(म्हणे) ‘पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास अनुमती नाही !’ – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

राहुल रेखावार

कोल्हापूर, ३ सप्टेंबर (वार्ता.) – पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास अनुमती नाही, अशी ठाम भूमिका कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत २ सप्टेंबर या दिवशी स्पष्ट केली होती. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी म्हणाले होते, ‘‘मुंबई येथे झालेल्या बैठकीत पंचगंगा नदीत विसर्जन करण्यास आडकाठी नाही, असे सांगण्यात आले होते; मात्र आम्ही तात्काळ प्रदूषण नियंत्रण मंडळ, न्यायालय, हरित लवाद यांचे विविध आदेश शासनाकडे पाठवले. वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह करू नये, यासाठी कोणताही शास्त्रीय आधार नाही.’’

कारखान्यांचे सांडपाणी, तसेच अन्य ज्या ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होते त्या सर्वांवर आम्ही कारवाई करत आहोत. नुकतीच प्रदूषण मंडळाने महापालिका प्रशासनास कारवाईची नोटीस दिली आहे, असे या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. (गेली अनेक वर्षे प्रचंड प्रमाणात कारखान्यांच्या सांडपाण्याद्वारे सातत्याने नदीत प्रदूषण होत असतांना आता एवढ्या उशिरा नोटीस का दिली ? – संपादक)

या संदर्भात मी स्वत: आमदार प्रकाश आवाडे यांच्याशीही बोललो आहे. ‘पंचगंगा नदीतच विसर्जन’, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेणे निराशाजनक आहे. यामुळे आपण चार पावले मागे येतो. आपण नेहमी बुद्धीप्रामाण्यवादाचाच आग्रह धरला पाहिजे. इचलकरंजी आणि कोल्हापूर यांसह अनके ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले असून त्यातच श्री गणेशमूर्ती विसर्जन करावे. (बुद्धीप्रामाण्यावादाचा आग्रह धरणार्‍या जिल्हाधिकार्‍यांनी धर्मशास्त्र समजून घेऊन त्याविषयीचे निर्णय घेणे अपेक्षित आहे ! – संपादक)

  • प्रदूषणाच्या खर्‍या कारणांकडे दुर्लक्ष करून धार्मिक कृतींना प्रतिबंध करण्याची प्रशासनाची मानसिकता हिंदुद्वेष्टीच !
  • नदीत सिद्ध केलेल्या विसर्जन कुंडात विसर्जन करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०१३ च्या सूचनांनुसार अनुमती दिली आहे, हे जिल्हाधिकारी का सांगत नाहीत ?
  • जिल्हाधिकारी राहुल रेखावार ‘वहात्या पाण्यात विसर्जन करू नये’, याला शास्त्रीय आधार नाही, हे कुठल्या आधारावर सांगत आहेत ? त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला आहे का ? ज्या शास्त्राचा अभ्यास नाही, त्यावर अधिकारवाणीने भाष्य करणे योग्य नव्हे !
  • जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, हरित लवाद आदींचे सर्व आदेश पत्रकार परिषदेत  का जाहीर केले नाहीत ? त्यामुळे नेमके आदेश काय आहेत, ते सर्वांना कळले असते !
  • या प्रसंगी मूर्ती विसर्जनानंतर प्रदूषण वाढते ? असा कोणता अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे आहे का ? असा प्रश्न ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विचारल्यावर, ‘‘असा कोणता अहवाल नसला, तरी ०.०१ टक्के जरी प्रदूषण होत असले, तरी आपण ते करणार का ? प्लास्टर ऑफ परिसची मूर्ती आणि रासायनिक रंग यांमुळे प्रदूषण होते’’, असे उत्तर जिल्हाधिकार्‍यांनी दिले.