VIDEO : इस्लामी जिहादच्या विरोधात निरंतर संघर्ष करायला हवा ! – प.पू. यती चेतनानंद सरस्वती, महंत, डासना पीठ, गाझियाबाद, उत्तर प्रदेश

रामनाथी (फोंडा) – ‘‘मोगलांपासून आजपर्यंत इस्लामी जिहादच्या विरोधात निरंतर युद्ध चालूच आहे. हिंदूंच्या हत्या, हिंदू महिलांवर अत्याचार, बलात्कार करणे, संपत्ती लुटणे, धर्मांतर करणे, ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, हेच इस्लामी जिहादचे धोरण आहे. इस्लामी जिहादला घाबरून रडण्याऐवजी त्या विरोधात लढले पाहिजे. देहली येथे धर्मांधांनी घडवलेली दंगल, काश्मीरमध्ये हिंदूंच्या होणार्‍या हत्या, अशा अनेक घटना भारतात घडत आहेत. त्यामुळे अशा घटनांच्या विरोधात निरंतर संघर्ष चालूच राहील’’, असे प्रतिपादन उत्तरप्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील डासना पिठाच्या महंत प.पू. यती चेतनानंद सरस्वती यांनी केले.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात जिहादच्या विविध प्रकारांचा वैध मार्गाने प्रतिकार करण्याविषयी हिंदूंचे प्रबोधन करण्याचा निर्धार !

महंत प.पू. यती चेतनानंद सरस्वती

१५ जून या दिवशी दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सायंकाळच्या सत्रात ‘गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे जिहादींच्या विरोधात केलेला संघर्ष’ या विषयावर मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर उत्तर कन्नड (कर्नाटक) येथील इतिहासकार डॉ. लक्ष्मीश सोंदा, इंदूर (मध्यप्रदेश) येथील अयोध्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी शरण, उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील विचारवंत श्री. विनोद कुमार सर्वाेदय, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. मोहन गौडा, कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील हिंदु जागरण वेदिकेच्या मातृशक्ती प्रमुख सौ. पुष्पा आदी मान्यवर उपस्थित होते.

महंत प.पू. यती चेतनानंद सरस्वती म्हणाल्या की,

१. आपण सर्व संघटित होऊन इस्लामी जिहादींच्या विरोधात मोठे कार्य केले आहे. या कार्याचे संचलन दैवी शक्तीच करत आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी ईश्वराने आपल्याला निवडले आहे.

२. गाझियाबाद येथे इस्लामी जिहादींच्या विरोधात संघर्ष चालू आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथील धर्मांधांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारतातील अनेक सिद्धपिठे इस्लामी आक्रमणकर्त्यांनी नष्ट केली आहेत.

३. इस्लामी जिहादला बळी पडलेल्या हिंदूंना आम्ही नेहमी साहाय्य करतो. त्यांच्यासाठी आमच्या मंदिराचा दरवाजा नेहमी उघडा राहील. काश्मीर येथे हिंदूंच्या शेजारी रहाणारा धर्मांध त्याचा शत्रू झाला. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या पाठीशी आपण उभे न राहिल्यास संपूर्ण भारतात काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा व्यक्तीगत नव्हे, तर सर्वांचा संघर्ष आहे.

४. आजची वेळ लढण्याची आणि संघर्ष करण्याची आहे. आपलीच हिंदु बहीण ‘लव्ह जिहाद’ला बळी पडते, याची आपल्याला लाज वाटत नाही ? त्यामुळे ‘हिंदूंचे संस्कार कुठे गेले ?’ याचा विचार करावा.

५. मुसलमान त्यांच्या शरीयत कायद्यानुसार आचरण करतात, तर आपण हिंदु धर्मानुसार आचरण का करत नाही ? आपण सनातन म्हणजे धर्माचे कार्य करत आहोत. हिंदूंनी स्वतःची साधना वाढवून आध्यात्मिक बळ प्राप्त केले पाहिजे.

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात मी शिकण्यासाठी येते !

प.पू. यती चेतनानंद सरस्वती म्हणाल्या, ‘‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात मी शिकण्यासाठी येते. येथे माझे सर्व भाऊ आणि बहिणी आहेत. मी येथे आल्यावर स्वतःला समर्पण करते. आपल्या मनात अहंकार नको, कारण आपण मनाने संघटित व्हायला हवे. आपल्यात अहंकार असेल, तर आपण इस्लामी जिहाद किंवा इतर हिंदुविरोधी गोष्टींना विरोध करू शकणार नाही. मला अधिवेशनात सहभागी होण्याची संधी दिली, यासाठी मी कृतज्ञ आहे.’’

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील दैवी शक्तीचा अनुभव घ्या ! – प.पू. यती चेतनानंद सरस्वती, महंत, गाजियाबाद, उत्तरप्रदेश

‘मी १५.६.२०२२ सकाळी रामनाथी (गोवा) येथील अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनस्थळी आले. त्या वेळी माझ्या पायात वेदना होत होत्या. ‘मी बोलू शकणार नाही. मी येथे ३ दिवस कसे राहू शकेन ?’, असे मला वाटले; परंतु मी स्वत:च्या पायावर उभे राहू शकले. येथे दैवी शक्ती आहेत. त्यांचा अनुभव घ्या. स्वत:मधील आध्यात्मिक ऊर्जेला बळ द्या. दिवसभर अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर आता मला चांगले वाटत आहे. वेदना न्यून होऊन माझ्या पायांना आराम मिळाला आहे.’

हिंदू आक्रमकांपुढे झुकल्यामुळेच इस्लामी आक्रमकांनी मंदिरे पाडली ! – विनोद कुमार सर्वाेदय, विचारवंत, गाझियाबाद, उत्तर प्रदेश

विनोद कुमार सर्वाेदय

हिंदूंमधील देशभक्ती नष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे देशासाठी काही करावे, असे हिंदूंना वाटत नाही. धर्मकार्य करण्याऐवजी हिंदूंना आरामात जीवन जगू पहात आहेत. धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंच्या मुलांना धर्मशिक्षण द्यायला हवे. आत्मरक्षणासाठी सैनिकी शिक्षण द्यायला हवे. हिंदू इस्लामिक आक्रमणापुढे झुकले. त्यामुळेच आक्रमकांनी मंदिरे पाडली.

आम्ही राज्यघटना मानतो, त्यामुळे त्या विरोधात जाणार नाही; मात्र ही वस्तुस्थिती आहे. आपले नेते म्हणतात, ‘‘हिंदू आणि मुसलमान यांचा ‘डी.एन्.ए.’ एक आहे’; परंतु आपले संस्कार एक नाहीत. जोपर्यंत काफीर नष्ट करणे, हा त्यांचा संकल्प आहे, असे वक्तव्य उत्तरप्रदेश येथील विचारवंत श्री. विनोद कुमार सर्वाेदय यांनी केले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये ‘इस्लामिक जिहादपासून मुक्तीचा मार्ग आणि हिंदूंमधील जागृती’ या विषयावर ते बोलत होते.

भारतावर केलेली आक्रमणे आणि लूट हे इतिहासात जाणीवपूर्वक लपवण्यात आले ! – डॉ. लक्ष्मीश सोंदा, इतिहासकार, उत्तर कन्नड, कर्नाटक. 

डॉ. लक्ष्मीश सोंदा

‘‘भारतावर केलेली आक्रमणे आणि लूट हे इतिहासात जाणीवपूर्वक लपवण्यात आले आहे. इतिहासकारांनी १० सहस्र वर्षांचा इतिहास २ सहस्र ३०० वर्षांचा दाखवला आहे. आपला  मागील ७ सहस्र वर्षांचा उज्ज्वल इतिहास विसरण्यास भाग पाडण्यात आले आहे. खिलजी आणि औरंगजेब यांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. विदेशी दृष्टीकोन ठेवून इतिहास लिहिला आहे. इतिहासाचे गांभीर्य लपवले. मोगलांनी केलेले अत्याचार लपवले. गणित आणि भौतिकशास्त्र यांतील आपला इतिहास लपवण्यात आला. केवळ मोगलांच्या भोवती इतिहास फिरवला. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आपला इतिहास नव्याने लिहिला पाहिजे’’, असे प्रतिपादन इतिहासकार डॉ. लक्ष्मीश सोंदा यांनी केले. ते ‘भारतीय इतिहासाचे इस्लामीकरण आणि खरा इतिहास’ या विषयावर बोलत होते.

डॉ. लक्ष्मीश सोंदा पुढे म्हणाले की,

१. इतिहास एक प्रकारे जीवनाचा आरसा आहे. तक्षशिला आणि नालंदा यांचा इतिहास नष्ट केला आहे. भारतावर केलेली आक्रमणे आणि लूट हे इतिहासात जाणीवपूर्वक लपवण्यात आले.

२. हडप्पा हे पहिले शहर मानले गेले, हा वेडेपणा आहे. भारताला १० सहस्र वर्षांचा नागरी इतिहास आहे. रामायण आणि महाभारत हा आपला इतिहास आहे. वेदकाळ हा आपला इतिहास आहे.

३. इतिहासाच्या पुस्तकातून राणा प्रतापसिंह, राजा विक्रमादित्य यांची माहिती देण्यात आलेली नाही. ब्रिटिशांना हरवणारा पहिला भारतीय राजा हैदर अली नसून तो सदाशिवराव कारवार हा राजा होता; मात्र तसे इतिहासाच्या पुस्तकात सांगितले नाही.

४. राष्ट्रीय स्तरावरील इतिहास संशोधकांची परिषद आयोजित करतो. त्यातून जनजागृती करून सत्य इतिहास समोर आणणे हाच उपाय आहे.

हिंदूंनी मुलांना हिंदुस्थानचा भौगोलिक आणि धार्मिक इतिहास सांगितला पाहिजे ! – मीनाक्षी शरण, अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन, इंदौर, मध्यप्रदेश

मीनाक्षी शरण

मीनाक्षी शरण म्हणाल्या, ‘‘हिंदुस्थानातील हिंदूंची भूमी ही हिंदूंचे राष्ट्र आहे. इतिहास हा राष्ट्राचे भविष्य ठरवतो. इतिहासाची संपूर्ण माहिती असल्याशिवाय आपण लढू शकणार नाही, कारण इतिहास आपल्या जीवनाशी जोडलेला आहे. देशाची फाळणी झाल्यानंतर लक्षावधी हिंदूंची हत्या करण्यात आली, हा इतिहास आपण विसरू शकत नाही.

मौलाना अब्दुल कलाम म्हणतात, ‘‘धर्मांतर करून आम्ही भारत कह्यात घेऊन त्याचे इस्लामीकरण करू.’’ आपल्या मुलांना आपला भौगोलिक आणि धार्मिक इतिहास सांगितला पाहिजे. मुसलमान त्यांच्या मुलांना मदरशामध्ये नेतात आणि कुराण वाचायला लावतात, त्याप्रमाणे हिंदूंनी आपल्या मुलांना नृत्य, मुद्रा आणि शास्त्र यांचे शिक्षण द्यायला हवे. घरी ब्राह्मण बोलावून मुलांना शास्त्रांचे ज्ञान द्यावे.’’ या वेळी इतिहासातील विविध दाखले देऊन इतिहासाची माहिती दिली.

कर्नाटकातील होसतोडकू उत्सवाच्या वेळी आंदोलन आणि जनजागृती करून हलाल मांस पद्धत बंद केली ! – मोहन गौडा, राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक

मोहन गौडा

कर्नाटकातील जिहादी तथा ख्रिस्ती कारवायांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने केलेल्या संघर्षाची माहिती देतांना श्री. मोहन गौडा म्हणाले की, कर्नाटकात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ‘होसतोडकू’ उत्सव साजरा केला जातो. यामध्ये कालीमाता आणि कालभैरव या देवतांना मांसाहार जेवणाचा नैवेद्य दाखवतांना झटका मांस देण्याऐवजी ‘हलाल’ पद्धतीचे मांस देण्यात येत होते. हे अनुचित, तसेच हिंदु देवता आणि हिंदू यांचा अवमान करणारे होते. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करून पत्रकार परिषद आणि आंदोलन यांद्वारे आम्ही विरोध दर्शवला. ‘हलाल’च्या विरोधात मोहीम राबवून जनजागृती केली. हिंदूंना आमचे म्हणणे पटले. मुख्यमंत्र्यांपासून ते भाजपच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी या मोहिमेचे समर्थन केले, तसेच आम्ही हिंदु खाटिक समाजाला ‘झटका’ मांस देण्यास प्रोत्साहित केले. त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यांचाही झटका मांस विक्रीचा व्यवसाय चालू झाला. धर्मांधांची दुकाने रिकामी पडली. हिंदु खाटिकांच्या दुकानासमोर लोकांची मांस खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. ७०० ठिकाणी झटका मांस विक्रीची दुकाने चालू करण्याची मागणी हिंदूंनी केली. त्यामुळे कोट्यवधी रुपये हलाल करणार्‍यांना मिळत होते, ते हिंदु खाटिक समाजाला मिळाले. ईश्वराच्या कृपेने हे आंदोलन अशा पद्धतीने यशस्वी झाले.

कॉन्व्हेंट शाळेने बायबल अनिवार्य करण्याच्या विरोधात दिला यशस्वी लढा !

बंगळुरू येथील ‘क्लेरेंस कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना बायबल वाचणे अनिवार्य केले होते. त्यालाही आम्ही विरोध केला. त्यानंतर विद्यालय प्रशासनाने बायबल शिकवण्यास बंदी घातली. या विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना विद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांकडून ‘विद्यालयात बायबल घेऊन जाण्यास कोणतीही तक्रार नाही’, असे शपथपत्रावर लिहून घेतले होते. कायद्यानुसार हे चुकीचे होते. या विरोधातही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन उभे करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षा आयोगाकडे समितीने तक्रार केली. त्यानंतर याचा चौकशी करण्याचा आदेश आयोगाने दिले. कर्नाटक शिक्षा महासचिव यांनीही या विद्यालयाची चौकशी करण्याचा आदेश दिला. विद्यालयाने पत्रकार परिषद घेऊन बायबल पुस्तकाच्या अनिवार्य करण्याच्या सूत्रावर ‘प्रिटींग चूक’ असे सांगितले. ही ‘प्रिटींग चूक’ दुरुस्त करण्यासाठी देशातील कॉन्व्हेंट शाळांच्या विरोधात आंदोलन चालू केले आहे.

हिंदु जागरण वेदिकेच्या मातृशक्ती प्रमुख सौ. पुष्पा यांनी कथन केला ‘लव्ह जिहाद’ विषयीचा स्वत:चा भीषण अनुभव !

माझा एका मुसलमान युवकाशी बेंगळुरु येथील जामिया मशिदीमध्ये  विवाह झाला. त्याच्या कुटुंबात १८ जण होते. घरात मुलाची आई आणि बहिणी यांच्याकडून मला सातत्याने त्रास दिला जात होता. मी आजारी असतांनाही त्या मला भांडी घासायला लावत असत. रक्त येईपर्यंत मला मारहाण केली जात असे. गरोदर असतांनाही मला पती बुक्क्याने मारत होता. नमाजपठण केले नाही, तर सासू मला ‘तुझा मुलगा हराम होईल’, असे म्हणत असे. बाळंतपण होण्यापूर्वीच माझ्या मुलांची मुसलमान नावे ठेवण्यात आली होती. मला ११ वर्षे वशीकरण करून ठेवण्यात आले.  मी एक दिवस दुर्गामातेच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्या वेळी देवीचे फूल माझ्यावर पडले. त्यानंतर हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण करून मला हिंदु धर्मांत घेतले. माझी मुले आता सनातनी आहेत. मी हिंदु धर्माचा मार्ग निवडला. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या आणि घरवापसी करण्यास (शुद्धीकरण करून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्यास) सिद्ध असलेल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन सौ. पुष्पा यांनी केले. या वेळी ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकल्यामुळे पुष्पा यांचा झालेला छळ ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.