Kolkata : कोलकाता शहराची स्थिती ढाक्याहून भयावह !

कोलकाता (बंगाल) – ९ ऑगस्टला येथील राधा गोविंद (आर्.जी.) कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे एका ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यावरून कोलकात्याच्या(Kolkata)  कायदा-सुव्यस्थेची दु:स्थिती पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या घटनेच्या विरोधात देशभरातील सहस्रावधी डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. तसे पाहिले, तर हिंदूंच्या दृष्टीने बंगालची राजधानी कोलकाता शहराची स्थिती ही इस्लामी बांगलादेशाची राजधानी ढाक्यापेक्षाही (Dhaka) भयावह आहे. ढाक्यात हिंदुविरोधी घटना घडली, तर किमान त्याला प्रसारमाध्यमे वाचा तरी फोडू शकतात. कोलकाता शहरात असे काही घडले, तर अनेक वेळा अशा घटना प्रसारमाध्यमांपर्यंत पोचतच नाहीत. यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला कोलकाता, तसेच ढाका येथील काही हिंदु नेत्यांनी माहिती दिली. या दुरवस्थेची शहानिशा करतांना गेल्या ४० वर्षांतील काही भयावह घटना समोर आल्या.

कोलकाता येथील काही भीषण घटना !

१. मार्च १९८४ : हिंदु पोलीस उपायुक्त विनोद कुमार मेहता यांचे केले तुकडे-तुकडे !

विनोद कुमार मेहता

कोलकाता शहराचे हिंदु पोलीस उपायुक्त विनोद कुमार मेहता यांची शहरातील ‘गार्डन रीच’ या मुसलमानबहुल भागात निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाचे ‘खीमा’सारखे अत्यंत छोटे तुकडे करण्यात आले. मेहता हे अल्प पोलीस बळासह या भागातील अवैध कृत्यांच्या विरोधात कृती करण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांची हत्या करण्यात आली. साधारण महिन्याभराने त्यांच्या जागी उत्तराखंड येथून आर्.के. हांडा नावाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली. ‘हांडांचा दंडा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या हांडा यांचा ‘गार्डन रीच’ भागातील अवैध धंद्यांवर कारवाई करायचा मानस होता. ते म्हणाले होते की, माझे सहकारी पोलीस अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांची यासाठी मला साथ हवी होती; परंतु मला ती मिळू दिली गेली नाही.

२. मे १९९० : बांटोला सामूहिक बलात्कार प्रकरण !

बंगाल सरकारमधील एक महिला अधिकारी अनिता दिवाण यांच्यावर तत्कालीन सत्ताधारी असलेल्या माकपच्या काही गुंडांनी बलात्कार करून हत्या केली होती. त्यांच्यासह अन्य दोन महिला अधिकार्‍यांवरही अत्याचार करण्यात आले; परंतु त्या वाचल्या. अनिता दिवाण यांचे शवविच्छेदन करतांना एक महिला डॉक्टर जागेवरच बेशुद्ध पडली. अनिता यांच्या खासगी भागात एक फूट लांबीचा धातूचा टॉर्च घालण्यात आला होती. संयुक्त राष्ट्रांकडून बंगाल राज्यातील काही गावांसाठी अर्थसाहाय्य करण्यात आले होते. माकपचे राज्य असलेल्या या गावांतील पंचायतींनी त्यामध्ये पुष्कळ मोठा भ्रष्टाचार केला होता. तो अनिता यांना कळाला होता. त्या यांपैकी एका गावातून सर्व पुरावे घेऊन कोलकात्याला परतत असतांना माकपच्या गुंडांनी त्यांच्यावर आक्रमण केले. या संपूर्ण घटनाक्रमावर मार्च २०२४ मध्ये ‘द रेड फाईल्स’ नावाचा बंगाली चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

३. नोव्हेंबर २००७ : तस्लिमा नसरीन यांना हाकलण्यासाठी मुसलमानांकडून हिंसाचार !

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

बांगलादेशातील हिंदु महिलांच्या दुरवस्थेवर ‘लज्जा’ नावाचे पुस्तक लिहिणार्‍या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन या कोलकाता शहरात शरण घेऊन होत्या. काही मौलानांनी नसरीन यांच्या विरोधात फतवा काढला होता. नोव्हेंबर २००७ मध्ये मध्य कोलकाता येथे ‘ऑल इंडिया मायनॉरिटी फोरम्’च्या नेतृत्वाखाली सहस्रो मुसलमान रस्त्यावर उतरले. त्यांनी तेथील अनेक रस्ते रोखून धरले. या वेळी झालेल्या हिंसाचारात ३५ पोलीस घायाळ झाले, तसेच अन्यही अनेक लोक गंभीर घायाळ झाले. माकपच्या दोन कार्यालयांमध्येही तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारामुळे तस्लिमा नसरीन यांना सुरक्षितपणे राजस्थानात हालवण्यात आले.

४. फेब्रुवारी २००९ : इस्लामच्या विरोधात कथित आक्षेपार्ह लेख लिहिल्यावरून इंग्रजी दैनिक ‘स्टेट्समन’च्या कार्यालयाची तोडफोड !

इंग्रजी दैनिक ‘स्टेट्समन’चे कार्यालय

ब्रिटनचे दैनिक ‘दी इंडिपेंडेंट’ने इस्लामवर लेख लिहिला होता. तोच लेख भारतातील सर्वांत जुन्या दैनिकांपैकी एक असलेल्या ‘द स्टेट्समन’ने प्रकाशित केल्यावरून कोलकात्यातील सहस्रो धर्मांध मुसलमान रस्त्यावर उतरले. त्यांनी सदर दैनिकाच्या कार्यालयाला घेराव घालून तोडफोड केली. पोलिसांना दैनिकाचे संपादक आणि प्रकाशक यांना अटक करण्यास भाग पाडले गेले, तसेच दैनिकाला क्षमा मागण्यास बाध्य केले गेले.

५. फेब्रुवारी २०१२ : पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरण !

सुजेत जॉर्डन

शहरातील पार्क स्ट्रीट भागातील ही घटना. भारताचे नागरिकत्व मिळालेल्या दोन मुलांची आई असलेल्या सुजेत जॉर्डन या ३७ वर्षीय महिलेवर येथे सामूहिक बलात्कार करण्यात आला. यामध्ये मुख्य आरोपी असलेला कादर खान हा त्या वेळी नुसरत जहां या अभिनेत्रीचा प्रियकर होता. वर्ष २०२० मध्ये नुसरत जहां या बसीरहाट येथून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाल्या.

६. फेब्रुवारी २०१३ : तापस चौधरी या हिंदु पोलीस उपनिरीक्षकाची तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून हत्या !

कोलकाता येथील हरिमोहन घोष महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थी संघटनांकडून विद्यार्थी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हिंसाचार चालू होता. त्यावर आळा घालण्यासाठी तापस चौधरी नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाने बळाचा वापर केला. तेथे उपस्थित शेकडो अन्य पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. अशातच सुवान नावाच्या तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने चौधरी यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार मारले. सुवान हा तेथील तृणमूल काँग्रेसचा नेता महंमद इक्बाल याचा अंगरक्षकही होता. हे महाविद्यालयही ‘गार्डन रीच’ या मुसलमानबहुल भागात आहे.

संपादकीय भूमिका

  • ही स्थिती बंगालची राजधानी असलेल्या एकट्या कोलकातामधील आहे. संपूर्ण बंगालमध्ये कशी स्थिती असेल, हे यावरून लक्षात येते !
  • हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकार बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ? राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी किती घटना घडू द्याव्या लागणार आहेत ?, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे !
  • हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव पर्याय आहे, हे आता तरी हिंदूंनी जाणावे आणि त्यासाठी प्रयत्न करावेत !