भारताकडे साहाय्याची याचना करणार्‍या युक्रेनने एकेकाळी केला होता भारताच्या अणुचाचणीला विरोध !

भारताने वर्ष १९९८ मध्ये केलेल्या अणुचाचणीच्या वेळचे छायाचित्र

नवी देहली – रशियाकडून होणार्‍या आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर युक्रेनने भारताकडे साहाय्य करण्याची याचना केली आहे. तथापि याच युक्रेनने भारताने वर्ष १९९८ मध्ये केलेल्या अणुचाचणीला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत विरोध केला होता, तसेच या सुरक्षा परिषदेत भारताच्या विरोधात मतदानही केले होते. युक्रेनच्या या भारतविरोधी भूमिकेची सामाजिक माध्यमांवर चर्चा चालू आहे. वर्ष १९९८ मध्ये जगभरातील २५ देशांनी भारताला विरोध केला होता.

युद्धाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे २४ फेब्रुवारीला युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमिर झेलेंस्की यांच्या सरकारने ‘भारताचे रशियाशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे रशियाची आक्रमणे रोखण्यात करण्यात भारत उत्तम निर्णायक भूमिका बजावू शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित हस्तक्षेप रशिया आणि युक्रेनच्या पंतप्रधानांशी संपर्क साधावा’, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांना केले होते.