
पणजी, १० मे (वार्ता.) – शिरगाव येथील श्री लईराईदेवीच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणी सरकारने नेमलेल्या सत्य शोधन समितीने तिचा अहवाल ८ मे या दिवशी सरकारला सुपुर्द केला आहे. या अहवालाचे सरकारकडून अवलोकन चालू आहे. त्यामुळे या अहवालाविषयी प्रसारमाध्यमांनी अफवा पसरवू नये. सद्यस्थितीत नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याला सरकारचे सर्वाेच्च प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
शिरगाव येथील जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि ७० हून अधिक जण घायाळ झाले होते. गोव्याच्या इतिहासात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडली आहे. गोव्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने घटनेच्या अन्वेषणासाठी सत्य शोधन समिती नेमली आहे. महसूल सचिव संदीप जॅकीस हे या समितीचे अध्यक्ष आहेत, तर पोलीस उपमहानिरीक्षक (रेंज) वर्षा शर्मा, वाहतूक संचालक प्रवीमल अभिषेक आणि दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा आदींचा या समितीत समावेश आहे.
समितीने संबंधित अहवालात घटनास्थळावरील व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा आणि गर्दीवरील नियंत्रण यांसंबंधी गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काही ठोस सूचनाही केल्या आहेत. मुख्यमंत्री लवकरच या अहवालावर निर्णय घेणार आहेत.