पुणे येथे स्वच्छतेचा केवळ दिखावा !
पुणे – पावसाळ्यात पाणी वाहून जावे, यासाठी प्रत्येक वर्षी पावसाळी वाहिन्या, नाले आणि त्याच्या टाक्या यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये किमतीच्या निविदा काढल्या जातात; मात्र त्या नियोजित रकमेपेक्षा या निविदांची किंमत ४० टक्क्यांनी अल्प असल्यामुळे स्वच्छतेचा दर्जा राखला जाणार का ? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. हा प्रश्न आता खरा ठरला असून अनेक ठिकाणी पावसाळी वाहिन्या आणि मलनिःस्सारण टाक्या स्वच्छ करतांना काढलेली घाण तशीच ठेवली जात आहे. त्यामुळे पावसाळापूर्व वाहिन्यांसह नालेस्वच्छता निवळ कागदावरच होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने या वर्षी पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता योग्य प्रकारे करण्यात यावी, यासाठी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील नाले आणि पावसाळी वाहिन्या स्वच्छ करण्यासाठी या निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेपेक्षा ४५ ते ५३ टक्के अल्प दराने काम करण्याची सिद्धता ठेकेदारांनी दाखवली होती; मात्र ही कामे निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे समोर आले आहे. मलनिःस्सारण टाक्यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित व्हावीत, यासाठी त्यातील माती, दगड त्वरित उचलण्याचे आदेश महापालिकेने संबंधित ठेकेदारांना दिले आहेत; पण चार-पाच दिवस त्यातून काढलेली माती आणि घाण ही रस्त्यावरच पडून रहाते. ती पुन्हा गटारात जाते किंवा रस्त्यावर पसरते. (अशा दायित्वशून्य ठेकेदारांवर कारवाई कधी करणार ? – संपादक)