Shyam Manav Conspiracy To Put Leaders In Jail  : उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांना कारागृहात डांबण्‍याचा कट होता ! – श्‍याम मानव, अध्‍यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नकार दिल्‍याने ते कारागृहात गेले !  

नागपूर – अंमलबजावणी संचालनालयाच्‍या (‘ईडी’च्‍या) कारवाईपासून वाचण्‍यासाठी तत्‍कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍यापुढे काही गोष्‍टी ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या. यामध्‍ये तत्‍कालीन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि आमदार आदित्‍य ठाकरे यांना खोट्या प्रकरणांत कारागृहात डांबण्‍याचा डाव होता; पण अनिल देशमुख यांनी यासंबंधीच्‍या प्रतिज्ञापत्रांवर स्‍वाक्षरी करण्‍यास नकार दिल्‍यामुळे हे सर्व वाचले. नंतर या प्रकरणात देशमुख यांना १३ मास कारागृहात जाण्‍याची वेळ आली, असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्‍यक्ष श्‍याम मानव यांनी २४ जुलै या दिवशी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केला आहे.

श्‍याम मानव म्‍हणाले की, खासदार संजय राऊत यांच्‍या विरोधात आतापर्यंत काही सिद्ध झाले आहे का ? अनिल देशमुख यांच्‍याकडे तेव्‍हा सातत्‍याने तुमच्‍याकडे पाठवण्‍यात आलेल्‍या ४ प्रतिज्ञापत्रांवर स्‍वाक्षरी करण्‍याचे निरोप जात होते. यांपैकी १ प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले आणि ‘प्रतिमहा १०० कोटी गोळा करून द्या’ असे आदेश देणारे होते. दुसरे प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्‍य ठाकरे यांनी दिशा सालियान या तरुणीवर अत्‍याचार करून खून केल्‍याचे होते. तिसरे प्रतिज्ञापत्र अनिल परब यांच्‍या कथित गैरव्‍यवहारांवर स्‍वाक्षरी करण्‍यासंबंधीचे होते. तर शेवटचे चौथे प्रतिज्ञापत्र तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी गुटखा व्‍यावसायिकांकडून पैसे गोळा करून देण्‍यासंबंधीचे होते.

अनिल देशमुख व श्‍याम मानव

अनिल देशमुख यांच्‍याकडून दावा खरा असल्‍याची पुष्‍टी !  

पत्रकारांनी ‘त्‍यांना ही प्रतिज्ञापत्रे कुणी पाठवली ?’ असा प्रश्‍न केला; पण श्‍याम मानव त्‍या व्‍यक्‍तीचे नाव सांगण्‍यास नकार दिला. दुसरीकडे अनिल देशमुख यांनी श्‍याम मानव यांनी केलेला दावा खरा असल्‍याची पुष्‍टी केली आहे, तसेच त्‍यांनी या प्रकरणी थेट उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यावर आरोप केले आहेत. अनिल देशमुख म्‍हणाले की, या दाव्‍यांविषयी माझ्‍याकडे पुरावे आहेत. ३ वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्राद्वारे उद्धव ठाकरे आणि आदित्‍य ठाकरे यांच्‍यावर खोटे आरोप करण्‍यास मला सांगण्‍यात आले. मी त्‍याला नकार दिल्‍यामुळे माझ्‍यावर ‘ईडी आणि सीबीआय’च्‍या माध्‍यमातून कारवाई करण्‍यात आली. यामागे देवेंद्र फडणवीस होते. त्‍यांनी त्‍यांच्‍या जवळचा एक माणूस माझ्‍याकडे पाठवला होता. या व्‍यक्‍तीने माझे अनेकदा फडणवीस यांच्‍याशी बोलणे करून दिले होते.