प्रत्येक रक्तपेढीत मुबलक रक्तसाठा उपलब्ध ठेवा ! – वीरेंद्र सिंह, सचिव, आरोग्य विभाग

  • भारत-पाकिस्तान युद्ध

  • आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश


मुंबई – भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना सुट्या देऊ नयेत, सुटीवरील अधिकार्‍यांना कर्तव्यावर उपस्थित होण्यास सांगा. प्रत्येक रक्तपेढीत मुबलक रक्तसाठा उपलब्ध ठेवा, अशा सूचना आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी आरोग्य विभागातील सर्वच वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या आहेत. ‘औषधांचीही कमतरता भासू देऊ नका. रक्तसाठ्यासह सर्वच संस्थांमध्ये मुबलक औषधे ठेवा. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांसह अतीदक्षता विभागही सज्ज ठेवा. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष मंत्रालय यांसह इतर सर्व विभागांनाही सतर्क रहा’, अशा सूचना सचिवांनी दिल्या आहेत. आरोग्य सचिव वीरेंद्र सिंह यांनी ऑनलाइन बैठक घेतली. त्यात सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह संचालक, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता आणि जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

शासनाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनीही परिपत्रक काढून काही सूचना दिल्या. त्यात त्यांनी सांगितले की, सर्व आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवाव्यात. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित असावेत. रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहने सर्व आवश्यक जीवनरक्षक प्रणालींसह उपलब्ध असावीत. स्ट्रेचर (रुग्णांना झोपवून नेण्यासाठी वापरण्यात येणारे एक उपकरण), अभिकर्मक (रासायनिक प्रक्रियेत वापरला जाणारा पदार्थ), ऑक्सिजन आणि इतर जीवनरक्षक प्रणालींची, तसेच बेड यांची उपलब्धता सुनिश्चित करावी. फिरते वैद्यकीय पथक सक्षमपणे कार्यान्वित करावे, आरोग्यविषयी उपकरणे, अतिरिक्त डिस्पोजेबल (टाकाऊ) वस्तूंसह शस्त्रक्रिया गृह कार्यान्वित ठेवावे, प्रयोगशाळा संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवाव्यात. आवश्यकतेप्रमाणे ‘मॉकड्रिल’ (आपत्कालीन सराव) घेण्यात यावे. ‘ब्लॅकआऊट’ (जाणीवपूर्वक वीज बंद करणे) झाल्यास आरोग्य संस्थेच्या आपत्कालीन सेवा चालू रहातील; मात्र ब्लॅकआऊट पाळण्यासंबंधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाप्रमाणे उचित कार्यवाही करावी.