माझ्या वडिलांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ! – ओमराजे निंबाळकर, ठाकरे गट

ओमराजे निंबाळकर, ठाकरे गट

धाराशिव – माझ्या वडिलांची हत्या राजकीय द्वेषापोटी केली, हे सत्य नाही का ? मला वडिलांच्या हत्येचा सूड घ्यायचा आहे; मात्र मी तो लोकशाही मार्गाने घेणार आहे. इतकेच नाही, तर केंद्रात अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांनी पवनराजे हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि दोन महिन्यांत निकाल लावावा. सर्व सत्य समोर आणावे, अशी मागणी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ओमराजे निंबाळकर म्हणाले की, अर्चना पाटील या पद्मसिंह पाटील यांच्या सून आहेत. मी या आधी पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आता अर्चना पाटील यांचाही पराभव करणार आहे.