संपादकीय : मोदी यांनी केली ‘पोल खोल’ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजस्थानमधील बांसवाडा येथील सभेतील एक सूत्र आज मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. हे सूत्र अनेक ‘अर्थां’नी महत्त्वपूर्ण आहे. काँग्रेस आणि सहयोगी दलांच्या त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटणे चालू झाले आहे. मोदी यांनी मुसलमानांविषयीचे अशा प्रकारचे विधान अतिशय स्पष्टपणे भरसभेत प्रथमच केल्याने काँग्रेसचे हेतू जगापुढे उघड झाले आहेत आणि अर्थजगतात (‘इको सिस्टिम’मध्ये) थोडी खळबळ माजली आहे. हे सूत्र भारतीय हिंदु जनतेच्या आर्थिक, कौटुंबिक, भावनिक, धार्मिक, सामाजिक प्रश्नांशी, एवढेच नव्हे, तर राष्ट्राची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे. मोदी यांचे सूत्र हे अर्थव्यवस्थेशी आणि सामान्य जनतेच्या पैशांशी थेट संबंधित असल्यामुळे सामान्य जनतेनेही ते नीट समजून घेणे आवश्यक आहे. सर्वांच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार पंतप्रधान मोदी हे कधीही दायित्नशून्य किंवा अर्थहीन विधाने करत नाहीत. ते अतिशय गांभीर्याने, विशिष्ट अर्थाने, अनेक हेतूंनी प्रत्येक गोष्ट करतात. त्यामुळे मोदी यांच्या या सूत्रावर अनेक उलटसुलट चर्चा आणि टीका झाल्या, तरी त्याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. मोदी यांनी ‘काँग्रेस देशवासियांची संपत्ती घेऊन घुसखोरांना वाटणार आहे’, असे ‘विधान’ केले. वरती सगळीकडे मुद्दामहून ‘सूत्र’ असा शब्द वर वापरला आहे; कारण हे ‘विधान’ नुसते ऐकून त्याचा अर्थ पटकन लक्षात येणार नाही; म्हणून त्यांनी सांगितलेले ‘पूर्ण सूत्र’ समजून घेणे आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे.

काँग्रेसच्या घोषणापत्रातील असमानतेची सूत्रे ही माओवाद प्रेरित !

काँग्रेसने घोषणापत्रात असे म्हटले आहे, ‘‘काँग्रेसचे पहिले प्राधान्य समानता हे आहे. त्यामुळे काँग्रेस प्रत्येकाची मिळकत आणि संपत्ती यांचा असमानतेच्या सूत्रावर विचार करेल.’’ थोडे पुढे आणखी एक वाक्य आहे, ‘‘अल्पसंख्यांकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हे महत्त्वाचे पाऊल असेल.’’ ‘सर्वांमध्ये संपत्तीचे समान वाटप’ हे साम्यवाद, मार्क्सवाद किंवा माओवाद आणि त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेला नक्षलवाद यांच्या लढ्यामागचे मूळ किंवा मुख्य वैचारिक सूत्र आहे. अल्पसंख्यांकांसह काँग्रेसचे या सर्वांशी असलेले घनिष्ठ संबंध सर्वश्रूत आहेत. काँग्रेसचे हे समान वाटपाचे सूत्र वरवर दिसायला आदर्श, चांगले किंवा योग्य वाटले; तरी प्रत्यक्षात ते किती देशहानीकारक आहे, हे त्याचा गर्भितार्थ समजून घेतल्यावर लक्षात येते. त्यामुळे या सूत्राला अनुषंगून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात या ‘समानते’च्या सूत्राचे एक उदाहरण जनतेला कळण्यासाठी थोडे उलगडून सांगितले. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, जसा कायदा एका वाक्यात असतो; पण कायद्याचे अनेक मतीतार्थ काढता येतात किंवा निघतात आणि ते लागू करता येतात किंवा त्यातून सुटता येते, अगदी त्याच प्रकारे काँग्रेसच्या घोषणापत्रातील विधान हे एखाद्या जटील कायद्याच्या वाक्याप्रमाणे आहे. आता काँग्रेसचे नेते म्हणत आहेत, ‘‘मोदी जे भाषणात म्हणाले, त्यांपैकी आम्ही घोषणापत्रात काहीच लिहिलेले नाही.’’ सामान्य जनता बाळबोध असली, तरी देशाचे पंतप्रधान मोदी आणि त्यांचा चमू काही दूधखुळा नाही. मोदी यांनी भाषणात म्हटलेली वाक्ये प्रत्यक्षात शब्दशः घोषणापत्रात नसली, तरी त्याचा मतीतार्थ तोच निघत आहे किंवा त्याच्या मुळाशी तेच आहे आणि भविष्यात त्याची कार्यवाही करणे, हे त्यांचे लक्ष्य आहे, असे म्हणण्यास वाव आहे; कारण यापूर्वीच्या काँग्रेसच्या पंतप्रधानांनीही त्याला पुष्टी देणारी विधाने केली आहेत.

मोदींनी सांगितला काँग्रेसच्या घोषणापत्राचा खरा अर्थ !

या भाषणात मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेस आल्यावर माता-भगिनींचे सोने आणि (घरातील) संपत्ती यांचे सर्वांना समानरूपात वितरण होणार. तुम्ही मेहनत करून आणलेली तुमची संपत्ती सरकारला घेण्याचा अधिकार आहे का ? मंगळसूत्र (किंवा सोने) हे आमच्या माता-भगिनींसाठी केवळ दाखवण्याचे किंवा किमतीचे सूत्र नाही, तर स्वाभिमान, तिची जीवनाची स्वप्ने या सर्वांशी ते निगडित आहे. ते तुम्ही घेण्याविषयी तुमच्या घोषणापत्रात सांगितले आहे. यापूर्वीही मनमोहनसिंह यांनी देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा असेल, असे स्पष्टच सांगितले होते. त्यामुळे ही संपत्ती ज्यांची मुले अधिक, त्यांना वाटली जाणार, ती घुसखोरांना वाटली जाणार.’’  साहजिकच ‘जनतेची सर्व संपत्ती एकत्र करून सर्वांना समान वाटण्याची वेळ येईल’, तेव्हा ‘ज्यांच्या घरात अधिक मुले, त्यांच्याकडे ही अधिक संपत्ती जाईल’, हे साधे गणित आहे. ‘अधिक मुले मुसलमानांना असतात आणि या देशात प्रचंड घुसखोरी झाली आहे, ते बहुसंख्य मुसलमानच आहेत’, हेही सरळ गणित आहे. याचाच अर्थ ‘बहुसंख्य असलेल्या सर्व हिंदूंची संपत्ती गोळा करणे आणि सर्वांना समान वाटणे’, म्हणजे ‘हिंदूंची संपत्ती मुसलमानांकडे मोठ्या संख्येने जाणार’ हे उघडच नाही का ? हे पंतप्रधानांनी केवळ स्पष्टपणे उदाहरण देऊन सांगितले. त्यात त्यांचे काय चुकले ? अधिक स्पष्ट करण्यासाठी याचे अगदी साधे गणित पुढील उदाहरणातून लक्षात येईल. समजा एखादा हिंदु १ लाख रुपये कमावतो आणि त्याला २ मुले आहेत आणि एखादा मुसलमान २० सहस्र रुपये कमावतो, त्याला १० मुले आहेत, तर सरकार त्यांची सर्व संपत्ती एकत्र करणार, म्हणजे सरकारकडे १ लाख २० सहस्र रुपये होणार आणि त्याचे समान वाटप होणार, म्हणजे १० मुसलमान मुलांकडे मिळून १ लाख रुपये जाणार आणि २ हिंदु मुलांकडे २० सहस्र रुपये येणार. म्हणजेच देशातील ८० टक्के हिंदूंचे ८० टक्के पैसे हे २० टक्के मुसलमानांकडे जाणार ! मनमोहनसिंह यांनी वर्ष २००६ मध्ये देशाच्या राष्ट्रीय विकास परिषदेत ‘या देशाच्या संपत्तीचा पहिला अधिकार मुसलमानांचा आहे आणि (एवढेच नव्हे, तर) यासाठी आम्ही योजना बनवल्या आहेत’, असे स्पष्ट सांगितले होते. त्याचाही संदर्भ साहजिक मोदी यांनी दिला; कारण तो अपरिहार्यपणे निघतोच ! राहुल गांधी यांनी नुकतेच स्पष्ट सांगितले, ‘‘आम्ही आर्थिक आणि संस्था स्तरावर सर्वेक्षण करून हिंदुस्थान कुणाच्या हातात आहे ते पाहू अन् या ऐतिहासिक सर्वेक्षणानंतर क्रांतीकारी काम करू.’’ मोदी सर्वत्रच्या सभांमध्ये हे सूत्र आता उचलून धरत असल्यामुळे काँग्रेससह ‘इंडि’ आघाडीमधील सर्वच पक्षांचे धाबे दणाणले आहेत, हे लक्षात येत आहे. ‘माओवादी आणि साम्यवादी विचारांनी किती देश धुळीला मिळाले आहेत, तेच काँग्रेस आणू पहात आहे’, असे मोदी यांनी अलिगढ येथेही स्पष्टच सांगितल्यामुळे हा लढा साम्यवादी नि(अ)धर्मी विरुद्ध हिंदुत्वनिष्ठ धर्मी यांच्या विरोधातील आहे, हे अनायासे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे !

मतदारांनो, समान वाटप करण्याच्या नावाखाली तुमची संपत्ती अल्पसंख्यांकांवर उधळायला निघालेल्या काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करा !