पुण्यातील कारागृह अधीक्षकांनी मागितली राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची अनुमती !

इच्छामरण म्हणजे भगवंताच्या नियोजनामध्ये स्वतःच्या मनाने केलेला हस्तक्षेप आहे. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार इच्छामरण अयोग्य आहे. धर्मशिक्षण नसल्यामुळे हे समाजाला ठाऊक नाही. यासाठी धर्मशिक्षणाची सोय शालेय अभ्यासक्रमात करणे आवश्यक आहे.

पुणे – येथील कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी त्यांची अचानक बदली केल्याप्रकरणी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. माझ्या समवेत असणार्‍या अधिकार्‍यांवर आरोप होऊनही कारवाई झाली नाही; मात्र माझ्यावर झालेल्या आरोपाचे पुरावे नसतांनाही केवळ बंदीवानावर कारवाई केली म्हणून कारवाई झाल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी गृहखात्यावर केला आहे. कारागृहात चालू असलेल्या अन्यायाविरोधात केलेले आमरण उपोषण पोलिसांनी मोडीत काढले; मात्र पुन्हा ३० मार्चपासून उपोषण करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. राष्ट्रपतींकडून एक मासात अनुमती न आल्यास ‘अनुमती आहे असे गृहीत धरेन’, अशी चेतावणी त्यांनी या वेळी दिली आहे. पोलीस खात्यातील अनेक अधीक्षक दबावाखाली काम करत असल्याचेही सांगत त्यांच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप हिरालाल जाधव यांनी केला आहे.