‘सद्यःस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे कि नाही, ही संभ्रमावस्था नाहीच, उलट निश्चितीच आहे की, सद्यःस्थितीत देशाला सावरकर विचारांचीच आवश्यकता आहे. कशी आहे सद्य परिस्थिती ? थोडक्यात पाहू.

१. देशाच्या अनेकविध समस्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचीच अत्यंत आवश्यकता !
आपला देश हिंदुस्थान आहे; पण स्वातंत्र्यपूर्वकाळात नव्हते, तेवढे हिंदूंचे अस्तित्व आज धोक्यात आहे. निधर्मीवाद किंवा सर्वधर्मसमभाव या गोंडस नावाखाली कित्येक वर्षे अल्पसंख्यांक मुसलमानांच्या अवाजवी मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. आज हिंदुहित जोपासणार्या पक्षाच्या हातात सत्ता आहे; पण त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आव्हानांना सामोरे जायचे आहे. त्यासाठी राजकीय धोरण, परराष्ट्रीय धोरण, आर्थिक धोरण, औद्योगिक धोरण, शेतीविषयक धोरण यांची आखणी करून कार्यान्वित केले जात आहे. संरक्षणविषयक धोरणालाही प्राधान्य दिले जात आहे. या सगळ्या धोरणांच्या कार्यवाहीसह आतंकवादाची पाळेमुळे उखडून टाकायची आहेत. आसाम, ईशान्येकडील राज्ये, बांगलादेश घुसखोरी आणि पाकव्याप्त काश्मीर यांचा प्रश्न यशस्वीपणे सोडवायचा आहे. हिंदुत्व मनामनात रूजवायचे आहे. सैन्याचे सबलीकरण करून शस्त्रास्त्रांविषयी अद्ययावत् व्हायचे आहे. भारताला ‘महासत्ता’ करायचे आहे. हे सगळे मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक अन् सांस्कृतिक आक्रमणाला सडेतोड प्रत्युत्तर देत करायचे आहे.
या सगळ्या सूत्रांवर एकमेव रामबाण इलाज, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेले विचारधन जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक कार्यवाहीत आणायचे. त्या विचारांचे चिंतन-मनन करून कृतीशील योगदान द्यायचे. जसे विशिष्ट रोगावर विशिष्ट औषधाचीच योजना करावी लागते. डोके दुखत असेल, तर पोटदुखी थांबण्याचे औषध घेऊन चालत नाही. सर्पदंशावर उपाय करतांना सापाचे विष नष्ट करणारे औषधच दिले पाहिजे. तसे आज भारताला ज्या आव्हानांना सामोरे जायचे आहे, ज्या संकटांना तोंड द्यायचे आहे, त्याचे निवारण करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचीच अत्यंत आवश्यकता आहे.

२. राष्ट्रहितासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार
काय होता सावरकर यांचा विचार ? एका वाक्यात सांगायचा, तर असे म्हणता येईल, ‘जे जे राष्ट्रहितार्थ ते ते जोपासायचे आणि जे जे राष्ट्रहितास घातक, राष्ट्राच्या प्रगतीस बाधक ते ते त्याज्य !’ वैयक्तिक जीवनात सावरकर यांनी स्वार्थाला कधीच स्थान दिले नाही; पण राष्ट्राविषयी राष्ट्रीय स्वार्थालाच प्राधान्य दिले. ‘ज्या राष्ट्राशी मैत्री केल्यावर आपल्या देशाला लाभ होणार आहे, त्याच राष्ट्राशी सख्य जोडायचे. आपल्या प्रगतीच्या आड जो येईल तो शत्रू’, हीच त्यांची स्वच्छ, स्पष्ट आणि सुलभ अशी नीती होती. राष्ट्रहिताच्या पलीकडे कोणताच विचार नाही. योग्य-अयोग्य ठरवण्याची कसोटी एकच राष्ट्रहित ! मग तिथे कुणाच्या भावना, हितसंबंध जोपासणे नाही कि मतपेट्यांचा विचार नाही.
३. सावरकर यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची अपरिहार्यता
सावरकर यांचे वैशिष्ट्य हे आहे की, ते केवळ विचार करून किंवा मांडून थांबले नाहीत, तर त्या विचारांच्या अनुषंगाने समाज परिवर्तन करण्याकरता लोकप्रियता तुच्छ मानून सेनापती आणि सैनिक म्हणूनही जिवापाड झटले. तलवारीने लिहिले आणि दोन्ही हातांत दांडपट्टा घेऊन लढले. त्यांचे विचार, आचार आणि उच्चार यांत कुठेही विसंगती दिसत नाही; म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हिंदुस्थानच्या एका श्रेष्ठ निर्मात्याला समग्रपणे, सम्यकपणे समजून घेणे आवश्यक आहे. आंधळा जयजयकार किंवा कुत्सित उपेक्षा अथवा पूर्वग्रहजन्य राग या गोष्टींना थारा न देता हे समजणे अपेक्षित आहे.
आज आतंकवाद सामान्य माणसाचे जीवन उद्ध्वस्त करत आहे, हाती सापडलेल्या आतंकवाद्यांना शिक्षा सुनावण्यासाठी वर्षानुवर्षे खटले चालवले जातात, मदरशांसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान घोषित केले जाते, हज यात्रेसाठी सवलती दिल्या जातात, गावोगावी ‘हज हाऊस’ बांधून दिले जातात आणि आमच्या अमरनाथ यात्रेकरूंवर मात्र आतंकवादी आक्रमणे होतात, तेव्हा सावरकर यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची आठवण होते.
४. काश्मीरप्रश्नी किती अधिकारी आणि सैनिक यांचा मृत्यू होऊ देणार ?
पाकव्याप्त काश्मीर प्रश्नाचेही असेच ! खरेतर २६ ऑक्टोबर १९४७ या दिवशी महाराजा हरिसिंह यांनी काश्मीरचे भारतात विलिनीकरण करण्याच्या तहनाम्यावर स्वाक्षरी केली, तेव्हाच काश्मीर भारताचा एक भाग झाले. फेब्रुवारी १९५६ मध्ये ‘जम्मू-काश्मीर संविधान सभे’ने या विलिनीकरणावर अंतिम शिक्कामोर्तब केले, तेव्हा ते विलिनीकरण वज्रलेप बनले. मग आता पाकिस्तानचा जम्मू-काश्मीरशी संबंधच काय ? पण आजची परिस्थिती अशी आहे की, जम्मू-काश्मीर राज्याच्या एकूण २,२२,२३६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी ७८,११४ चौरस किलोमीटर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला आहे. ५,१८० चौरस किलोमीटर पाकिस्तानने परस्पर चीनला दिला आहे आणि ३७,५५५ चौरस किलोमीटर चीनने बळकावला आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक भूभाग शत्रूदेशांनीच बळकावलेला आहे, तरी अद्यापही शत्रूराष्ट्रांची भूमी गिळंकृत करण्याची भूक शमलेली नाही. सतत आपल्या सीमा अशांत आहेत. अजून किती अधिकारी आणि सैनिक यांचा यात मृत्यू होणार आहे ?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘राष्ट्र सबलीकरणा’साठी सांगितलेले महत्त्वपूर्ण विचार
सद्यःपरिस्थितीत आपल्या सगळ्यांचाच ‘अर्जुन’ झाला आहे. अशा वेळी मार्ग दाखवणार्या श्रीकृष्णाची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारच श्रीकृष्णाची भूमिका निभावणार आहेत. सावरकर यांनी कशाकशाचा विचार केला ?
अ. सावरकर यांच्या मते, ‘हिंदुत्व’ हा भारताचा आत्मा आणि तेच त्याचे वेदकाळापासून आजपावेतो टिकून राहिलेले स्वत्व ! याच स्वत्वाचा त्यांनी विचार केला.
आ. ‘राष्ट्र’ ही काल, आज आणि उद्याही प्रभावी प्रेरणा रहाणार असल्यामुळे त्यांनी ‘हिंदु राष्ट्रवादा’चा विचार केला.
इ. राष्ट्राच्या मूलभूत विचारांसमवेतच राष्ट्रभाषा, राष्ट्रलिपी, राष्ट्रध्वज या राष्ट्राच्या विविध अंगांचा विचार केला.
ई. हे राष्ट्र जागतिक संघर्षात मानाने जगावयास हवे असेल, तर ते विज्ञाननिष्ठसह अद्ययावत् हवे; म्हणून विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार केला.
उ. अस्पृश्यता, विटाळ या कल्पनांचा उच्छेद झाल्याविना राष्ट्र संघटित होणार नाही; म्हणून जात्युच्छेदनाचा विचार मांडला.
ऊ. सत्य-अहिंसा यांच्या अविवेकी आणि विपर्यस्त कल्पनांनी हिंदुस्थानची अपरिमित हानी झाली. परिणामी सत्य, हिंसा-अहिंसा यांचा सूक्ष्म विचार करून इतिहासातील चुकांचे परीक्षण करून मर्मस्थाने-बलस्थाने स्पष्ट करण्यासाठी इतिहास लिहिला. त्यातूनच काही त्रिकालाबाधित तत्त्वे सांगितली. जसे ‘जशास तसे’, ‘शठास प्रतिशाठ्यम्’, ‘सद्गुण विकृती’.
ए. स्वभाषाभिमान राष्ट्रभावनेचा महत्त्वाचा घटक म्हणून भाषाशुद्धीचे विचार मांडले.
यातून राष्ट्र सबलीकरणाचा मार्ग सांगितला; म्हणूनच आज या विचारांची आपल्याला सर्वाधिक आवश्यकता आहे.
– डॉ. (सौ.) शुभा साठे, नागपूर.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चीनविषयी दर्शवलेला द्रष्टेपणा
आपल्या द्रष्टेपणातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चीनविषयीही सावधानतेच्या सूचना दिल्या होत्या; पण तत्कालीन पंतप्रधानांनी त्या धुडकावून लावल्या. ‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत ‘पंचशील करारा’वर डोळे झाकून विश्वास ठेवून बसले आणि मग युद्धाला सामोरे जावे लागले. तेव्हा सैनिक आणि शस्त्रास्त्रे अल्प पडली. चीनच्या सुसज्ज, अद्ययावत् सैन्यबळापुढे माघार घ्यावी लागली; परंतु आज आमचे पंतप्रधान सावरकर यांच्या सूचनांची कार्यवाही करत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी ब्राझीलमध्ये भेट आणि चर्चा चालू होती; पण सीमेवर सैन्यही जागरूक आणि शस्त्रसज्ज होते. त्यामुळे इकडे चर्चा चालू असतांनाच तिकडे आमच्या सैन्याने चिनी सैन्याला पळताभुई थोडी केली. ‘आज आमचे प्रयत्न शांततामय मार्गाने असले, तरी सैन्य गाफील नाही, शस्त्रबळाकडे दुर्लक्ष नाही’, हीच सावरकर यांची रणनीती आणि हाच सावरकर यांचा कृतीशील विचार !
६. नागालँडमधील हिंसाचाराच्या घटना पाहिल्या की, सावरकर यांच्या ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ या चेतावणीची आठवण झाल्याविना रहात नाही.
७. सावरकर यांची भारत-इस्रायल संबंधाविषयी दूरदृष्टी
आज जेव्हा भारत-इस्रायल संबंध नव्याने उभे केले जातात, तेव्हाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीच आठवण येते. त्यांनी वर्ष १९५६ मध्येच सांगितले होते, ‘भारत-पाक युद्ध झालेच, तर सगळी इस्लामी राष्ट्रे पाकिस्तानच्या बाजूने जातील, केवळ पाकिस्तानचा शत्रू असलेला इस्रायल भारताच्या बाजूने उभा राहील.’ आज इस्रायल आपल्याला आधुनिक शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रे पुरवत आहेच.
राष्ट्रभक्तीचा अमीट ठसा उमटवणारे एकमेव अद्वितीय व्यक्तीमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर !
स्वातंत्र्यवीर सावरकर कधीही मंत्री नव्हते, राष्ट्रपती नव्हते, पंतप्रधानही नव्हते; पण देश-विदेशातील समाजकारण, राजकारण आणि इतिहासावर स्वतःच्या नावाचा अमीट ठसा उमटवणारे हे एकमेव अद्वितीय व्यक्तीमत्त्व ! ‘कलम ३७० आधी रहित करा’, असे वारंवार सांगणारे एकमेव नेते ! त्यांची ही सूचना कृतीत आणल्यावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वातावरण कसे पालटले, याचा आपण अनुभव घेतच आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक हाडामासाचे व्यक्तीमत्त्व नाही, तर तो एक विचार आहे, असा विचार की, जो राष्ट्राला युगानुयुगे प्रेरक ठरत आहे. ‘राष्ट्रभक्तीचे दुसरे नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !’
– डॉ. (सौ.) शुभा साठे, नागपूर.
८. भारतीय सैन्याने केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ सावरकर विचारांची प्रत्यक्ष कृती दर्शवणारा !
जेव्हा आमच्या सैनिकांनी म्यानमारमध्ये घुसून १०० हून अधिक आतंकवाद्यांची हत्या केली, तेव्हाही आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरच आठवले. विदेशी हद्दीत घुसून भारतीय सैन्याने अशा प्रकारची कारवाई करण्याची ही अतिशय धाडसी मोहीम ! ‘प्रसंगी शत्रूच्या हद्दीत घुसून आक्रमण करणे, हाच विजयाचा मार्ग ठरतो’, या सावरकरांच्या विचारांना भारतीय सैन्याने प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे उरी (जम्मू-काश्मीर) येथे केलेले ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणूनच महत्त्वाचे ठरते. त्याचा परिणाम आपण प्रत्यक्ष अनुभवलाच आहे.
– डॉ. (सौ.) शुभा साठे, नागपूर.