स्वातंत्र्यवीर सावरकर – एक ध्रुवतारा !

आज ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (तिथीनुसार)’ आहे. त्या निमित्ताने…

अभिनेते आणि दिग्दर्शक रणदीप हुडा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी पुष्कळ लिहून आले आहे. त्यामुळे परीक्षण म्हणून वेगळे काही न लिहिता चित्रपटाच्या अनुषंगाने मुक्त चित्रण लिहिण्याचा छोटासा प्रयत्न. मातृभूमीसाठी आत्यंतिक पीडा सहन करणारे, देशासाठी २ जन्मठेपांची शिक्षा भोगण्यासाठी लागणारी कणखर वृत्ती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विजिगीषू वृत्ती कोवळ्या वयातही प्रेरणा देते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संपूर्ण आयुष्यभर त्याग केला आणि राष्ट्रासाठी अपमान सहन केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर

१. पडद्यावर केवळ अर्धा तास; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नरकयातना प्रत्यक्ष भोगलेली १० वर्षे !

‘माझी जन्मठेप’ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुस्तक वाचतांना अंदमानच्या काळकोठडीतील नरकयातना आपण जशा उभ्या करू, त्याहून अनेक पटींनी भयानक यातना प्रत्यक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भोगाव्या लागल्या होत्या. याची जाणीव चित्रपट पहातांना नक्कीच होते. सारखे सारखे डोळे भरून येत होते, दुःख, चीड, बारी आणि जेलर यांविषयी घृणा अन् स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा आदर या सर्व भावना एकाच वेळी मनात दाटून येत होत्या. या वेळी स्वत:ला जाणीव करून देणे, पुष्कळ महत्त्वाचे असते की, आपण जे अर्ध्या तासात पडद्यावर बघून संपवतोय, ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १० वर्षे अंदमानमध्ये भोगले आहे.

२. अंदमानातील निर्जनस्थळी ६ वेळा ठेवण्यात येणारे एकमेव क्रांतीकारक ! 

जे कुणी आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवत आहेत. त्यांनी १ दिवस अंधार कोठडीत घालवून दाखवावा. सावरकर हे एकमेव राजबंदी असे होते, ज्यांना ६ वेळा अंदमान येथे निर्जनस्थळी ठेवण्यात आले.

३. मातृभूमीच्या रक्षणार्थ कणखर आणि कृतज्ञतेच्या क्षणी हळवे मन लाभलेले स्वातंत्र्यवीर !

चित्रपटात एक प्रसंग दाखवला आहे. तुरुंगामधील कुजलेले, सडलेले, निकृष्ट प्रतीचे अन्न इतकी वर्षे खाऊन झाल्यावर सुटकेनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर घरचे अन्न यमुनाबाई यांना ताटात वाढतांना पहातात. त्या वेळी ती साधी भाजी-भाकरी पाहून त्यांचा बांध फुटतो. याविरुद्ध अनन्वित छळ सोसूनही डेव्हिड बारीच्या डोळ्यांत डोळे घालून ‘आय आऊटलास्टेड यू बारी’ (बारी, मी तुला कालबाह्य करीन) असे म्हणणारे कणखर स्वातंत्र्यवीर सावरकर, भावनिकदृष्ट्या त्या क्षणी क्षणभर अकडलेले दिसतात. भारतीय लोकांचा करंटेपणा हा की, ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सोडून गांधींसारख्या दुबळ्या मनाच्या नेत्याच्या मागे गेले !

४. उपरोधिक प्रश्नातून वस्तूस्थितीची देशाला जाणीव करून देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात गांधी पहिल्यांदा जसे होते तसे दाखवले गेले आहेत. अहिंसेचा अतिरेकी कैवार घेणारे, सदैव मुसलमानांचे लांगूलचालन करणारे, काँग्रेसमध्ये आपल्या आणि आपल्या लाडक्या जवाहर नेहरूंखेरीज दुसर्‍या कुणाही नेत्याला मोठे होऊ न देणारे, मातीचे पाय असलेले सामान्य कुवतीचे नेते ! म्हणूनच ‘गांधी इतना बडा हो गया ?’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रश्नातील उपरोध आपल्याला बोचतो.

५. क्रांतीकारकांची नावे आपण शासकीय योजना किंवा रस्ते यांना दिली आहेत का ?

चित्रपटात जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर विचारतात, ‘ब्रिटीश सरकारच्या वतीने अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला केवळ क्रांतीकारकांनाच का पाठवले गेले ? काँग्रेसच्या एकाही नेत्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही ? काँग्रेसचा एकही नेता फासावर का गेला नाही ? त्या प्रश्नाला काय उत्तर आहे कुणाकडे ?’ चित्रपटात जेव्हा कोवळी १८-२० वर्षांची मुले हसत-हसत फासावर जातांना दिसतात, तेव्हा जीव तुटतो. चापेकर बंधू, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस, भगतसिंह, राजगुरु, सुखदेव…अशी अनेक नावे. आज भारतात त्यांच्या नावाने किती उड्डाण पूल बांधलेले आहेत? किती संस्था ? विमानतळ ? सरकारी योजना ? रस्ते आहेत ? विचारा हा प्रश्न स्वतःलाच !

६. ब्रिटिशांचे विरोधाभासी वागणे

आगाखान पॅलेस

सावरकर आणि अन्य क्रांतीकारी स्वातंत्र्यसैनिक यांच्या नशिबी अंदमानची काळकोठडी अन् गांधींचा ‘तुरुंग’ म्हणजे पुण्याचा आलिशान ‘आगाखान पॅलेस’, असे का ? गांधींच्या लाडक्या नेहरूंसाठी नगरच्या किल्ल्यात स्वतंत्र स्वयंपाकी होता. त्यांना दिवसातून २ तास ‘बॅडमिंटन’ खेळण्यासाठी खास ‘कोर्ट’ सिद्ध केले होते. नेहरूंना गुलाब आवडतात; म्हणून नगरच्या किल्ल्यात खास गुलाबाची बाग जोपासायला ब्रिटिशांनी अनुमती दिली होती, तर सावरकर यांच्या नशिबी ? दिवसातून ८ तास कोलूला जुंपून तेल काढणे ! ठरल्याइतके तेल निघाले नाही, तर पाठ चाबकाने फोडून काढली जात असे.

७. त्याग करून सन्मान सोडाच, केवळ अपमानच पदरी पडलेले स्वातंत्र्यवीर सावरकर ! 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी देशातील काही लोकांच्या मनात इतका पराकोटीचा द्वेष का ? त्यांच्या त्यागाचा ना कधी स्वतः सावरकर यांनी लाभ करून घेतला, ना त्यांच्या मुला-नातवंडांनी. सत्तेच्या राजकारणापासून सावरकर कुटुंब कायमच ठरवून दूर राहिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या उत्तर आयुष्यात जातींचा अंत आणि हिंदू एकता यांसाठी लढले. भारत सरकारकडे ना कधी सरकारी सवलती मागितल्या, ना स्वतंत्र भारताच्या कुठल्या पंतप्रधानाने त्यांना भारतरत्न देऊ केले ! उलट स्वतंत्र भारतातही ज्यांना दोनदा कारावास भोगावा लागला, असे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव स्वातंत्र्यसैनिक ! ज्या देशासाठी इतके कष्ट सोसले, त्या देशाने, तिथल्या राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काय दिले ? सन्मान तर सोडाच, देहलीतील निर्बुद्ध राष्ट्रीय पप्पूपासून ते महाराष्ट्रातील गल्लीतील गटारात वळवळण्याचीही लायकी नसलेले क्षुद्र शेणकिडे ! सर्व सत्य बाहेर आलेले असूनही त्यांच्यावर सतत खोटे, चुकीचे आरोप करतात. सावरकर गेले. त्यांच्या वाट्याला जितके भोग आले ते धीरोदात्तपणे भोगून, शांतपणे, स्वतःच्या अटींवर प्रायोपवेशन करून गेले. सूर्यावर थुंकण्याचा गांडूळांनी कितीही प्रयत्न केला तरी गांडूळ गांडूळच असते. चिमूटभर मीठ टाकले, तर तडफडते; पण तरीही इतका आंधळा द्वेष का?

८. केवळ चित्रपट नव्हे; तर भारताचा खरा इतिहास ! 

रणदीप हुडा यांनी हा चित्रपट बनवून भारताच्या पुढच्या पिढ्यांवर अनेक उपकार केले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या क्षितिजावर उगवलेला ‘विनायक दामोदर सावरकर’ हा तेजस्वी ‘ध्रुवतारा’ होता तरी कसा ? हे पुढच्या पिढ्यांना पहाता तरी येईल. चित्रपटात रणदीप हुडा कुठेच दिसत नाहीत. दिसतात फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर ! स्वातंत्र्यवीर सावरकर हा केवळ एक चरित्रपट नाही, तो स्वतंत्र भारताचा खरा इतिहास आहे, आजवर तुम्हाला कुणीही न सांगितलेला !

– शेफाली वैद्य, गोवा