‘साधनेत अंतर्मुखता का हवी ?’ याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधिकेला केलेले मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधिकेला ‘नामजप अंतर्मनात जाईल, तसे विचारांचे प्रमाण न्यून होईल’, असे सांगणे आणि तिला नामजपामुळे विचारांची तीव्रता न्यून झाल्याचे जाणवणे 

सौ. नम्रता वानखडे : ‘प.पू. डॉक्टर, पूर्वी माझा चेहरा गंभीर असायचा. तेव्हा तुम्ही मला सांगितले होते की, ‘जेव्हा नामजप अंतर्मनात जाईल, तसे विचारांचे प्रमाण न्यून होत जाईल !’ गेल्या ३ – ४ मासांपासून मला असे अनुभवायला मिळत आहे की, ‘माझ्या मनाच्या आतमध्ये विचारांचे प्रमाण अल्पच असते, म्हणजे ‘विचार नसतात’, असे नाही; पण पूर्वीच्या तुलनेत त्यांची तीव्रता आता न्यून झाली आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान !

सौ. नम्रता वानखडे

सौ. नम्रता वानखडे : बर्‍याच वेळा असेही लक्षात येते की, ‘मी झोपलेले असते, तेव्हा माझा ‘महाशून्य’ किंवा ‘निर्गुण’ हा जप चालू असतो आणि सकाळी जाग आल्यानंतरही ‘तोच जप चालू आहे’, असे माझ्या लक्षात येते. पूर्वी ‘बहिर्मुखता’ न्यून करण्यासाठी मला पुष्कळ प्रयत्न करावे लागायचे आणि ‘प्रयत्न करूनही बहिर्मुखता न्यून होत नाही’, असे वाटून मला निराशा यायची; पण आता नामजप सतत होत असल्यामुळे इतरांकडे पहाण्याच्या माझ्या दृष्टीकोनात पालट होत आहे, उदा. समोरचा कसाही वागत असला, तरी ‘तो तसा वागण्यामागे काहीतरी कारण असेल’, असा पहिला विचार माझ्या मनात येतो. त्यामुळे ‘पूर्वग्रह’ आणि ‘बहिर्मुखता’ न वाढता ती हळूहळू न्यून होत आहे.

२. बहिर्मुखतेने साधकांची प्रगती होत नसून केवळ नामजपानेच आध्यात्मिक प्रगती होते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान ! आपल्याला बहिर्मुखता नको, तर अंतर्मुखताच पाहिजे. आपल्या मनात देवाचाच विचार असायला पाहिजे. ‘हा असा का वागतो ?’, असा विचार करायचा नाही. एखाद्याचे वागणे बरोबर वाटले नाही, तर त्याविषयी कुणाशी तरी बोलायचे.

सौ. नम्रता वानखडे : ‘लक्षपूर्वक नामजप केल्यामुळे मनातील विचारांची प्रक्रिया हळूहळू न्यून होत आहे’, हे लक्षात येते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान आहे. बहिर्मुखतेने इतरांचा विचार करून स्वतःची प्रगती होत नाही. आपल्या नामजपानेच आपली प्रगती होते ना !’