छत्रपती संभाजीनगर – वादळी वार्याने चारचाकी वाहनावर झाड पडून ७ मे या दिवशी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील लेखाधिकारी राजू चित्ते यांचा मृत्यू झाला आहे. मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावरील एम्प्लॉयमेंट कार्यालयासमोर ही घटना घडली. चेलिपुरा कार्यालयात कार्यरत असलेल्या चित्ते यांच्या पत्नी घाटी रुग्णालयात ‘लॅब टेक्निशियन’ आहेत. त्यांना भेटण्यासाठी जात असतांना ही घटना घडली.
पावसामुळे विविध जिल्ह्यांत हानी
७ मे या दिवशी जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत वादळी वार्यासह पाऊस झाला. पावसामुळे नाशिक येथे कांद्याला फटका बसला. निम्म्या शहरात ४ ते १४ घंट्यांपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. २०० हून अधिक झाडे कोसळली. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, तर जालना जिल्ह्यांत अंबड तालुका मुंबई, ठाणे, बुलडाणा येथे पाऊस झाला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतही पाऊस पडला. १० ठिकाणी झाडे मोडल्याने वाहनांची, तर १ सहस्र ७६७.२५ हेक्टरवर पिकांची पावसामुळे हानी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी पावसाने चाळीसगाव, धरणगाव, पारोळा, एरंडोल, रावेर, चोपडा आणि यावल तालुक्यांत ७ सहस्र २३५ हेक्टरवर केळीची मोठी हानी झाली.