पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्या विरोधात सांगली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

राजू शेट्टी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून अटक करण्याची भाजपची मागणी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजू शेट्टी

सांगली, ७ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशामध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या वक्तव्याचा निषेध करत भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ. नीता केळकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ७ ऑगस्ट या दिवशी शेट्टी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. राजू शेट्टी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

(म्हणे), ‘बांगलादेशातील पंतप्रधानाप्रमाणे आपल्या देशातील पंतप्रधानांना पळवून लावा !

अकोला येथे राजू शेट्टी यांनी ‘बांगलादेशाकडून आपण काहीतरी शिकायला हवे. आपण आपल्या पंतप्रधानाला पळवून का लावू शकत नाही ? बांगलादेशासारखेच आपल्या देशात पंतप्रधानांना पळवून लावण्यासाठी तुम्ही जिवाचे रान करा ’, असे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

राजू शेट्टींकडून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न ! – नीता केळकर, महिला आघाडी नेत्या, भाजप

नीता केळकर

याविषयी सौ. नीता केळकर म्हणाल्या, ‘‘राजू शेट्टी यांनी लोकांना संबाेधित करतांना देशविरोधी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. सहिष्णु अशा हिंदुस्थानात बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना आश्रयाला आल्या आहेत. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्या गोष्टीला पाठिंबा देत असतांना राजू शेट्टी देशद्रोही वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाच्या नवीन भारतीय दंड विधान संहिता कलम १२४ अ नुसार गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विश्रामबागचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी तपशील पडताळून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वत्र सन्मान मिळत असतांना देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. याची नोंद घेऊन सर्व नेत्यांनी सांभाळून बोलले पाहिजे.’’