
पणजी, ९ मे (वार्ता.) – पाकिस्तानने ८ मेच्या रात्री भारतातील १५ शहरांवर केलेले क्षेपणास्त्राचे आक्रमण भारतीय सैन्याने ‘एस्-४००’ ट्रायम्फ (सुदर्शन चक्र) या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे हवेतच नष्ट केले. यामुळे प्रचंड संहार होण्यापासून रक्षण झाले. ‘एस्-४००’ ट्रायम्फ (सुदर्शन चक्र) ही संरक्षण प्रणाली खरेदीसाठी गोव्याचे सुपुत्र आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्या काळी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
स्व. मनोहर पर्रीकर यांनी वर्ष २०१६ मध्ये त्यांच्या संरक्षणमंत्रीपदाच्या कार्यकाळात रशियाकडून ‘एस्-४००’ ही संरक्षण प्रणाली सुमारे ४० सहस्र कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यासाठी करार केला होता. याद्वारे देशाचे ४९ सहस्र कोटी रुपयेही वाचले होते, असे म्हटले जात आहे. या संरक्षण प्रणालीची आवश्यकता स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्या काळी ओळखली होती.
काय आहे ‘एस्-४००’ हवाई संरक्षण प्रणाली ?
भारताने रशियाकडून खरेदी केलेली ‘एस्-४००’ हवाई संरक्षण प्रणाली हवेतून होणारी आक्रमणे हवेतच रोखते आणि नष्ट करते. या यंत्रणेद्वारे क्षेपणास्त्रे, ड्रोन, रॉकेट लाँचर आणि लढाऊ विमाने यांद्वारे होणारी आक्रमणे रोखली जातात. ही प्रणाली ६०० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा मागोवा घेऊ शकते आणि त्याची लक्ष्य भेदण्याची श्रेणी ४०० कि.मी. आहे. ही जगातील सर्वांत आधुनिक हवाई संरक्षण प्रणाली आहे. भारताने ही सीमेवर तैनात केली आहे.
संपादकीय भूमिकास्वतःच्या कर्तृत्वाने मृत्यूनंतरही गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे स्व. मनोहर पर्रीकर ! |