय ? त्यांच्या निर्मूलनासाठी कसे प्रयत्न करायचे ? : या सत्संगात साधकांना सारणी लिखाण आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेमध्ये येणार्‍या अडचणी यांवर मार्गदर्शन मिळाल्याने साधकांचे त्यासाठीचे प्रयत्न वाढले.

पहिल्या सत्संगात गुरुदेवांची महती कळल्याने सगळ्यांची सकारात्मकता वाढली आणि भावजागृती झाली. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला सत्संग घेण्याचे नियोजन करण्यात आले. हे सर्व विषय ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे सत्संगात दाखवले. (‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’ (PPT) – माहिती सांगण्याची संगणकीय प्रणाली.) ते पहातांना सर्व साधक भावविश्वात गेले आणि त्यांना गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून ‘आपण आता व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करायला हवेत’, असे वाटू लागले.’

२. सत्संगांनंतर साधकांमध्ये जाणवलेले पालट

२ अ. कोल्हापूर

२ अ १. श्री. दूंडाप्पा धगाटे : ‘हे सत्संगाला नियमित उपस्थित असतात. सत्संगाशी जोडले गेल्यापासून ते प्रतिदिन सकाळी अर्धा घंटा बसून, कामावर येता-जाता आणि शेतात काम करतांना नामजप करतात. ते सत्संगामधे सांगितलेले आध्यात्मिक उपाय नियमित करतात आणि आवरणही काढतात. ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या साहित्याची ने-आण करणे, समाजातील व्यक्तींना भ्रमणभाषमध्ये नामजप ‘डाऊनलोड’ (download) करण्यास सांगणे आणि त्यांना अर्पण देण्यासाठी उद्युक्त करणे, अशा प्रकारच्या समष्टी सेवाही करत आहेत.

२ अ २. श्री. अनिल ठाणेकर : हे नियमित सत्संग ऐकतात. त्यामुळे त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगल्या प्रकारे होत आहे. त्यांनी २० – २५ जणांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला कोरोनाचा प्रतिबंधात्मक नामजप पाठवला आहे. ते त्यांच्या कार्यालयात प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी २ घंटे भ्रमणभाषवर नामजप लावतात.

२ अ ३. श्री. दशरथ गोडसे : श्री. गोडसे यांना पूर्वी सत्संग ऐकण्याचा कंटाळा येत असे; पण सद्गुरु स्वातीताईंचा पहिला सत्संग ऐकल्यापासून ते नियमितपणे सत्संग ऐकतात आणि सत्संगामधे सहभागही घेतात. ते स्वतःला पालटण्यासाठी प्रयत्न करतात. आता ‘अधिकारवाणीने बोलणे’, हा त्यांचा अहंचा पैलू न्यून झाला असून त्यांच्यात नम्रता वाढली आहे. आता ते सेवेत नियमित सहभागी होऊन ‘ऑनलाईन’ सेवाही करू लागले आहेत.

२ आ.  सातारा

२ आ १. श्री. भंडारे  : हे सद्गुरु स्वातीताईंच्या सत्संगाशी जोडले गेल्यापासून दायित्व घेऊन सेवा करायला लागले आहेत. सद्गुरु स्वातीताईंच्या सत्संगानंतर त्यांनी स्वतःहून गुरुपौर्णिमेची २ प्रवचने आयोजित केली. त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या छापखान्यातील (प्रेसमधील) महिला यांच्यासाठी ‘वटपौर्णिमा’ या विषयावर प्रवचने आयोजित केली. त्यांनी इतरांना अर्पणाचे महत्त्व सांगून अर्पण घेण्यास आरंभ केला. व्यवसायानिमित्त अनेक लोक त्यांच्या संपर्कात येतात. श्री. भंडारे त्यांना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नामजपाचे महत्त्व सांगून ‘तो नामजप ‘डाऊनलोड’ कसा करायचा ?’, ते शिकवतात.

२ इ. पुणे

२ इ १. एक साधिका – एकदा सत्संगाला विरोध करणार्‍या यजमानांची सत्संगात गुरुदेवांविषयी सांगितलेली माहिती ऐकत असतांना भावजागृती होणे आणि त्यांच्या घरातील त्रास अल्प होणे : आरंभी यांना सेवा करण्यास त्यांच्या यजमानांचा विरोध होता. त्या प्रासंगिक सेवा करणार्‍या साधिका म्हणून सत्संगाशी जोडल्या गेल्या होत्या. एकदा सत्संगामध्ये गुरुदेवांविषयी सांगितलेली माहिती ऐकत असतांना त्यांच्या यजमानांची भावजागृती झाली. आता उभयतांना ‘घरातील त्रास अल्प झाला आहे’, असेही जाणवले. त्यामुळे आता त्या साधिकेचा सेवेतील सहभाग वाढला आहे.

२ ई. सोलापूर

२ ई १. सौ. सुनीता टाकसाळे

अ. सौ. सुनीता टाकसाळे मागील १५ वर्षांपासून सनातनच्या कार्याशी जोडलेल्या आहेत. काही कारणास्तव त्यांना सेवा करण्यास अडचण येत होती. प्रासंगिक सेवा करणार्‍या साधकांचा सत्संग चालू झाल्यापासून त्या पुन्हा कृतीशील झाल्या आहेत. त्यांच्या कौटुंबिक जीवनात फार संघर्ष असूनही आता त्या सतत आनंदी आणि सकारात्मक असतात.

आ. सौ. टाकसाळे यांच्या पायाला अपघात झाल्यामुळे त्यांना फारसे चालता येत नाही. प्रत्येक वेळी त्यांना वाहनानेच बाहेर जावे लागते; पण त्याचे दुःख न करता त्या त्यातून मार्ग काढतात. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा असून त्या सतत कृतज्ञताभावात असतात.

इ. त्या त्यांची मुलगी कु. तृप्ती हिला सेवेत साहाय्य करतात.

ई. त्या ‘विकारांनुसार नामजप-उपाय’ या ग्रंथातील नामजप ज्यांना ज्यांना आवश्यक आहे, त्यांना सांगतात. त्या पाटबंधारे खात्यातील त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना अध्यात्म, साधना आणि अर्पण यांचे महत्त्व सांगतात.

उ. त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण घेण्यास आरंभ करून अल्प कालावधीत अर्पणाची पावतीपुस्तके संपवली. त्या अध्यात्माविषयीची सूत्रे भावपूर्णपणे सांगतात. त्यांनी एका व्यक्तीला अर्पणाचे महत्त्व सांगितल्यावर ती व्यक्ती प्रभावित झाली. त्या व्यक्तीने अर्पण दिल्यावर तिचे न्यायालयातील काम यशस्वी झाले. त्या व्यक्तीने ही अनुभूती स्वतःच्या बहिणीला सांगून बहिणीलाही अर्पण देण्यास उद्युक्त केले.

२ ई २. श्रीमती वासंती इनामदार : यांनी सत्संगामधे सांगितल्याप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन केले. त्यांनी नियोजनाप्रमाणे प्रतिदिन १० जिज्ञासूंना चिकाटीने संपर्क केला आणि एका मासात ३०० जणांशी संपर्क केला.

२ ई ३. सत्संगातील अन्य साधक : सत्संगातील बर्‍याच साधकांनी सांगितले, ‘आम्ही काहीच साधना करत नव्हतो, तरीही गुरुमाऊलीने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हाला जवळ केले.

या सत्संगांच्या माध्यमातून त्यांनी आमची साधना पुन्हा चालू करून घेतली.’ त्या साधकांना सत्संगात सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवते. त्यामुळे बरेचसे साधक सत्संगाची वाट पहात असतात. सर्वांची सकारात्मकता, उत्साह आणि पुढाकार घेण्याचा भाग वाढला आहे. आता त्यांना साधनेतून आनंद मिळू लागला आहे.

श्री गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) ही साधकपुष्पे जलद गतीने श्री गुरुचरणी समर्पित होत आहेत. त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (१९.४.२०२२)

धारिका वाचल्यावर गुरुदेवांप्रती व्यक्त झालेली कृतज्ञता !

‘ही धारिका वाचून माझी श्री गुरुरायांप्रती शब्दातीत कृतज्ञता व्यक्त झाली. एकदा श्री गुरूंनी हात धरला की, ते साधकाला पूर्णत्वाला नेईपर्यंत सोडत नाहीत. साधकांची आध्यात्मिक उन्नती करवून घेण्याची तळमळ श्री गुरूंनाच अधिक असते. काही कारणे किंवा स्वभावदोष यांमुळे साधक काही काळासाठी दुरावला, तरी गुरुमाऊली अपार प्रीतीने पुन्हा साधकांनी नव्याने प्रयत्न करण्यासाठी सद्गुरु आणि संत यांच्या माध्यमातून नवनवीन उपाययोजना काढतात आणि साधकाला भरभरून आनंद अन् अनुभूती देतात.’ – सौ. अमृता देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (१९.४.२०२२)