सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया ! – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश आतंकवाद्यांच्या विरोधात मोठा लढा देत आहे. भारतीय सैन्य सर्व आक्रमणे यशस्वीरित्या परतवून लावत आहे. अशा परिस्थितीत सैन्यदलाचे मनोबल खचू नये, याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. सैन्याचे मनोबल वाढेल या दृष्टीने तिरंगा फेरी, रक्तदान शिबिर आदी उपक्रम घ्यावेत. त्यासाठी आम्ही सर्व ते सहकार्य करू, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

येथील प्रहार भवन येथे मंत्री राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून काही सूचना आल्याची माहिती दिली. तसेच किनारपट्टीच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही नियमावली करण्यात आलेली आहे, त्याचे तंतोतंत पालन करावे. नौदलाने घालून दिलेले सर्व नियम पाळावेत. समुद्रात कुणीही अतीउत्साह दाखवू नये. काही संशयास्पद आढळल्यास किंवा काही माहिती मिळाली, तर मत्स्य खात्याला त्वरित द्यावी, असे आवाहन केले.

पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांसाठी विशेष क्रमांक

सिंधुदुर्ग – जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी, समस्या किंवा सूचना थेट पोचाव्यात, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी ७८२३८७१७९८ हा विशेष क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. हा विशेष क्रमांक प्रसारित करतांना ‘नागरिकांची सेवा हेच माझे उत्तरदायित्व समजून मी सेवेसाठी सदैव उपलब्ध आहे’, असे सांगत पालकमंत्री राणे यांनी नागरिकांना त्यांच्या समस्या आणि सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.