काळजी लागणे, हे बद्धपणाचे मुख्य लक्षण आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे पराक्रम केलेल्या माणसांनासुद्धा कशाची तरी काळजी लागते. काळजी हा वृत्तीचा धर्म असल्याने ज्याची निष्ठा दृश्यावर असते, त्याला कसली तरी काळजी लागल्याखेरीज रहात नाही.
- ज्याची निष्ठा भगवंतावर असते, त्याला मात्र कोणत्याही परिस्थितीत काळजीचा स्पर्श होत नाही.
- परमार्थाचे साधन करणार्या साधकाला स्वतःची प्रगती मोजायची असेल, तर त्याने काळजीचे मोजमाप आपल्या वृत्तीला लावून बघावे.
- ज्या मानाने काळजी क्षीण होत जाते, त्या मानाने आपण भगवंताच्या जवळ जात आहोत, असे निश्चितपणे समजायला हरकत नाही.
- काळजी म्हणजे मायेचे दृश्यस्वरूप होय. म्हणून काळजी लागली की, स्वानंदावर विरजण पडते.
- भगवंताशी चिकटून रहाणारा योगी आणि वासना सुप्त असलेले बालक असे दोघे जणच काळजीपासून मुक्त असतात.
- काळजी ही भीतीची कन्या आहे.
- भगवंताच्या निष्ठेविना भीती कदापि नाहीशी होणे शक्य नाही.
– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे
(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)