
आळंदी (जिल्हा पुणे) – ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ आणि समस्त आळंदी ग्रामस्थांच्या वतीने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ‘सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवा’च्या निमित्ताने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सोहळ्याच्या सहाव्या दिवशी डॉ. भावार्थ देखणे, अवधूत गांधी, अभय नलगे, प्रसाद भांडवलकर, प्रियांका ढेरंगे चौधरी, कल्याणी शेटे यांच्यासह ३५ कलाकारांनी दिंडी, वासुदेव, कडक लक्ष्मी, गोंधळ, भारुड आदी पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून अध्यात्माची पेरणी केली.
भारुड महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे, जी आध्यात्मिक शिकवण आणि सामाजिक संदेश देण्यासाठी संगीत, कविता आणि नाटक यांचे मिश्रण करते. ही विचारधारा समाज मनात रुजवण्याचे काम डॉ. भावार्थ देखणे आणि कलाकारांनी केले. त्याला उपस्थित सहस्रो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.