ओवैसी महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री झाले, तरी आम्‍ही हिंदुत्‍वाचेच कार्य करू ! – अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर, मुंबई उच्‍च न्‍यायालय

अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर

मुंबई – आमचे हिंदुत्‍व सनातन आहे आणि ते सत्‍यावर आधारित आहे. ‘आमचे मुख्‍यमंत्री आले, तर हिंदुत्‍वाचे कार्य करू’, असे म्‍हणणार्‍या राजकीय हिंदुत्‍ववाद्यांना त्‍यांचे पद लखलाभ होवो. सत्ता येईल आणि जाईल; परंतु आम्‍ही हिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी अखंड कार्यरत राहू. ओवैसी महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री झाले, तरीही आम्‍ही हिंदुत्‍वासाठीच कार्य करू, असे वक्‍तव्‍य हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय सचिव आणि मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर यांनी केले. सनातन संस्‍थेच्‍या वतीने २० ऑगस्‍ट या दिवशी दादर (पश्‍चिम) येथील कित्ते भंडारी सभागृहात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद ?’ या विषयावर आयोजित केलेल्‍या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि प्रख्‍यात सर्जन (शल्‍यचिकित्‍सक) डॉ. अमित थढानी उपस्‍थित होते.

या वेळी अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर म्‍हणाले, ‘‘हिंदुत्‍वाचे कार्य करतांना ज्‍यांचा हिंदु राष्‍ट्राला विरोध आहे, ते आम्‍हाला विरोध करतच आहेत आणि ज्‍यांचे हिंदुत्‍व राजकीय आहे, तेही आम्‍हाला विरोध करत आहेत. नवाब मलिक हे अजित पवार यांच्‍यासमवेत फिरत आहेत; मात्र त्‍याविषयी राजकीय हिंदुत्‍व असलेले बोलायला सिद्ध नाहीत. लोकशाही अयशस्‍वी झाली आहे. जिहादी दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्‍या वेळी जिहादी लोक हिंदूंवर आक्रमण करतील, त्‍या वेळी आपण त्‍यांच्‍याशी लोकशाहीने लढू शकत नाही. त्‍या वेळी ‘आमची लोकशाही मोठी आहे, राज्‍यघटना श्रेष्‍ठ आहे’, असे म्‍हणून काहीही उपयोग नाही. रस्‍त्‍यावर उतरून आक्रमण करणार्‍यांपासून स्‍वत:चे रक्षण करण्‍यासाठी हिंदूंना त्‍याच पद्धतीने लढावे लागेल. यासाठी हिंदूंना सिद्ध रहावे लागेल. लोकशाही संपली आहे. आता केवळ अंत्‍यसंस्‍कार शिल्लक आहेत. जिहादी लोकशाही संपवायला टपलेलेच आहेत. त्‍यामुळे ‘लढणारच नाही’, असे म्‍हणून चालणार नाही. गाडी बंद पडल्‍यावर ‘माझ्‍याकडे गाडीचा परवाना आहे’, असे म्‍हणण्‍याला काहीही अर्थ नाही. गाडी चालू करण्‍यासाठी ‘मॅकॅनिक’ला बोलवावे लागते. आम्‍ही हिंसेचे समर्थन करत नाही; मात्र स्‍वत:चे दमन होत असेल, तर त्‍यासाठी लढा द्यावाच लागतो.’’

हिंदू जिहादी नाहीत !

अधिवक्‍ता पुनाळेकर पुढे म्‍हणाले की, हिंदू आतंकवादी नाहीत. पंडित नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्‍या केली. त्‍यापूर्वी गांधींचा कोणत्‍या कारणाने मृत्‍यू झाला असता, तर पंडित नथुराम गोडसे यांनी अन्‍य कुणाची हत्‍या केली नसती. याचे कारण पंडित नथुराम गोडसे यांचे गांधीजींशी शत्रुत्‍व नव्‍हते; मात्र गांधी जिवंत राहिल्‍यास भारताचे आणखी तुकडे होतील; म्‍हणून त्‍यांनी गांधींची हत्‍या केली. अजमल कसाबला मुंबईत आक्रमण करता आले नसते, तर त्‍याने दुसरीकडे आक्रमण केले असते; कारण त्‍याचा उद्देश ‘जिहाद’ हाच होता. जिहादच्‍या विरोधात सैनिकी बळाचा उपयोग, हेच उत्तर आहे.