श्री. महादेव जयराम जोशी, म्हणजेच श्री. अप्पा जोशी यांना लहानपणापासून देव, देश, धर्म आणि सामाजिक बांधीलकी यांची आवड. ‘समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे’, या विचाराने अप्पांनी संपूर्ण आयुष्य पालघर जिल्ह्यातील तलासरी या वनवासी क्षेत्रातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य केले. त्यांनी या मुलांवर शिक्षणासह राष्ट्र, धर्म आणि सामाजिक बांधीलकी यांचे संस्कार रूजवले. त्यांच्या सहवासात शिकलेले त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. त्यांचे काही विद्यार्थी आता सामाजिक कार्य करत आहेत. श्री. अप्पा ८० वर्षांचे असूनही ते कर्मनिवृत्त न होता त्या विद्यार्थांच्या कार्यातही जोमाने साहाय्य करत आहेत. अशा या कर्मयोगी अप्पांची त्यांनी स्वतः सांगितलेली माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. बालपण, शिक्षण आणि नोकरी
श्री. अप्पा जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९४६ या दिवशी रत्नागिरी येथील देवरुख या ठिकाणी शेतकरी कुटुंबात झाला. १० वीपर्यंतचे शिक्षण देवरुख येथे झाल्यानंतर ११ वी त्यांनी चिपळूण येथून केली. त्यानंतर त्यांनी मिरज येथे पुढचे शिक्षण घेण्याचे चालू ठेवले; पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यानंतर गुहागरमधील हेदवी येथील एका शाळेत त्यांनी २ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली.
२. पूर्णवेळ संघप्रचारक आणि कार्यात अडथळा
समाजासाठी कार्य करण्याची जाणीव लहाणपणापासून होतीच. संघाच्या कार्याचीही माहिती होती. त्यामुळे संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य करण्याचे त्यांनी ठरवले. वर्ष १९६७ ते १९६९ ही २ वर्षे त्यांनी रोहा, मुरुड आणि पाली या तालुक्यांत संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले. या वेळी मोठ्या बंधूंनी सांगितले, ‘प्रचारकाचे कार्य थांबवून घरच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यावे’. त्यामुळे त्यांच्यावर संघ प्रचारक म्हणून कार्य थांबवण्याची वेळ आली.
३. आर्थिक समस्येवरील उपाय मिळून संघकार्य करता येणे
घरच्या आर्थिक समस्येमुळे संघ प्रचारकाचे कार्य थांबवण्याची वेळ आली असतांनाच ज्येष्ठ प्रचारक दामुअण्णा टोकेकर यांनी उपाय सुचवला. त्या वेळी कल्याण नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष श्री. माधवराव काणे यांनी निवृत्तीनंतर तलासरी येथे वनवासी क्षेत्रातील मुलांसाठी वसतीगृह चालू केले होते. त्या ठिकाणी त्यांना साहाय्यक हवा होता. हे कार्य देशसेवेचेच होते. तेथे अप्पा श्री. माधवराव काणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ व्यवस्थापन पाहू लागले. यासाठी त्यांना जे मानधन मिळत होते ती रक्कम ते घरी पाठवत असत. त्यामुळे घरच्या आर्थिक परिस्थितीत हातभार लागला आणि त्यांचे देशसेवेचे कार्य चालू राहिले. या वसतीगृहात त्यांनी ३२ वर्षे कार्य केले.
४. अप्पांना त्यांच्या पत्नीची मोलाची साथ
मुलांचे वसतीगृह चालू झाल्यानंतर काही वर्षांतच मुलींसाठी वसतीगृह चालू झाले. त्या वेळी त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. कोकणातील एका परिचित कुटुंबातील एका मुलीशी विवाह झाला. त्यामुळे मुलींच्या वसतीगृहासाठी पूर्णवेळ साहाय्यकाची अडचण दूर झाली. अप्पांच्या धर्मपत्नी सौ. वसुधाताई यांनी २८ वर्षे मुलींच्या वसतीगृहात कार्य केले. या कालावधीत त्यांना ३ कन्यारत्ने झाली. मुलींनीही वसतीगृहातील वातावरणात त्यांचे शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करून अप्पा आणि सौ. वसुधाताई यांना कार्यात एक प्रकारे उत्तम साथ दिली.
५. साम्यवाद्यांचे वर्चस्व असलेल्या तलासरीमध्ये संघाचे कार्य करणे आव्हानात्मक !
तलासरी हे आताच्या पालघर जिल्ह्यातील गुजरातच्या सीमेलगतचे गाव. येथे साम्यवाद्यांचे वर्चस्व. हे वनवासी क्षेत्र तसे बाह्य जगतापासून अलिप्तच होते. शहरातील साधन-सुविधांची वानवाच होती. त्यामुळे येथील वनवासी समाज हा शिक्षण, संस्कृती आणि सुधारणा यांपासून वंचित होता. अशा ठिकाणी कार्य करतांना साम्यवाद्यांचा प्रखर विरोध सहन करावा लागला. एकदा तर १५ ते २० जणांच्या टोळक्याने वसतीगृहात घुसून अप्पा, सौ. वसुधाताई आणि एक विद्यार्थी यांना जबर मारहाण केली. त्यामध्ये अप्पांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. १०० हून अधिक टाके पडले एवढी मोठी जखम होती. ईश्वराच्या कृपेने या आक्रमणातून ते बचावले.
६. तलासरी वनवासी क्षेत्रातील अनुभव
अ. वनवासींना हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र आणि कार्याला होणारा विरोध : साम्यवाद्यांचे येथील हिंदु असलेल्या वनवासी समाजाला हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र चालू होते. येथे साम्यवाद्यांच्या प्रभावामुळे हिंदु सण जवळपास बंद झाले होते. साधन-सुविधांच्या अभावामुळे मूलतः हिंदु असलेल्या वनवासींना हिंदु धर्मापासून अलिप्त करण्यात साम्यवाद्यांना यश येत होते; म्हणूनच त्या भागात वसतीगृहाच्या कार्याला त्यांचा विरोध होत होता.
आ. मुलांमध्ये राष्ट्र-धर्माच्या विचारांचे रोपण : वसतीगृहाचे कार्य सांभाळत अप्पा तेथील लोकांमध्ये जाऊन त्यांना राष्ट्र-धर्माचे विचार देत असत. रामनवमी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, रक्षाबंधन हे सण तेथे साजरे करायला लागले. त्यांनी मुलांच्या माध्यमातून सणांची माहिती घराघरांत पोचवली. सणांच्या वेळी मारुतिस्तोत्र, रामरक्षास्त्राेत्र पठण करून घेण्यात आले. त्यामुळे मुलांमध्ये चांगल्या संस्कारांचे बीजारोपण झाले. आपल्याला याचा लाभ आजही होत असल्याचे काही विद्यार्थी त्यांना आवर्जून सांगतात.
श्री. अप्पांना मिळालेले पुरस्कार
श्री. अप्पांना आतापर्यंत डॉ. हेडगेवार स्मारक सेवा पुरस्कार, स्व. बाबासाहेब साठे पुरस्कार आणि नानासाहेब दांडेकर सार्वजनिक न्यास पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. हेडगेवार स्मारक सेवा पुरस्कारात मिळणारी १ लाख रुपयांची रक्कम त्यांनी स्वीकारली नाही. ‘वसतीगृहात कार्य करतांना जे मानधन मिळत होते त्यापेक्षा अधिक आपण संघाकडून काही घ्यायचे नाही’, असा त्यांचा निश्चय होता.
७. वयोमानानुसार निवृत्ती आली, तरी कर्मयोग चालूच !
अ. माजी विद्यार्थ्याने चालू केलेले महाविद्यालय त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतरही चालू रहाण्यासाठी धडपडणारे श्री. अप्पा ! : अप्पांनी वसतीगृहात ३२ वर्षे सेवा केल्यानंतर ते तेथून निवृत्त झाले असले, तरी ते आपल्या कर्मभूमीत अजूनही सक्रीय आहेत. त्यांच्या एका विद्यार्थ्याने तलासरीमध्ये एक महाविद्यालय चालू केले; मात्र त्या विद्यार्थ्याचे अलीकडे अपघाती निधन झाले. या महाविद्यालयामध्ये ३५० विद्यार्थी शिकत आहेत. आता हे महाविद्यालय पुढे चालू रहावे, यासाठी अप्पा पुढे सरसावले आहेत. स्वतःचा अनुभव, ओळख आणि माजी विद्यार्थी यांच्या साहाय्याने हे विद्यालय निरंतर चालू ठेवण्याचा त्यांचा खटाटोप चालू आहे.
आ. गोमातेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गोमय उत्पादनांचा उपयोग आणि विक्री : हिंदु संस्कृतीत गोमातेला अनन्य साधारण महत्त्व आहे. गोमातेचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थच नव्हे, तर तिचे शेण, गोमूत्र यांपासून अनेक उत्पादने बनतात. श्री. अप्पा स्वतः ते उपयोगात आणतात आणि ते विक्रीही करतात. यातून हिंदूंना गोमातेचे महत्त्व पटवून देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो.
इ. वनवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन : वनवासी मुलांच्या शिक्षणासह त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी जवळीक साधली. त्यांनी त्यांच्या कर्मभूमीत लोकांना दुग्ध प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, शोष खड्डा प्रकल्प, बालसंस्कार वर्ग यांचा आग्रह धरून त्याविषयी मार्गदर्शन केले. वड, पिंपळ, निम अशी झाडे लावण्यास ते नेहमी लोकांना उद्युक्त करत.