पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राज्यात ‘वाहनमुक्त दिवस’ पाळण्यास प्रारंभ !

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी देशवासियांना केलेल्या आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ‘नो व्हेईकल डे’ (वाहनमुक्त दिवस) पाळण्यास प्रारंभ झाला आहे.

१. राज्यमंत्री, तसेच परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीच्या जनतेला १७ मे या दिवशी वाहनमुक्त दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे. ‘अती आवश्यकता असल्यासच दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वापर करावा’, असे त्यांनी सांगितले.

२. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी कागल तालुक्यातील सेनापती कापशी या गावापासून ६० किलोमीटरचा प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या बसने केला. दसरा चौकातून त्या रिक्शाने जिल्हा परिषदेपर्यंत आल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक शुक्रवारी वाहनमुक्त दिवस पाळण्याचे ठरवण्यात आले आहे.

३. नागपूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी प्रत्येक सोमवारी सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार आहेत. १८ मेपासून या उपक्रमास प्रारंभ होईल. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी हे सोमवार, १८ मे या दिवशी कार्यालयापर्यंत चालत जातील.

संपादकीय भूमिका

प्रत्येकानेच राष्ट्रनिष्ठेने असे प्रयत्न केल्यास देश संकटकाळात तरून निघेल !