|
सावंतवाडी – महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांना जोडणार्या सातार्डा-न्हयबाग मार्गावरील पुलाची स्थिती धोकादायक झाली आहे. या पुलाला अनेक ठिकाणी मोठे तडे गेले असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सातार्डा-न्हयबाग मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना विशेषतः कामासाठी प्रवास करणारे तरुण आणि पर्यटक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम केले आहे. ८ दिवसांच्या आत ठोस उपाययोजना करून हा मार्ग सुरक्षित करावा, अन्यथा ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्यासह ‘रस्ता बंद’ आंदोलन करू’, अशी चेतावणी सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधा कवठणकर यांनी दिली आहे.
या पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे जीर्ण झाले असून त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. वर्ष २०१६ मध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेसारखी घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. श्री. सुधा कवठणकर यांनी ‘पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी या गंभीर स्थितीकडे तातडीने लक्ष द्यावे’, अशी मागणी केली आहे. सर्वश्री सुधा कवठणकर, संतोष गोवेकर, साई कवठणकर, सदू टेमकर, गिरीश परब, प्रवीण बर्वे, अनिकेत धारगळकर, प्रमोद कवठणकर, स्वप्निल हरमलकर, संजय पालव, माजी उपसरपंच तळवणे आपा बर्डे यांच्यासह अन्य नागरिक यांनी पुलाची पहाणी केल्यानंतर वरील मागणी केली.
संपादकीय भूमिकानागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेला मार्ग दुरुस्त करण्यासाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? |