‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वभाषाभिमान जागृत करणारे काही ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी सनातन संस्थेच्या वतीने भाषाशुद्धीची मोहीमही राबवली आहे. आजही त्यांची मराठी, हिंदी आणि कन्नड या भाषांमध्ये भाषाशुद्धीची ही मोहीम कार्यरत आहे. या समवेतच ते ग्रंथांची निर्मिती करणे, नियतकालिके आणि ग्रंथ यांसाठी लेखन अन् संकलन करणारे साधक सिद्ध करणे आदी विविधांगी कार्य करत आहेत. त्यांचा यात ‘साधकांकडून केवळ स्थुलातील कार्य करून घेणे’, हा उद्देश नसून ‘यांद्वारे साधकांची ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल व्हावी’, हा मूळ उद्देश आहे. यासाठी त्यांनी आतापर्यंत अपार कष्ट घेतले आहेत आणि अद्यापही त्यांचे हे कार्य अविरतपणे चालूच आहे. यांतील मला शिकायला मिळालेले काही पैलू येथे दिले आहेत.
१. अयोग्य शब्दांचे खंडण करणे
१ अ. मराठी भाषेत अयोग्य शब्द रुढ होत असल्यास ते रोखणे : वर्ष २००८ मध्ये सनातनच्या बहुतांश साधकांच्या लिखाणात ‘संपत्र’ हा शब्द येत होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे एक धारिका पडताळायला आल्यानंतर त्यांनी साधकांना ‘संपत्र’ हा शब्द कुठून आला ?’, याचा शोध घ्यायला सांगितला. त्यांनी ‘या अयोग्य शब्दाचे मूळ उगमस्थान काय आहे ?’, याचाही साधकांकडे शेवटपर्यंत पाठपुरावा केला. तेव्हा सनातन संस्थेमध्ये जिल्ह्यांना पाठवण्यात येणार्या पत्रांमध्ये ‘ई-मेल’ हा शब्द वारंवार वापरण्यात येत होता. त्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द म्हणून ‘संपत्र’ हा शब्द संबंधितांनी रूढ केला होता. तो शब्द अनेक ठिकाणी सार्वत्रिकपणे वापरण्यास आरंभही झाला होता. त्यानंतर त्यांनी संबंधित साधकाला चूक सांगितली आणि ‘संपत्र’ हा शब्द अयोग्य असून तो यापुढे वापरू नये’, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध करायला सांगितली होती.

१ अ १. या सर्व प्रसंगातून मला ‘कोणतीही मोहीम राबवतांना किंवा व्यापक स्तरावर कार्य करतांना अयोग्य गोष्टींवर तात्कालिक उपाययोजना न करता अडचणीचा मूळ स्रोत शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी’, हे शिकायला मिळाले.
१ आ. योग्य शब्दाच्या माध्यमांतून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देणे : एकदा साधकांनी एका लेखाला अयोग्य मथळा दिला होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यात सुधारणा केली.
१ आ १. साधकाने दिलेला मथळा : भारतातील पौराणिक स्थानांची दुरवस्था !
१ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेली सुधारणा : भारतातील पौराणिक स्थानांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष !
१ आ ३. परात्पर गुरु डॉक्टरांनी योजलेल्या योग्य शब्दांच्या परिणामामुळे त्या प्रत्यक्ष स्थितीचे भयावह गांभीर्य वाचकांच्या मनावर अधिक ठसते आणि ‘त्या स्थितीला उत्तरदायी कोण आहे ?’, हेही वाचकांच्या लक्षात येते.
१ इ. आध्यात्मिक शब्दांच्या अयोग्य वापराचे खंडण करणे : शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांसह त्यांची शक्तीही समवेत असते. एखादा आध्यात्मिक शब्द अयोग्य प्रकारे वापरला, तर ते अत्यंत चुकीचे होते. याचे नकळत पापही लागते. ‘त्याचे त्वरित खंडण करायला हवे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या पुढील चौकटीद्वारे मला शिकायला मिळाले.
‘भारताच्या एका माजी पंतप्रधानांनी भाक्रा-नांगल प्रकल्पाला ‘आधुनिक तीर्थक्षेत्र’ अशा शब्दाने गौरवले आहे. ज्यांना ‘तीर्थक्षेत्र’ या शब्दाचा अर्थही माहीत नाही, त्यांनी असे धाडस करणे, हे हास्यास्पदच आहे. ‘आधुनिक तीर्थक्षेत्र’ असा शब्द वापरणेच चुकीचे आहे आणि ‘तीर्थक्षेत्र’ या शब्दाचा अर्थ ठाऊक नसलेल्या चैतन्यहीन व्यक्तींनी तो वापरून तीर्थक्षेत्रासारख्या चैतन्यमय अर्थ असणार्या शब्दाचा एक प्रकारे अपमानच केला आहे.’
शब्दब्रह्माच्या उपासनेद्वारे आपल्यासारखेच शब्दब्रह्माची उपासना करणारे साधक संकलक सिद्ध करणे

अनेक जणांना भाषेचे सौंदर्य ज्ञात असते, तर काही जणांना ते उपजतच असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भाषेचा ‘परिपूर्ण अभ्यास करणे आणि ज्ञानसंपादन करणे’ येथपर्यंत हे कार्य मर्यादित न ठेवता आपल्यासारखे अनेक संकलक सिद्ध करणे, साधकांकडून विविध विषयांवर ग्रंथ किंवा नियतकालिके यांत प्रसिद्ध होण्यासाठी लेख लिहून घेणे, त्यांच्याकडून भाषेचा सर्वांगीण अभ्यास करून घेणे आणि त्यांना त्या क्षेत्रात परिपूर्णतेकडे नेणे आदी गोष्टी केल्या.

परात्पर गुरु डॉक्टरांनी हे कार्य स्थुलातील जडणघडणीपुरते मर्यादित न ठेवता साधकांना त्यातील सूक्ष्म असा स्पंदनशास्त्राचा अभ्यास करायला शिकवला. स्वतः शब्दब्रह्माचे उपासक असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांकडून शब्दब्रह्माची उपासना करून घेतली. त्यांनी आपल्यासारखेच शब्दब्रह्माची उपासना करणारे साधक सिद्ध केले आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविधांगी वैशिष्ट्यांपैकी हे एक वैशिष्ट्य आहे.
– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (२०.५.२०२४)
२. साधकांनी संकलन केलेल्या लिखाणातील हास्यास्पद चुका दाखवून देणे
अ. एकदा आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधिकेच्या लेखात ‘तिच्या हाताच्या बोटांतील अंगठ्या रात्री झोपेत आपोआप गळून पडल्या’, असे मी संकलन केले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी धारिकेवर ठळक अक्षरात ‘रोहित, अंगठ्या हाताच्या बोटांतच घालतात’, असे लिहून चूक दाखवून दिली.

आ. एकदा माझ्याकडे एका साधिकेला तिच्या बाळंतपणात आलेल्या अनुभूतींची धारिका संकलनाला आली होती. तेव्हा मी त्याला ‘विश्वच्या आईला विश्वच्या जन्माच्या वेळी आलेल्या अनुभूती’ असा मथळा दिला आणि धारिका परात्पर गुरु डॉक्टरांना पडताळायला ठेवली. तेव्हा त्यांनी धारिकेत मोठ्या अक्षरांत ‘हास्यास्पद चूक – मुलाचा जन्म झाला नव्हता, तर त्याचे नाव कसे लिहिले ? त्या ऐवजी साधिकेचे नाव लिहायला हवे होते’, असे लिहिले.
इ. अयोग्य शब्द आणि अयोग्य वाक्यरचना यांची उदाहरणे एकत्रित करून त्याविषयी मार्गदर्शकपर लेख लिहिणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी संबंधित साधकांना अशा अनेक हास्यास्पद चुका त्या त्या वेळी दाखवून दिल्या आहेत. ‘अन्य साधकांकडून तशा प्रकारच्या चुका होऊ नयेत’, यासाठी त्यांनी संबंधित साधकांना ‘त्या चुका फलकावर लिहिणे आणि सत्संगात सांगणे’, ही प्रक्रिया करायला सांगितली. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांकडून अशा उदाहरणांची एक धारिका बनवून घेतली. त्यांनी मराठी भाषेतील अन्य उदाहरणेही यात एकत्रित केली. त्यांनी ‘एकेरी अवतरणचिन्ह वेगळ्या ठिकाणी दिल्याने वाक्यांच्या अर्थात होणारे पालट, एकाच अर्थाच्या २ शब्दांमुळे होणारी अर्थहीन किंवा गमतीदार वाक्ये’, अशा उदाहरणांचा संग्रह करून ‘मराठी भाषेतील गमतीजमती’ या आशयाचे लिखाण सिद्ध केले. एक ग्रंथ होईल, एवढे हे लिखाण आजही संग्रही आहे. हे लिखाण पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल.
३. ‘दोन शब्दांतील अधिक योग्य आणि परिणामांच्या जवळ जाणारा शब्द कोणता ?’, हे प्रयोगाद्वारे शिकवणे
एकदा ‘ग्रंथात ‘भीषण आपत्काळ’ कि ‘संकटकाळ’ लिहायचे’, याविषयी निश्चित होत नव्हते. काही साधक ‘संकटकाळ’ अधिक जवळ जाणारा शब्द आहे आणि त्यामुळे तो शब्द वापरूया’, असे सांगत होते, तर काही साधक ‘आपत्काळ’ हा शब्द योग्य आहे’, असे होते. त्यानुसार प्रथम ‘संकटकाळ’ हा शब्द वापरण्यास आरंभ झाला. परात्पर गुरु डॉक्टरांनी एक-दोन धारिका पडताळल्यानंतर ‘संकटकाळ’ आणि ‘आपत्काळ’ या शब्दांचे अर्थ अन् ‘त्या संदर्भात संबंधितांची मते काय आहेत ?’, याविषयी जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी काही साधकांना ‘हे दोन्ही शब्द उच्चारून काय जाणवते ?’, असा प्रयोग करायला सांगितला. तेव्हा त्या साधकांनी ‘आपत्काळ’ हा योग्य शब्द आहे’, असे सांगितले. नंतर ‘आपत्काळ’ हा शब्द लिखाणात रूढ झाला.
३ अ. यातून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘बुद्धीला मर्यादा असून स्पंदनशास्त्र अधिक महत्त्वाचे आहे आणि ते जाणण्यासाठी साधनाच आवश्यक आहे’, हे शिकवले.
४. नवीन चांगला शब्द टिपून ठेवणे आणि इतरांना तो शब्द अवगत करणे
अ. एकदा परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यावरील एका लेखाला मथळा देतांना मला त्यांच्या नावामागे ‘मंत्रमहर्षि’ असे लिहायचे सुचले. हा लेख परात्पर गुरु डॉक्टरांकडे पडताळायला गेल्यानंतर त्यांनी ‘मंत्रमहर्षि’ हा शब्द वाचल्यानंतर धारिकेवर लिहिले, ‘मंत्रमहर्षि हा शब्द आवडला. असे चांगले शब्द सुचल्यास कळवत जा.’
दोन्ही प्रसंगातून मला ‘सतत नवीन शिकत रहाणे आणि ‘सर्वांनाच त्याचा लाभ व्हावा’, यासाठी प्रयत्नरत रहाणे’, हे शिकायला मिळाले.
५. कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘शब्दब्रह्माची उपासना’ हा पैलू शिकवून केवळ साधकांना नव्हे, तर भाषाशुद्धीच्या अभ्यासकांनाही ‘शब्दब्रह्माच्या उपासनेद्वारे ईश्वरप्राप्ती’ ही एक अनमोल देणगी दिली आहे.
प्रत्येक साधकाला ‘ईश्वरप्राप्ती’ हे सर्वाेच्च ध्येय देऊन त्याची त्याच्या प्रकृतीप्रमाणे वाटचाल करून घेणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (२०.५.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |