ईदच्या दिवशी गायींची हत्या होऊ देऊ नका ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

(डावीकडे) राहुल नार्वेकर, (उजवीकडे)रजनीश सेठ

मुंबई – बकरी ईदच्या दिवशी गायींची हत्या होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी पोलिसांना दिले आहेत. याविषयी ९ जुलै या दिवशी अधिवक्ता नार्वेकर यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र लिहिले आहे. अध्यक्षांकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस अधिकार्‍यांना यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

या पत्रामध्ये अधिवक्ता नार्वेकर यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रात गायीच्या हत्येला अनुमती नाही. बकरी ईदच्या दिवशी गायींचा बळी दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात कुठेही गायींची हत्या होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घ्यावी.’’ महाराष्ट्रात गोवंश आणि गो हत्या बंदी कायदा आहे. असे असतांनाही राज्यात गोवंश आणि गो हत्येच्या अनेक घटना घडत आहेत. विधानसभेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गोप्रेमींकडून, तसेच विविध स्तरांवरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • ईदच्या दिवशी गोहत्या होऊ न देण्याविषयीच्या निर्देशांचे पालन होण्यासाठी प्रशासन दक्ष राहील का ?
  • विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अभिनंदनीयच आहे; परंतु केवळ ईदच्या दिवशीच नव्हे, तर राज्यात नियमितपणे मोठ्या प्रमाणात गोहत्या चालू आहेत. विधानसभा अध्यक्षांनी गोहत्या बंदी कायद्याचे कठोर पालन करण्यास सांगावे !