Gaza Palestine Support Protest : मुंबईत होणार्‍या पॅलेस्टाईन समर्थन मोर्चाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांना यश !

आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॅलेस्टाईन समर्थनांका मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले !

मुंबई – आझाद मैदानात डाव्या संघटनांनी १८ जून या दिवशी ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्चाचे आयोजन केले होते. ‘वर्ष २०१२ च्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्चावर तातडीने बंदी घालावी’, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, तसेच मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्याकडे केली होती. यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी मोर्चाला अनुमती नाकारली, तसेच पोलिसांनी फिरोज मिठीबोरवाला, मेराज सिद्दीकी, शैलेंद्र कांबळे, तबरेज आणि इतर अनेकांना कह्यात घेऊन त्यांना नोटीस बजावली.

आंदोलनामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता समितीने वर्तवली होती. आतंकवादाचे समर्थन करणार्‍या आणि भारतविरोधी असणार्‍या या मोर्चाला अनुमती नाकारण्याची मागणीही समितीने केली होती. निवेदनातील मागणीची पूर्तता केल्याने हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांचे आभार मानले.

आतंकवादाचे समर्थन करणारा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

श्री. सुनील घनवट

मुंबई – १८ जून या दिवशी आझाद मैदानात होणार्‍या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्चाला मुंबई पोलिसांनी अनुमती नाकारली. त्यामुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचे संभाव्य संकट टळले आहे. या निर्णयामुळे सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्नशील हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश मिळाले, तर समाजात धार्मिक तेढ माजवण्याचा प्रयत्न करणार्‍या आतंकवाद समर्थक पॅलेस्टाईनप्रेमी गटाचा स्पष्ट पराभव झाला आहे. या संदर्भात मोर्चाच्या माध्यमातून आतंकवादाचे समर्थन करण्याचा प्रयत्न होता, असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत, अशी भूमिका हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी मांडली.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले,

१. मुंबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी मोर्चास अनुमती नाकारली. वर्ष २०१२ मधील आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्या वेळी म्यानमार प्रकरणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेला मोर्चा हिंसक दंगलीत रूपांतरित झाला होता. तशीच परिस्थिती पुन्हा मोर्चाच्या माध्यमांतून उद्भवण्याची शक्यता होती.

२. मोर्चाला विरोध करण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समिती, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, भाजप, शिवसेना, हिंदु एकता जागृत समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, मानव सेवा प्रतिष्ठान आणि भूमीपुत्र सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे मुंबई पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) यांची मुख्यालयात भेट घेऊन मोर्चाला अनुमती देऊ नये, अशी मागणी केली होती.

संपादकीय भूमिका

भारतात राहून येथीलच अन्न खाऊन गोडवे मात्र पॅलेस्टाईनचे गाणार्‍या देशद्रोह्यांवर कठोर कारवाईही व्हायला हवी !