हिंदुराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेल्या जिल्ह्याचे नाव ‘अहमदनगर’ पालटून ‘अहिल्यानगर’ करा ! – गोपिचंद पडळकर, आमदार, भाजप

डावीकडे गोपिचंद पडळकर

सांगली, २ जून (वार्ता.) – हिंदुराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेल्या जिल्ह्याचे नाव ‘अहमदनगर’ पालटून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे. अहिल्याबाई होळकर यांचे हिंदु समाजाप्रती असलेले कार्य मोठे आहे. त्यामुळे हे नामकरण म्हणजे त्यांचा उचित सन्मान ठरेल, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (मोगल आक्रमकांची नावे पालटून तिथे हिंदु राजांची नावे द्या, अशी मागणी का करावी लागते ? शासन स्वत:हून ती नावे का पालटत नाही ? यातूनच हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते ! – संपादक)

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आमदार गोपिचंद पडळकर यांनी म्हटले आहे की,

१. अहिल्याबाई होळकर संपूर्ण भारताच्या प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे अहमदनगरचे नामांतर करून देशभरातील अहिल्याभक्तांची इच्छा पूर्ण करावी.

२. शेकडो लोकांचे प्राण घेणाऱ्या दाऊद इब्राहिमशी संधान असणाऱ्या नवाब मलिकांचे पालनकर्ते असलेल्या शरद पवारांना अहिल्या जयंती म्हणजे त्यांच्या नातवाला ‘लाँच’ करण्याचा ‘इव्हेन्ट वाटतो का ?’

अहिल्या जयंतीनिमित्त चौंडी येथे जाणाऱ्या अहिल्याभक्तांना पवारांनी मोगलशाही पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करून रोखले, मग आपण कोणता वारसा सांगणार आहोत मोगलशाहीचा कि होळकरशाहीचा ?

३. आपण अहिल्याभक्तांच्या भावनांचा आदर ठेवून लवकरात लवकर ‘अहमदनगर’चे ‘अहिल्यानगर’ करून आपण पवारांच्या ‘रिमोट कंट्रोलवर’ न चालणारे स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करावे, ‘नाहीतर हा बहुजन जागा झालाय, संघटित झालाय हे लक्षात ठेवा’, अशी चेतावणी पत्राद्वारे देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

देशातील सर्वच ठिकाणांना दिलेली मोगल आक्रमकांची नावे तात्काळ पालटणे आवश्यक !