Jayant Narlikar : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन !

डॉ. नारळीकर

पुणे – ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुणे येथील रहात्या घरी पहाटे झोपेत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते  आंतररष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झाला होता, असे नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहिण्यासाठीही लोकप्रिय होते. केंब्रिज विद्यापिठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. त्यांनी आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत काम केले. त्यानंतर ‘आयुका संस्थे’च्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. वर्ष २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते

डॉ. नारळीकर यांचा परिचय !

जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला होता. त्यांचे वडील रँग्लर विष्णु वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदु विद्यापिठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते, तर आई सुमती विष्णु नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बी.ए., एम्.ए. आणि पी.एच्डी. पदव्या मिळवल्या. याखेरीज ‘रँग्लर’ ही पदवी, खगोलशास्त्राचे ‘टायसन मेडल’, ‘स्मिथ’ पुरस्कार आणि इतर अनेक पारितोषिके त्यांनी पटकावली.

आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते !

जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांपैकी एक असलेले फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकर यांचे गुरु होते. भारताचे आजचे खगोलशास्त्राचे जे संशोधन आणि प्रगती आहे, त्याचा पाया नारळीकर यांनी रचला. ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते. त्यांच्या जाण्याने हे पर्व संपले आहे, अशी प्रतिक्रिया खगोलशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केली.