गोव्यात होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची माहिती देणारी रत्नागिरीत पत्रकार परिषद

रत्नागिरी, १० मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांच्या निमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, गोवा, उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री, तसेच संत उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला सनातन धर्माकडे आकृष्ट झालेले १५ देशांतील अनेक जण येणार आहेत. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘न भूतो न भविष्यती’ अशा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली. १० मे या दिवशी शहरातील मारुति मंदिर येथील ‘हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख श्री. गणेश गायकवाड, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, रत्नागिरी येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. अनंत आगाशे आणि सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातून महोत्सवासाठी १ सहस्र ३०० हून अधिक हिंदू उपस्थित रहाणार ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती
या ऐतिहासिक महोत्सवाला जिल्ह्यातून १ सहस्र ३०० हून अधिक हिंदू सहभागी होणार आहेत. यामध्ये मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज; भगवान परशुराम देवस्थान, चिपळूणचे विश्वस्त ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे; महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे; हिंदु जागरण मंचाचे श्री. चंद्रकांत राऊळ; पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी अधिवक्ता विद्यानंद जोग; क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरीचे कार्याध्यक्ष श्री. राकेश नलावडे; भाजपचे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. विनोद भुरण आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
‘मी भगवंताचे देणे आहे’, असे समजून अखंडित कार्य करायला हवे ! – अनंत आगाशे, रत्नागिरी येथील प्रसिद्ध उद्योजक
सनातन संस्थेच्या माध्यमातून २५ वर्षे राष्ट्र आणि धर्म कार्य चालू आहे. याचाच एक भाग म्हणून सनातन राष्ट्रासाठी १ कोटी जपयज्ञ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संतांच्या तेजस्वी वाणीतून सनातन राष्ट्राचा उद्घोष करणारे संत संमेलनही आयोजित करण्यात आले आहे. धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो. त्यामुळे मी धर्माचे म्हणजेच भगवंताचे देणे आहे, असे समजून अखंडित कार्य करायला हवे.
शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन म्हणजे धर्माभिमानी हिंदूंसाठी पर्वणीच ! – गणेश गायकवाड, जिल्हाप्रमुख, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी.
माझ्या ऐकण्यात नुकतेच आले की, आताचा योग महाभारताच्या काळाप्रमाणे आहे. धर्माला ग्लानी आलेली असतांना ईश्वराच्या संकल्पाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा शंखनाद गोवा येथे होणार आहे. सनातन संस्था सर्व संघटनांना एकत्र करून मोठे कार्य करत आहे. हिंदु देवतांनी हातात शस्त्रे धारण केली आहेत. राष्ट्राच्या सीमा या शस्त्रांनीच आखायच्या असतात, हे ध्यानात घेऊन या महोत्सवात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. सर्व धर्माभिमानी हिंदूंसाठी ही पर्वणी आहे.
१० हून अधिक संतांच्या चरण पादुकांचे दर्शन ! – अरविंद बारस्कर, शिवचरित्र कथाकार
या कार्यक्रमाच्या माध्यमातून प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधर स्वामी, कानिफनाथ महाराज, साईबाबा, प.पू. गगनगिरी महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, प.पू. भक्तराज महाराज अशा १० हून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला होणार आहे.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी बोलणे, हे माझे सद्भाग्य समजतो. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली, तेव्हा तेव्हा भगवंताने अवतार धारण केला आहे. ज्याप्रमाणे महर्षि व्यास यांनी वेद, उपनिषदे या साहित्याचे संपादन केले, तेच कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले २१ व्या शतकात करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जनसामान्यापर्यंत पोचवण्यासाठी साधक निर्माण केले. त्यामुळे हे कार्य घराघरांत पोचले. सनातन संस्थेचे मोठे कार्य असून ते वहात्या नदीप्रमाणे आहे. ज्यामुळे प्रदेश ‘सुजलाम्’, ‘सुफलाम्’ होतो. यामुळे मन, बुद्धी आणि चित्त यांची मशागत होते.