शुक्रवारचा हिंसाचार !

 संपादकीय

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित अवमानकारक विधान केल्यानंतर देशभरातील अनेक राज्यांत मुसलमानांनी शुक्रवारच्या (१० जूनच्या) नमाजानंतर हिंसाचार केला. यात दगडफेक केली, पेट्रोल बाँब फेकले, इतकेच नव्हे, तर गोळीबारही केला. यापूर्वी काश्मीरमध्ये प्रत्येक शुक्रवारच्या नमाजानंतर सुरक्षादलांवर दगडफेक केली जात असे. पाकिस्तान, इस्लामिक स्टेट आदींचे झेंडे फडकावले जात होते. याविरोधात सुरक्षादलांनी कठोर उपाययोजना केल्यानंतर आज तेथे नमाजानंतर तरी दगडफेक करणे बंद झाले आहे. पूर्वी काश्मीरमध्ये सुरक्षादलांची आतंकवाद्यांशी चकमक होतांना स्थानिक मुसलमानांकडून सुरक्षादलांवर दगडफेक केली जात होती. आता तरी या घटना थांबल्या आहेत; मात्र देशात प्रसंगानुरूप दगडफेकीच्या घटना घडतांना दिसत आहेत. हिंदूंच्या सणांच्या वेळी निघणार्‍या धार्मिक मिरवणुका मशिदीजवळून जाऊ लागल्यावर तिच्यावर दगडफेक करण्याच्या घटना आता नेहमीच्याच झाल्या आहेत. मशिदीमध्ये जागा नसल्याचे कारण सांगत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी देशात शेकडो ठिकाणी रस्त्यावर, मोकळ्या मैदानात नमाजपठण करून जनतेला त्रास दिला जातो, हे सर्वज्ञात आहे. त्यावर पोलीस, प्रशासन आणि सर्वपक्षीय शासनकर्ते मौन बाळगून असतात. त्याला कुणी विरोध केला, तर विरोध करणार्‍यालाच आरोपी ठरवले जाते. अशा स्थितीत नमाजाच्या वेळी जमा झालेला जमाव कायदा हातात घेतो, तेव्हा त्याच्यावर कारवाई करतांनाही पोलीस शेपूट घालतांना सध्या दिसून आले. रांची येथे झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असतांना तेथील पोलिसांनी गोळीबार करणार्‍या दंगलखोरांवर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि त्यात दोघे दंगलखोर ठार झाले, हे विशेषच म्हणावे लागेल. असे भाजपशासित उत्तरप्रदेशमध्ये झाले नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. उत्तरप्रदेश सरकार अशा दंगलखोरांच्या अवैध बांधकामांवर कारवाई करत आहे. यातून विशेष काही साध्य होतांना दिसत नाही; कारण यापूर्वीच सरकारने अशी कारवाई करूनही १० जूनला अल्पसंख्यांकांनी हिंसाचार केला, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आता कठोर कारवाई करण्याचा विचार सर्वच राज्यांतील, तसेच केंद्रातील सरकारने विचार केला पाहिजे. प्रथम मशिदीबाहेर रस्ता अडवून होणारे नमाजपठण कठोरपणे कारवाई करून बंद केले पाहिजे. दुसरे म्हणजे प्रत्येक मशिदीची नमाजापूर्वी झडती घेऊन तेथे दगड किंवा अन्य काही घातक शस्त्रे ठेवण्यात आली आहेत का ? याची पडताळणी केली पाहिजे. तिसरे म्हणजे ज्या ठिकाणी हिंसाचार होतो, त्या ठिकाणच्या मशिदींना नमाजासाठी बंदी घातली पाहिजे. फ्रान्स सरकारने ज्या मशिदींमधून जिहादचा प्रसार होतो, अशा अनेक मशिदींना टाळे ठोकलेले आहे. भारतानेही असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तरच कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवता येऊ शकते. अन्यथा हिंसाचार होत राहील आणि त्यात वैयक्तिक अन् सार्वजनिक संपत्तीची हानी, आणि जीवितहानी होतच राहील.

धर्मांधप्रेमी शासनकर्ते !

१० जूनच्या हिंसाचारावर देशातील निधर्मी राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी संघटना, नेते आदी मौन बाळगून आहेत. यापूर्वी श्रीरामनवमी, हनुमान जयंती मिरवणुकांवर मशिदीजवळ झालेल्या दगडफेकीवरही हे लोक मौन बाळगून होते. अशा प्रकारचा हिंसाचार हिंदू कधी करत नाहीत आणि जर चुकून हिंदूंनी अशा हिंसाचाराला प्रत्युत्तर दिले, तर दंगलखोर म्हणून केवळ हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी पुढे येतात. याचा विचार आता प्रत्येक हिंदूने केला पाहिजे. आज केवळ दगडफेक करणारे दंगलखोर धर्मांध उद्या सशस्त्र म्हणजे तलवारी, बंदुका घेऊन सहस्रोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले, तर हिंदूचे रक्षण कोण करणार ? याचा विचार आतापासून केला पाहिजे. पोलीस रक्षण करतील, याची शाश्वती नाही; कारण आताच्या आक्रमणात पोलीसच मार खातांना दिसले. पोलिसांना दंगलखोरांवर गोळीबार करण्याचा वरिष्ठ पातळीवरून आदेश नसतो, हे मुंबईतील आझाद मैदानातील दंगलीच्या वेळी आपण पाहिलेले आहे. अशा वेळी घराघरांत घुसून या दंगलखोरांनी हिंसाचार केला, तर…? बंगालच्या हावडा येथे सलग दोन दिवस दंगलखोरांनी हिंसाचार केला. हिंदूंना लक्ष्य करत त्यांची दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. ज्याप्रमाणे पाकिस्तान आणि बांगलादेश येथे घडते, तसेच हावडा येथे घडत होते. हे सर्व काही सुनियोजित होते. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या शासनकर्त्या असतील, तर हिंदूंच्या नशिबी हेच येणार आहे. फाळणीच्या वेळी बंगाल प्रांताचा प्रमुख सुर्‍हावर्दी याच्या आदेशाने हिंदूंची कत्तल करण्यात आली, तसाच काहीसा प्रकार ममता बॅनर्जी यांच्या धर्मांधांप्रतीच्या नरमाईमुळे हिंदूंच्या नशिबी पुन्हा आल्यास आश्चर्य वाटणार नाही, हे त्यांनी कायमचे लक्षात ठेवावे.

धर्माे रक्षति रक्षितः !

मुसलमान दंगलखोरांनी केलेला हिंसाचार अयोग्य असला, तरी हिंदूंनी त्यांच्याकडून धर्माभिमान शिकणे आवश्यक आहे. स्वतःच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्याचा कांगावा करत त्यांनी रस्त्यावर उतरून कायदा हातात घेतला, तसे हिंदूंनी करण्याची आवश्यकता नाही आणि ते योग्यही नाही; मात्र जेव्हा हिंदु धर्म आणि देवता यांचा खर्‍या अर्थाने अवमान होत असतो, तेव्हाही हिंदू त्यासाठी काहीच करत नाहीत. हाताच्या बोटावर मोजता येणारे हिंदुत्वनिष्ठ आणि एखाद-दुसरी संघटना थोड्या फार प्रमाणात विरोध करते. यापलीकडे काही केले जात नाही. रस्त्यावर उतरण्याची गोष्ट दूरच राहिली. सरकारी स्तरावरूनही सर्वपक्षीय शासनकर्ते जे हिंदूच आहेत, तेही गांधींच्या तीन माकडांप्रमाणे आंधळे, बहिरे आणि मुके असल्यासारखे वागतात. त्यामुळेच हिंदूंना आपत्काळात देव वाचवत नाही, असेच लक्षात येते. ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ हे वचन हिंदूंनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे. हिंदु धर्म जगात महान आहे. अशा धर्माचे रक्षण करण्यासाठी प्राण गेला, तरी ते करणे, हे हिंदूंचे कर्तव्य आहे. अशांना देवाच्याच चरणी जागा मिळणार, यात संशय नसावा !