बी.ए.च्या प्रश्नपत्रिकेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि मनुस्मृति यांच्याविषीच्या प्रश्नांना अंनिसकडून राज्यघटनाविरोधी ठरवण्याचा प्रयत्न !

मुंबई – नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या बी.ए.च्या (कला शाखेच्या) तृतीय वर्षाच्या ‘राज्यशास्त्र’ विषयाच्या परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आणि मनुस्मृति यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर आक्षेप घेत या प्रश्नांना अंनिसने राज्यघटनाविरोधी ठरवले आहे. ‘याविषयी प्रसिद्धीपत्रक काढून विद्यापिठाने क्षमायाचना करावी’, अशी मागणी अंनिसने केली आहे.

या प्रश्नपत्रिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा ?’, तसेच ‘मनुस्मृति’ या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा ?’, या प्रश्नांवरून अंनिसला पोटशूळ उठला आहे. याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये अंनिसने म्हटले आहे की, शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याच्या तत्त्वाला हरताळ फासण्याचा हा प्रकार आहे. यशवंतराव चव्हाण यांचे नाव असलेल्या विद्यापिठात राज्यघटनाविरोधी अभ्यासक्रमाचा समावेश कसा आणि कुणाद्वारे करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांची भेट झाली नसल्याचे इतिहास संशोधक आणि उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने निकालात म्हटले आहे. असे असतांना असा खोटा इतिहास कोण जाणूनबुजून शिकवत आहे ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचा इतिहास सांगून अपकीर्ती केली जात आहे.

या प्रसिद्धीपत्रकावर अंनिसचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील आणि कार्याध्यक्ष माधव बावगे यांची स्वाक्षरी आहे.

संपादकीय भूमिका

  • छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या कार्याविषयी कधी अभिमानही व्यक्त न करणार्‍या अंनिसवाल्यांनी त्यांच्याविषयीच्या प्रश्नावर आक्षेप घेणे, हेच हास्पास्पद होय !
  • स्वराज्याचे शत्रू औरंगजेब, अफझलखान यांच्या कबरीच्या उदात्तीकरणाविषयी अंनिसकडून कधी आक्षेप का घेण्यात आला नाही ?  राज्यघटनेचा उपयोग सोयीनुसार करणारे अंनिसवाले !
  • राज्यघटना लिहितांनाही हिंदूंचा प्राचीन आणि कायदाव्यवस्थेची माहिती असलेला ग्रंथ मनुस्मृति याचा आधार घेतला आहे, हे अंनिसला ठाऊक आहे का ? केवळ विरोधासाठी विरोध करणारी जातीद्वेषी अंनिस !