राज्य सरकारकडे घोषणांचा पाऊस आणि कार्यवाहीचा दुष्काळ असतो ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

मुंबई, २७ जून (वार्ता.) – पावसाळी अधिवेशनात घोषणांचा पाऊस पडेल. तो गाजर अर्थसंकल्प असणार आहे. त्यातील निधी खर्चच होणार नाही. राज्य सरकारच्या घोषणा पुष्कळ झाल्या; मात्र त्यांच्याकडे घोषणांचा पाऊस आणि कार्यवाहीचा दुष्काळ असतो. गेल्या २ वर्षांतील घोषणांची किती पूर्तता झाली ?, हे सरकारने खरेपणाने सांगितले पाहिजे, अशी विधाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ जून या दिवशी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की,…

१. राज्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

२. पुणे अमली पदार्थ प्रकरणी आम्ही आवाज उठवणार आहोत; पण सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे. सरकारला खेचायचे आहे. हे अमली पदार्थ येतात कुठून ? राज्यातील रसायनांचे कारखाने हे याचे मूळ स्रोत आहेत का ? उद्योगमंत्री काय करतात ? अमली पदार्थ प्रकरणावर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कुणाचेही सगेसोयरे असू द्या. विरोधकांनी एकत्र आले पाहिजे.