
एका सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन केले होते. त्या वेळी साधकांनी आलेल्या विविध अनुभूती आणि साधनेच्या संदर्भातील शंका त्यांना सांगितल्या. त्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले त्याचे विश्लेषण येथे दिले आहे.

१. घरापेक्षा सनातनचे आश्रम किंवा सेवाकेंद्रे येथे सकारात्मक स्पंदने अधिक असल्यामुळे तेथे गेल्यावर साधिकेला स्वप्ने पडणे बंद होणे पूजा पाटील : गुरुदेव, माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मला बाराव्या दिवसापासून प्रतिदिन स्वप्ने पडू लागली. ‘वडील रुग्णालयात भरती (एडमिट) आहेत आणि ते बरे होऊनच घरी आले आहेत’, अशा प्रकारची स्वप्ने दीड-दोन मास पडत होती. नंतर स्वप्ने पडण्याची तीव्रता न्यून झाली. आता कधी तरी स्वप्ने पडत आहेत. सनातनचे आश्रम किंवा ठाणे येथील सेवाकेंद्र येथे रहात असतांना स्वप्ने पडत नाहीत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : महत्त्वाची गोष्ट आहे, ‘वास्तूचे महत्त्व काय आहे ?’ सनातनचे आश्रम आणि ठाणे येथील सेवाकेंद्र येथे सकारात्मक स्पंदने अधिक असतात. घरात आश्रमाप्रमाणे सकारात्मक स्पंदने नसतात. त्यामुळे वातावरणात असणारे मायेचे विचार मनातही येतात. त्यासाठी झोपणे, तसेच अन्य कृती करतांना नामजप अखंड चालू ठेवला, तर मायेचे विचार मनात येणार नाहीत. बरे झाले की, तू आश्रमात आलीस, नाही तर त्यातच अडकली असतीस !
२. घरापेक्षा आश्रमात अधिक सात्त्विकता असल्यामुळे मनात चुकीचे किंवा वाईट विचार न येणे श्री. पार्थ राऊत : गुरुदेव, आश्रमात आल्यावर मनात चुकीचे किंवा वाईट विचार येत नाहीत; पण घरी गेल्यावर मनात वाईट विचार येऊ लागतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : घरातील वातावरण, हवा इत्यादी सगळे रज-तम प्रधान असल्याने घरी गेल्यानंतर मनात वाईट विचार येतात. आश्रमात सात्त्विकता असते. ‘आश्रमात रहाण्याचा लाभ काय ?’ संतांच्या चरित्रात वाचले असेल किंवा ऐकले असेल की, ते गुरूंच्या आश्रमात राहिले होते. घरात राहून साधना केली, अशी उदाहरणे अल्प आहेत.
३. वास्तूच्या स्पंदनांचा परिणाम तेथे रहाणार्यांवर होत असल्याने जेथे साधना चांगली होईल, तेथे (आश्रमात) रहावे !
श्री. पार्थ राऊत : घरात सर्व जण साधना करतात. सर्व जण पूर्णवेळ साधक आहेत आणि आश्रमात सेवा करतात, तर घरात असे का होते ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘ती वास्तू कशी आहे ? तिचे जे आकारमान (डायमेन्शन) कसे आहे ? तिची लांबी-रुंदी-उंची किती आहे ?’, यातून स्पंदने निर्माण होतात. ‘कधी कधी घर चांगले असते. स्वस्तात मिळते; पण तेथील स्पंदने चांगली नसतात. अशा वेळी आपल्याला ते विकत घ्यायचे नाही. तेथे रहायचेच नाही. ‘बाजूला कोण कसे रहातात ? बाजूला स्मशान आहे का ?’, अशी इतरही कारणे आहेत. वास्तूसाठी आपली साधना खर्च करण्यापेक्षा ‘जेथे आपली साधना चांगली होईल, तेथे जाऊन मी राहीन’, असा विचार करायला हवा.
४. आश्रमात प्रवेश करताच ‘निर्विचार’ हा नामजप आपोआप चालू होणे
कु. श्रेया शिरोडकर : गुरुदेव, मी आश्रमात प्रवेश करताच माझा ‘निर्विचार’ हा नामजप आपोआप चालू झाला आणि तेव्हापासून नामजप चालूच आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हे सर्व ऐकून कोणालाही वाटले, मला साधना कशी करायची ? आणखी शिकायचे आहे. आणखी शिकायचे आहे, तर केव्हाही येथे येऊ शकता ! जेवढा तुमच्याकडे वेळ आहे, त्यानुसार तुम्ही आश्रमात येऊन राहू शकता. जोपर्यंत तुम्ही साधनेत पारंगत होत नाही, तोपर्यंत येथेच रहायचे. तुम्हाला अध्यात्मशास्त्र माहीत असले पाहिजे, साधना झाली पाहिजे आणि साधना केल्यावर अनुभूती आली पाहिजे. पुढे पुढे जायचे आहे. दुसर्यांच्या लक्षात आले पाहिजे, ‘अरे याची साधना पुष्कळ चांगली चालली आहे. पुढे जात आहे.’ समजले ना !’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |