महाराष्ट्राने मोठे केलेल्या धनिकांनी पूरग्रस्तांना साहाय्य करण्याची दिलदारी दाखवावी ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

मुंबई – महाराष्ट्र आणि मुंबई यांनी अनेक लोकांना धनवान केले आहे. पुराने उद्ध्वस्त झालेल्यांना सावरण्यासाठी अनेक हातांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि महाराष्ट्र येथील धनिकांनी त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

या वेळी संजय राऊत म्हणाले, ‘‘कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे, हे संकट गंभीर आहे. अशा परिस्थितीत खचलेल्या मनाला उभारी देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: फिरून सर्वांना धीर देत आहेत. राज्यशासनासह अन्य हातही साहाय्यासाठी पुढे यायला हवेत. महाराष्ट्राला सहस्रो हातांनी साहाय्य करण्याची आवश्यकता आहे. श्रीमंतांच्या जागतिक सूचीत मुंबईतील अनेकजण आहेत. त्यांनी आता मनाची दिलदारी दाखवण्याची आवश्यकता आहे.’’