सनातन धर्म संपवण्याविषयी ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवणार !

डावीकडून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष श्री. राकेश नलावडे, पत्रकार परिषदेत बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि समितीचे श्री. संजय जोशी

रत्नागिरी – भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतांनाही उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची अतिरेकी अन् शहरी नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्रात निखिल वागळे यांच्यासारखे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे पत्रकार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हेही सनातन धर्म संपवण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित करून ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे’, अशा प्रकारची विषारी टीका करत आहेत.  दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने २८ एप्रिल २०२३ या दिवशी दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, जर कुणी ‘हेट स्पीच’ (विद्वेषी विधाने) करून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्वतःच नोंद घेऊन घेऊन प्राथमिक तक्रार (FIR) प्रविष्ट केली पाहिजे. यात सरकारने विलंब केल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानला जाईल. इतका स्पष्ट आदेश असतांनाही १०० कोटी हिंदू असणार्‍या सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्य करणार्‍यांवर अद्याप गुन्हा का नोंदवला जात नाही ? त्यामुळेच सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत सनातन धर्मियांत जागृती करणारी व्याख्याने, बैठका घेणे, तसेच ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणे, अशा प्रकारच्या कृती केल्या जाणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली.

सहिष्णुता, बंधुत्व आणि विश्‍वकल्याण यांच्यासाठी सुपरिचित असणारा सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांकडून सातत्याने षड्यंत्रे रचली जात आहेत. सर्वप्रथम जे.एन्.यू. मध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ नावाने हिंदुत्व संपवण्यासाठी परिषदा घेतल्या गेल्या. त्या वेळी विरोध झाल्यावर ‘आम्ही हिंदु धर्माच्या विरोधात नाही, तर राजकीय हिंदुत्वाच्या विरोधात आहोत’, असा खुलासा केला गेला; मात्र आता तर ‘सनातन धर्म’ संपवण्याचीच भाषा केली जात आहे. ओवैसी यांच्या १०० कोटी हिंदूंना संपवण्याच्या भाषेपेक्षा यात वेगळे काय आहे ? ‘हेटस्पीच’च्या खटल्यात, सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी ३० गुन्हे नोंदवल्याचे सांगितले आहे. त्यातील बहुतांश गुन्हे सकल हिंदु समाजाच्या ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्या’तील हिंदुत्ववादी वक्त्यांच्या विरोधात नोंदवले गेले आहेत. हे गुन्हे नोंदवण्याच्या मागे शहरी नक्षलवाद्यांशी जोडलेल्या डाव्या विचारसरणीच्या तिस्ता सेटलवाड यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीस’ या संघटनेचा हात आहे; मात्र याच संघटनेने स्टॅलिन, प्रियांक खर्गे, निखिल वागळे, आव्हाड इत्यादींच्या विरोधात ‘हेटस्पीच’चा एकही गुन्हा नोंदवलेला नाही. त्यामुळे एकूणच सनातन धर्म संपवण्याचे हे डाव्या विचारसरणीच्या शहरी नक्षलवाद्यांचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हे षड्यंत्र रचणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यासह त्यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अर्थात् ‘एन्.आय.ए.’ कडून चौकशी करण्यात यावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.

या शहरी नक्षलवाद्यांचे हे सनातन धर्माच्या विरोधातील षड्यंत्र उघड करण्यासाठी आणि सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान समितीच्या वतीने सर्वत्र राबवण्यात येणार असून यामध्ये सनातन धर्माचे महत्त्व सांगणारी व्याख्याने घेतली जाणार आहेत, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.